मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हरिहर (Harihar) किल्ल्याची ऊंची :  3500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.

नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.

3 Photos available for this fort
Harihar
Harihar
Harihar
पहाण्याची ठिकाणे :
कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे.

पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला ५ पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते.

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
हर्षेवाडी मार्गे १ तास तर निरगुडपाडा मार्गे २ तास लागतात.
सूचना :
इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

मुळाक्षरानुसार इतर किल्ले: H
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  हरगड (Hargad)
 हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)
 हिराकोट (Hirakot)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)