जंगली जयगड
(Jangli Jaigad) |
किल्ल्याची ऊंची : 
3164 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: महाबळेश्वर कोयना |
जिल्हा : सातारा |
श्रेणी : मध्यम |
कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ धरण आहे. या धरणाच्या भिंतीजवळ कोयनानगर हे छोटस टुमदार गाव वसलेल आहे. या गावापासून १२ किमीवर जंगली जयगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर व आजूबाजूस असलेल्या दाट जंगलामुळे या किल्ल्याला जंगली जयगड हे नाव देण्यात आले होते. आजही या भागात दाट जंगल असून जंगलात वाघ, बिबटे, अस्वल इत्यादी प्राणी असल्याने या गडावर कोणीही रात्री मुक्काम करत नाही. घाटमाथ्याच्या टोकावर असणार्या या किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. या गडाचे स्थान पहाता याचा उपयोग कुंभार्ली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. हा किल्ला चढण्यास सोपा असून गर्द जंगलातून जाणार्या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
जंगली जयगड किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या फाट्यावर बांधलेला आहे. कोयनानगरच्या बाजूने सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथेच गडाचे उव्धस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते. गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते, या सुळक्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात. या सुळक्याच्या बाजूने पुढे गेल्यावर एक उव्धस्त/ पडके मंदिर दिसते. या मंदिरात देवीची पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. किल्ल्याच्या टोकावर भगवा झेंडा लावलेला आहे. किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. उजव्या बाजूस खाली कोळकेवाडी धरण व त्याच्या बाजूच्या डोंगरावरील कोळकेवाडी किल्ला दिसतो. समोरच्या बाजूस दूरवर चिपळूण शहर व वासिष्टी खाडी दिसते. जर वातावरण चांगल असेल तर समुद्राची निळी रेघही दिसते. डाव्या बाजूला खाली कुंभार्ली घाट दिसतो. किल्ला छोटा असल्यामुळे ३० मिनिटात पाहून होतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
चिपळूण - पाटण - कराड रस्त्यावर चिपळूण पासून ४३ किमीवर कोयनानगर गाव आहे. कोयना नगरहून नवजा गाव ११ किमी अंतरावर आहे. नवजा गावापर्यंत जाण्यासाठी कोयनानगरहून दर तासाला बसेस आहेत. नवजा गावापुढे "पंचधारा" या कोयनेवरील पहिल्या बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे, ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो. येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते. साधारण अर्ध्या तासाने आपण पाण्याच्या झर्याजवळ पोहोचतो. या झर्याला फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. येथेच एक सिमेंटचा चौथरा बांधलेला आहे. पुढे १५ मिनिटात आपण सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यास अर्धा तास लागतो. पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास (१ तास १५ मिनिटे) लागतो.
|
राहाण्याची सोय : |
गडावर रहाण्याची सोय नाही, कोयनानगर गावात आहे किंवा नवजा गावतील शाळेत मुक्काम करता येईल.
|
जेवणाची सोय : |
गडावर जेवणाची सोय नाही, कोयनानगर गावत आहे .
|
पाण्याची सोय : |
गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्यात जानेवारी - फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास (१ तास १५ मिनिटे) लागतो. |
सूचना : |
१) नवजा गावात गडावर जाण्यासाठी गाईड मिळतात त्यांना बरोबर घेउन जावे. कारण नवजा गावातून गडावर जातांना वाटेत जी चौकी लागते तेथून परवानगी असल्याशिवाय पुढे सोडत नाहीत.अशावेळी स्थानिक वाटाड्यांची मदत होते. २) किल्ल्याची वाट दाट जंगलातून जात असल्यामुळे नवजा गावातून वाटाड्या घ्यावा. ३) गडावरून कोकणात उतरण्यासाठी वाट नसल्यामुळे आल्या वाटेनेच खाली उतरावे. ४) कोळकेवाडी दुर्गाची माहिती साईटवर दिलेली आहे.
|