मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

हरिश्चंद्रगड (Harishchandragad) किल्ल्याची ऊंची :  4000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माळशेज
जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम
ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पाश्वर्भूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे , तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाइची खिंड , आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो
8 Photos available for this fort
Harishchandragad
Harishchandragad Fort Map
Harishchandragad Fort Map
पहाण्याची ठिकाणे :
टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
१ हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :-
तळापासून या मंदिराची उंची साधारणत… सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ’मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनी खाली एक खोली आहे, यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ’चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलं होते अशी स्थानिक गावकर्‍यांची श्रध्दा आहे.

‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर
तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ।।
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिध्द गणी विरुयातु । सेविजे जो ।। हरिश्चंद्र देवता ।।
मंगळगंगा सरिता ।सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु ।
लिंगी जगन्नाथु ।महादेओ ।।
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।
आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा।। ‘

हे चांगदेवा विषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर, भिंतींवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर,
चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ।।
अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबार्‍यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

२ केदारेश्वराची गुहा :-
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्य…स्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.

३ तारामती शिखर
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची … उंची साधारणत: ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे.याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.

४ कोकणकडा
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत… ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे "इंद्रव्रज" दिसल्याची नोंद आहे. इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. येथील निसर्गसौंदर्यावर लुब्ध होऊन एका तरुणाने या कड्यावरून उडी घेतली त्याच्या नावाची संगमरवरी पाटी येथे आहे.

पोहोचण्याच्या वाटा :
हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोन ते तीन दिवसांची सवड काढली पाहिजे. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही अनेक आहेत.

१) खिरेश्वर गावातून :-
सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर, ५ कि.मी अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेली आहे. आतील गाभार्‍याच्या दाराच्या चौकटीवर शेषशायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन गणेशगणेशानी ,वृषभवाहक शीवपार्वती , हंसवाहन ब्रह्म सरस्वती, मयूरवाहन स्कंदषष्टी, नरवाहन कुबेरकुबेरी, मकरवाहन मकररति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला ’नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात.
अ) एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात हरीश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहचते. टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते.
ब) दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेणे आवश्यक आहे, कारण वाटेत कुठेच पाणी मिळत नाही.

२) नगर जिल्ह्यातून ( पाचनई मार्गे) :-
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई - नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर - पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किमी आहे.

३) सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग :-
गड सर करण्यासाठी सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग आहे. मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव आहे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्‍या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. येथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे १० ते १२ तास लागतात.

४) नळीची वाट :-
हरिश्चंद्रगडावर जाण्याची सर्वात कठीण वाट म्हणजे नळीची वाट आहे. नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून हरिश्चंद्रगड व बाजूच्या डोंगराच्या मधल्या अरूंद घळीतून कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. बेलपाडा गावात जाण्यासाठी, मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्‍या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन ओढा पार करावा लागतो. चार वेळा ओढा पार केल्यावर वाट कोकणकडा व बाजूचा डोंगर यांच्या मधल्या अरूंद घळीतून वर चढत जाते.ही वाट फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गाने कोकणकड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे ८ ते १२ तास लागतात.
राहाण्याची सोय :
गडावरील गुहांमध्ये ५० ते ६० जणांची राहाण्याची सोय होते. तसेच पैसे दिल्यास राहाण्यासाठी तंबू उपलब्ध होतात.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे.
पाण्याची सोय :
पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) खिरेश्वर मार्गे ४ तास लागतात. २) पाचनई मार्गे ३ तास लागतात. ३) साधले घाट मार्गे ८ ते १० तास लागतात. ४) नळीची वाट मार्गे ८ ते १२ तास
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Swargate   Khireshwar   14.00 via Shivajinagar   -   

मुळाक्षरानुसार इतर किल्ले: H
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  हरगड (Hargad)
 हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)
 हिराकोट (Hirakot)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)