Forum Home Forum Home > Information Section > कविता संग्रह
  New Posts New Posts RSS Feed - तानाजी मालुसरे पो
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


तानाजी मालुसरे पो

 Post Reply Post Reply
Author
Message
AARTI View Drop Down
Senior Member
Senior Member


Joined: 30 Apr 2014
Location: PUNE
Status: Offline
Points: 105
Post Options Post Options   Thanks (1) Thanks(1)   Quote AARTI Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: तानाजी मालुसरे पो
    Posted: 23 Aug 2014 at 12:09pm
नरवीर तानाजी मालुसरे पोवाडा


चौक १
राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥
सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥
सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥
गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥
खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥
शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥
जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥
सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥
उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥

चौक २
बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥
पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥
नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥
ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
"जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला" ॥२॥

चौक ३
शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥
अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥
हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥
ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥
कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥
पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला ।
सलाम जिजाबाईला केला ॥३॥

चौक ४
"धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला " ।
"शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा" ॥
"डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥
डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे" ॥
"मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं"॥
येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥
हातीं फांसा ह्यानें घ्यावा । "डाव पहिला येऊं दे तुला ॥
मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा" ॥४॥

चौक ५
हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥
फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥
तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥
बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥
तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥
"जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा" ॥
येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥
"प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला" ॥
बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥
बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥
तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥
जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥

चौक ६
"ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥
माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥
नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥
तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्‌चा मागून घ्यावा " ॥
’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥
आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥
बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला" ॥
नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥
"हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥
जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥
नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥
सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें" ॥
"नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥
राज्य जाळून टाकीन उभे" । "नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला" ॥६॥

चौक ७
बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥
राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥
ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥
’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥
प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥
प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥
ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥
तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥
शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥
किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥
खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥
"जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥
तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्‍या दिवसाला ॥७॥
चौक ८
पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥
ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥
पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥
तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥
सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥

चौक ९
जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥
पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥
काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥
लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥
लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥
ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥
येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥
"माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी" ॥
दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥९॥
चौक १०
मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥
"लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा ।
जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले ।
नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला ।
बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।
किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता ।
काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला ।
ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल" ।
"असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री ।
नाहीं भिणार मरणाला" ॥१०॥

चौक ११
मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥
"ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला" ॥
"माझें लगिन करील कोण ?" ॥ रायाबा पुसे बाबाला ॥
"साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥
भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला ।
जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा ।
घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर " ।
लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे ।
बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्‍याला ॥
मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे ।
ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी ।
त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके ।
त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला ।
ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥
 
चौक १२
’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥
बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥
बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला ।
ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥
आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥
हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥
माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥
त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥
बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥
’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥
चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला" ॥१२॥
 
चौक १३
बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥
"जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥
अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥
सुभेदार बोले त्या सेनेला । "बारा हजार रुपया काय केला ॥

घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला" ॥

बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें ।
पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥
रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥
"माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला" ॥
"भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला ।
आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें" ॥१३॥
 

चौक १४
हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥
तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥
माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥
तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥
गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥
मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥
"तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार" ॥
"राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !" ॥१४॥

चौक १५
"अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला" ॥
गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला ।
आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला ।
गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला ।
घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥
बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥
बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥

चौक १६
हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥
"माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥
तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला" ॥
शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥
तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥
"माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला" ॥
नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥
सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥

चौक १७
बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥
पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥
दुसर्‍या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥
तिसर्‍या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥
चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥
पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥
सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥
"मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥
माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?" ॥
"ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥
जिजामातेनें बोलाविलें" । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥
जिजाबाई बोलाया लागली । "मी जातीनें बाईल ॥
आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल" ॥१७॥

चौक १८
सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥
"भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥
इच्छेप्रमाणें होऊं दे ।" सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥
गेली सुभेदाराला ओंवाळायला । "तुझे जाऊं अलाबला ॥
तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला" ॥
सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥
ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥
इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥
ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥
जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥
"माझा सुभेदार शाहाणा ।" हात मस्तकी ठेविला ॥
"माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला" ॥
"काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥
माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला" ॥१८॥

चौक १९
सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥
शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥
"गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला" ॥
"काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला" ॥
जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥
नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला" ॥
"माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें" ॥
"भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥
आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥
नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्‍या नदीला ॥
आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला" ॥१९॥

चौक २०
बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥
गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥
विचार काढिला । "भला भला रे सुभेदारा ॥
तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥
चला जाऊं रे जेवणाला" । बारा हजार फौजेतून ॥
एकटा सुभेदार गेला । गुंजवर्‍या नदीला ।
आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली ।
आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन ।
आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला ।
बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन ।
बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव ।
सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥

चौक २१
ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥
"आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला" ॥
ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥
"भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥
ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला" ॥
मामा बोले सुभेदाराला । "अठरा शाखा अठरा भाज्या ॥
एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला" ॥
अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥
कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥
कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ ।
ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥
धांवा अवघा मांडिला । "प्रतापगडची भवानी धांव संकटाला" ॥
पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥
सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥
ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥
ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥
खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥

चौक २२
बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥
तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्‍याला ॥
"आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥
जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥
जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥
मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला ।
दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला ।
डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्‍याला दंड द्यावा इनाम खायाला" ॥
सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥
डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥
"आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा" ॥
बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥
त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥
नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥

चौक २३
शेलार मामानें पाहिला । "माझ्या ऐक सुभेदारा ।
बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा ।
देशील तर द्यावा बारा हजाराला" । येवढया जाबावरुन ।
बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला ।
देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी ।
बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार ।
बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा ।
बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा ।
बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक ।
बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार ।
कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक ।
दादा फौज निघाली ॥२३॥

चौक २४
’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा" ॥
तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥
सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥
आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥
ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥
पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला ।
गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । गेला डेर्‍याच्या मुक्कामी ॥
पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥
गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥

चौक २५
गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥
माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥
"ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥
माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला" ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥
हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥
त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥

चौक २६
"सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥
गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें" ॥
तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥
जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥
लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥
आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥
काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥
वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥
सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥
गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥
त्यानें सुभेदार पाहिला । "मारा मारा ह्या चोराला" ॥
सुभेदार बोलाया लागला । "भ्यालों ह्या चोराला ॥
हे ठार मारतील मला" । "चोर असलों ठार मारा ॥
राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥
जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला" ॥२६॥

चौक २७
पहिल्यानें सरदार पाहिला । "धन्य याची नारायणा ॥
कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला " ॥
"मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥
मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला ।
जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥
तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥
घाईनें निघालों । पान खायला विसरलों " ।
पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा ।
ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं " ॥ बटवा खाकेचा सोडिला ।
यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला ।
यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले ।
कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥

चौक २८
बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥
"बारा असामींचा कोण सरदार सांगावा" । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार" ॥
"ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी" ॥
"तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती" ॥
ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥
ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥
चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥
बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥
कोळी फितूर ते केले । "ऐक ऐक पाटीलबोवा ॥
मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला" ॥
"काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला" ॥
इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥
"मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥
राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार ।
पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला ।
आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला" ॥२८॥

चौक २९
नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥
"ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला" ॥
ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥
"घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला " ॥
"ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥
द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये" ॥
येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥
"ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥
दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥
आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥
अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥
घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥
सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥
चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो" ॥२९॥

चौक ३०
"आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥
एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥
उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥
एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥
नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥
बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥
उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥
तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥

चौक ३१
"बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला" ॥
बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥
त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥
"शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला" ।
"भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥
हजाराची तैनात देईन बारा असामीला" ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा ।
त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥
 

चौक ३२
सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥
ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला ।
"तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥
माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥
तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला" ।
ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला" ॥
"बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला" ॥
"ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥
नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥
ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा" ॥३२॥

चौक ३३
चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥
बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥
ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥
सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥
भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥
सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥
अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥
आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥
"सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली" ॥
राग आला त्या मर्दाला । "मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥
एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन" ॥
त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥

चौक ३४
"जावें जावें शेलारमामा सोल बघायाला" । ज्यानें टिचकीनें मारिली ॥
सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥
ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥
"कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा" ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥
सुभेदार बोलतो । "भरा बायकांच्या बांगडया" ॥
एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥
मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥
चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥
गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥
महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥

चौक ३५
अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥
घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥
हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥
"किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला" ॥
खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥
त्यामध्यें बडा वाघ शिर्‍या । गाईकी बचडी खाते ॥
रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा" ॥३५॥

चौक ३६
सुभेदार बोलतो सेनेला । "पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥
दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची" ॥
पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥
आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥
पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥
सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) ।
बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले ।
सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार ।
फौज धरणीवर पडली ॥३६॥

चौक ३७
सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥
माझ्या "शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला" ॥
सोल पाहुन मामा । धोतरात....ला ॥
"काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा" सुभेदार बोलाया लागला ।
"नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा ।
माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा " ॥३७॥

चौक ३८
शेलार मामा बोलतो । "ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥
आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥
आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती ।
उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको" ॥
"भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥
पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला" ॥
शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥
प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥
सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥
तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥

चौक ३९
पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥
हात मारिला पाठीवर । "भिऊं नका सुभेदारा ॥
यश तुझ्या तलवारीला" । बळ देवीचें सापडलें ॥
जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥
खुन डोळ्यावर चढला । "ऐक माझ्या शेलारमामा ॥
जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥
जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा" ॥३९॥

चौक ४०
गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥
होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥
होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥
मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥
कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥
ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥
व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥
कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥
कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥

चौक ४१
पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्‍या दरवाजाला ॥
काळोखी रात्र, पार--
दुसर्‍या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥
मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥
तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥
पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥
गेला तिसर्‍या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥
दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥
एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥

चौक ४२
"ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥
एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला" ॥
त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥
अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥
भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥
उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥
ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥
चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥
"मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला ।
सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥
काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया" ॥
"x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥
जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥
आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥
अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥
 

चौक ४३
सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥
"नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला" ॥
शेलार तो मामा शिणल्यावर "दादा पोट रे फुगलें" । "भला भला माझ्या मामा ॥
बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥
पान खाऊं दे मला" । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥
"किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला" ॥
"उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार" ॥
"नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला" । "नऊशें पठाण आम्ही काटया" ॥
महाता बोले सुभेदार । "कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥
जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी ।
बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्‍या आणाव्या ।
रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी ।
कोठें होत्या तुझ्या बाला ?" ॥ सुभेदार बोले महताला ।
"ऐक भुसार्‍याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा ।
यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें ।
तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा ।
तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्‍या एवढया बडया तलवारा ।
कोठें होत्या रे मुसंडया तुला ?" ॥४३॥

चौक ४४
सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा" ॥
पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥
"तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा" ॥
हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥
"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥
हा हात्ती बाच्छाईचा" । "मी रे आहे महाराजांचा" ॥
पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला,
हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला ।
बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला ।
"सहाही पाताळ गाडिला !" राग आला सुभेदाराला ।
सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥
अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥
हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्‍याला मारायाला ॥
सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥
सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥
अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥
पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा "भोचु दे रे बोx" ॥४४॥

चौक ४५
तिथुन बोंब्या निघून गेला ॥ "मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥
"सिंहगड किल्ला डुब होया" । "हम चोन नहीं सोडताई ॥
जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥
पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला" ॥
सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥
चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥
सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥
सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥
सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥
ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥
आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥

चौक ४६
"सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला" ॥
"उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार" ॥
"ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला" ॥
सुभेदार त्याला बोलता झाला । "घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥
पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला" ।
पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला ।
सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ "अरे सिद्दी तू हिलाल ।
दुसरा हात येऊं दे तुझा" ॥ सुभेदार बोलला ॥
"संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥
नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥
बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥
बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥

चौक ४७
बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥
"मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ।
नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥
सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया" ॥
"हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥
आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला" ।
तुम्हीं जावें लढाईला" ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं ।
तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ "सलाम सलाम मेरे भाई ।
किस्का तू उमराव सांगावें आम्हांला" ॥ "उमराव शिवाजी महाराजाचा ।
आहे मी तानाजी मालूसरा" ॥ "सुभेदार भाई ।
पहिला हात येऊं दे तुझा" । "तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक ।
पहिला हात येऊं दे तुमचा " ॥ बारा जण लडक्यांनीं ।
चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला ।
त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला ।
नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं ।
चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥

चौक ४८
तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥
"मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥
नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥
सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !"
लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला ।
उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥
लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥
खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥
"जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥
झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला" ॥४८॥

चौक ४९
उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥
फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥
ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥
गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥
उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥
पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला ।
गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या ।
अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा ।
त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥
जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या ।
हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला ।
अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला ।
गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला ।
सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा ।
दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला ।
ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण ।
ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥

चौक ५०
"सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला" ॥
"उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार" ॥
उंबराव मोगलानें पाहिला । "ऐसा भला आहेस रे दादा ॥
तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥
सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥
हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला" ॥
सुभेदार बोले मोगलाला । "सोड सिंहगडाची गादी ॥
चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥
राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला " ।
एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥
"पहिला हात येऊं दे तुझा" । "उदेभान हात येऊं दे तुझा" ॥
तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥
अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥
मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥
नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥
हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥
"ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥
दुसरा हात येऊं दे तुझा" । सुभेदार बोलतो "मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥
लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला" ॥
उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला ।
पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला ।
सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥

चौक ५१
पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या----मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥
आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥
मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥
उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥
"हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥
कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला" ॥
लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥
सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥
यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥
मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥
"फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे" । मोगल मागे पहात होता ॥
दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला ।
बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥
नऊशे पठाण । मार माराया लागले ॥
त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥
 

चौक ५२
नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥
आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥
प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥
पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥
संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥
देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥
ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥
"शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे" ॥
शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥
सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥
नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला" ॥
मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥
एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥
पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥
पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥
त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥
शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥
शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥

चौक ५३
ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥
चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे ।
पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ ।
वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला ।
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ "माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं ।
ह्याचें लग्न करील कोण" ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले ।
आले सुभेदाराजवळ ॥ "आमचा सुभेदार धनी ।
आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण" ॥
सुभेदार बोलायाला लागला । "भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥
जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला" ॥
अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला ।
मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले ।
वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥

चौक ५४
आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥
आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥
सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥
शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥
शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा ।
जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥
गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥
बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥
"सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥
बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची" ॥
मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥
बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला ।
वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥
पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥
रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥
पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥
"साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥
बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥
आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला" ॥
शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥
"भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार ।
आहे तुला " ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें ।
शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥
 

चौक ५५
मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥
ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥
पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥
संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥
बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥
दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥
डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥
मालुसर्‍याचा दंड । दिला इनाम खायाला ॥
रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला ।
आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका ।
ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥ "पंतोजी तो काका ।
जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं ।
आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला ।
राजगड किल्ल्याला" ॥ तुळशीदास शाहिर ।
त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन ।
मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा ।
पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा ।
हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा ।
शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत ।
ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य ।
सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला ।
ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥

                                           शाहीर तुलसीदास

Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.109 seconds.