मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बल्लाळगड (Ballalgad) किल्ल्याची ऊंची :  500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा :  श्रेणी : सोपी
महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहे. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाला खेटुन बलाळगड किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. या भागात असणार्‍या इतर किल्ल्यांच्या मानाने (सेगवा, असावा, अशेरीगड इत्यादी) बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने अर्ध्या तासात किल्ला सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात.

काजळी गावात गोरखचिंचेचे (African Baobab) अनेक अवाढव्य वृक्ष पाहायला मिळतात. पोर्तुगिजांनी भारतात आणलेली ही दिर्घायुष्यी झाडे वसई परीसरातील किल्ल्यांच्या आसपास दिसुन येतात.
7 Photos available for this fort
Ballalgad
इतिहास :
केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात बल्लाळगड किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परीसर घेतला तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात मोरोपंताना ६००० ची फौज देउन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात बल्लाळगड स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकुन घेतला, तेंव्हा बल्लाळगड जिंकला असावा. पुन्हा इ.स. १७५४ मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने बल्लाळगड जिंकला.
पहाण्याची ठिकाणे :
बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलिकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेली आहे. महाराष्ट्रात अनेक वीरगळ आहेत त्याहून ही वीरगळ वेगळी आहे. या वीरगळावर एक योध्दा घोड्यावर बसलेला दाखवलेला आहे. याचा घोडा काठेवाडी पध्दतीचा आहे. सुण्दर सजवलेला आहे. त्या वीरगळावर सूर्य चंद्र दाखवलेले आहेत. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या या किल्ल्यावर वीरमरण आलेल्या वीराचा वीरगळ पाहाण्या सारखा आहे.
वीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालू लागावे. बल्लाळगडाचा माथा चार बुरुज व तटबंदीने संरक्षित केलेला आहे. त्यातील ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असुन ५ फ़ुट रूंद आहे. तटबंदी प्रचंड मोठे दगड वापरून ती बनवलेली आहे. तटबंदीमधे शौचकुप बनवलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत. त्यात दगड आणि पालापाचोळा पडल्याने ते भरून गेले आहेत. त्यांचे नक्की प्रयोजन कळत नाही. कदाजित धान्या किंवा दारुगोळा यांच्या साठवणुकीसाठी याचा वापर झाला असावा. हौदांची साफ़सफ़ाई झाल्यास त्यांचे नक्की प्रयोजन कळू शकेल.
पोहोचण्याच्या वाटा :
काजळी हे बल्लाळगडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १३० किमी वरील तलासरी गाठावे. त्यापुढे अंदाजे १९ किमीवर (मुंबई पासून १४९ किमीवर) काजळी गाव आहे. पण या गावाचा बोर्ड महामार्गावर न लावल्यामुळे गाव आल्याचे कळत नाही. या गावच्या बाहेर महामार्गा लगत (मुंबई कडून अहमादाबादला जाताना डाव्या बाजूला) काजळी गावाला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्या वरुन पुढे गेल्यावर गावातील शाळेपाशी पोहोचतो. या शाळेसमोरील टेकडीवर बल्लाळगड आहे.

रेल्वेने तलासरीला / अच्छाड/ भिलाड/ संजाण यापैकी कुठल्याही रेल्वे स्थानकावर उतरून स्टेशन बाहेर मिळणार्‍या खाजगी जीप/ओमनी या वाहानानी काजळी फ़ाट्यावर उतरावे. तेथुन चालत ५ मिनिटात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो.

शाळे समोर हातपंप आहे. त्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातून पाणी भरुन गड चढावा. कारण गडावर पाणी नाही आहे.

काजळी गावाच्या मागे बल्लाळगड आहे. गावाच्या शाळेसमोर एक गोरखचिंचेच झाड आहे. त्याच्या उजव्या बाजूने एक कच्चा रस्ता टेकडीवर जातो. परंतू या रस्त्याने न जाता डाव्या बाजुच्या मळलेल्या पायवाटेन १० मिनिटाचा खडा चढ चऊन आपण गडावर पोहोचतो.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही. गावतील शाळेत होऊ शकेल
जेवणाची सोय :
मुंबई - अहमादाबाद महामार्गावरील हॉटेलात होते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
काजळी गावातून १० मिनिटात बल्लाळगडावर पोहोचता येते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते मार्च
सूचना :
१) सेगवा आणि बल्लाळगड हे किल्ले एका दिवसात पाहून होतात.
2) सेगवागडची माहिती साईतवर दिलेली आहे.
जिल्हा Palghar
 अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  बल्लाळगड (Ballalgad)
 काळदुर्ग (Kaldurg)  कोहोजगड (Kohoj)  सेगवा किल्ला (Segawa)