अशेरीगड
(Asherigad) |
किल्ल्याची ऊंची : 
1680 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: पालघर |
जिल्हा : पालघर |
श्रेणी : मध्यम |
पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात 'दादा' वाटावा असा हा अशेरीगड किल्ला आहे. याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.
|
|
इतिहास : |
अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणत: ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली. पेशव्यांनी १७३७ च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला. १८१८ नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला. |
पहाण्याची ठिकाणे : |
अशेरी गडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा घरा भोवती साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणार्या वार्याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. मात्र इथे आत व बाहेर पहारेकर्यांना झोपण्यासाठी दगडी पलंग ('बर्थ') केलेले आहेत. येथे गुहेच्या तोंडाशी दोन जास्वंदीची झाडे आहेत.
गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी भेग व पुढे एक बांधीव बुरूज दिसतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणार्या एस टी बसने किंवा या महामार्गावरून धावणार्या खाजगी वाहनाने निघून 'मस्तान नाका' या ठिकाणापासून सुमारे १० - ११ किमी वर असणार्या 'खोडकोना' गावाच्या स्टॉपला उतरायचे. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामार्गावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. बैलगाडीची वाट एका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवतात. विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून, गावकर्यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायचं. वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही. साधारणत: खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतॊ. इथपर्यंत वाट सोपी, पण चढणीची आहे. खिंडीत थोड्या वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटे उघडे देऊळ आहे. खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं. इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातला की आपण दरवाजाच्या खाली येतो. इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेशमूर्ती आहे. दरवाजा सुरुंगाने फोडलेला आहे. इथे मात्र वर चढताना काळजी घेणे आवश्यक आहे. प्रस्तर वेडेवाकडे असल्याने अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने चढाइ करणे योग्य शक्यतो पाठीवरचे सामान उतरवूनच चढावे. इथून प्रस्तरारोहणाची हौस भागवून वर चढले की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायर्या खोदलेल्या आहेत. वाटेत खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यावरूनच दुतर्फा खांद्यापर्यंत उंच झुडूपांतून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला थोडे खाली ,खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिने खाली गेल्यावर पाण्याची आणखी तीन टाकी आहेत. या टाक्यातील पाणी अतिशय सुंदर आल्हाददायक आहे. जवळच खडकात एक गुहा देखील आहे. |
राहाण्याची सोय : |
१० ते १२ माणसे गडावरील गुहेत व बाहेरच्या बांधीव कट्ट्यांवर राहू शकतात. परंतु उंदरांपासून सामानाची काळजी घ्यावी. |
जेवणाची सोय : |
आपण स्वत:च करावी. |
पाण्याची सोय : |
गडावरील टाक्यांत पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे. |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
'खोडकोना' गावापासून ३ तास. |
सूचना : |
पावसाळ्यात प्रस्तरारोहण धोक्याचे ठरू शकते. |