मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

काळदुर्ग (Kaldurg) किल्ल्याची ऊंची :  1550
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर
जिल्हा : पालघर श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे हे किल्ले मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत.
14 Photos available for this fort
Kaldurg
पहाण्याची ठिकाणे :
काळदुर्गला हा टेहळणीचा किल्ला होता. किल्ला गडमाथा आणि खालचे पठार या दोन स्तरांमध्ये विभागलेला आहे. गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा आहे. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गड चढायला सुरवात केल्यानंतर साधारण अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो. या पठाराला गडाची माची म्हणता येईल. येथून पुढे ठळक पायवाटेने आपण गडाच्या मुख्य डोंगराला भिडतो. मुख्य डोंगराचा खडा चढ चढल्यावर आपलं गडाच्या पहिल्या टाक्या पाशी पोहोचतो. टाक्यापासून आठ-दहा पावले वर चढून गेलो की आपण गडाच्या दुसर्‍या मुख्य माचीवर पोहोचतो. या माचीच्या डाव्या बाजूला मळलेल्या वाटेने चालत गेल्यावर दोन मिनिटात आपण गडावरील सर्वात मोठ्या टाक्यापाशी पोहोचतो. पुढे गेल्यावर आपल्याला कातळात खोदलेला गोल खड्डा दिसतो. टेहळणीसाठी बसणार्‍या पहारेकार्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी अशाप्रकारचे कातळकोरीव गोल खड्डॆ कोरलेले पाहायला मिळतात. या कातळ कोरीव खड्ड्याला लागून असलेल्या पायवाटेने आपण गड विरुद्ध दिशेने उतरायला सुरवात करावी. साधारणपणे १०-१५ मिनिटात आपण मेघोबाच्या मंदिर जवळ पोहोचतो. येथे आपल्याला भग्न अवस्थेतील शंकराची पिंड, नंदी व इतर काही मुर्ती दिसतात. उत्तर कोकणातील पाऊस प्रथम या मंदिरावर पडत असे अशी आख्यायिका आहे म्हणून या देवाला मेघोबा असे नाव पडले आहे. पुन्हा आल्या वाटेने गड चढून दुसर्‍या माचीपाशी यावे. या माचीवरुन गडमाथ्यावर जाण्यास २ ते ३ पायर्‍या आहेत. गडमाथ्यावर पाण्याचे एक टाके आहे. येथून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
वाघोबा खिंड मार्गे :-
मुंबईहून विरारमार्गे पालघर गाठावे. अथवा कल्याणहून एसटीने पालघरला जावे. पालघरहून मनोरेला जाणारी बसने ८ कि.मी. वरील ’वाघोबा’ नावाच्या देवळाच्या (’वाघोबा खिंड") थांब्यावर उतरावे. येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते. या ’वाघोबा’ देवळाच्या उजवीकडे जाणार्‍या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. ’हातपंप’ ही खूण लक्षात ठेवणे. हातपंपच्या समोरुन वर जाणारी वाट पकडावी. ही वाट पुढे तीन भागांत विभागली जाते. डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी, सरळ वर जाणार्‍या वाटेने काळदुर्ग गाठता येतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाघोबा खिंडीतून दीड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सर्व ऋतुत जाता येते.
डोंगररांग: Palghar
 आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  बल्लाळगड (Ballalgad)  गंभीरगड (Gambhirgad)
 काळदुर्ग (Kaldurg)  कोहोजगड (Kohoj)  सेगवा किल्ला (Segawa)  तांदुळवाडी (Tandulwadi)