कोर्लई
(Korlai) |
किल्ल्याची ऊंची : 
272 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : रायगड |
श्रेणी : मध्यम |
अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिर्याच्या दिशेने निघालो की, १५ किमी वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ८ किमी वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. कोर्लईपर्यंत बसने जाता येते. इथून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे, कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी ‘कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे‘ असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे व एका बाजूला जमिन आहे.
|
|
इतिहास : |
१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत
:च एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्या बुर्हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.
|
पहाण्याची ठिकाणे : |
लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्या चढून आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. इथून आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला दिसतो. चिंचोळ्या डोंगरमाथ्यामुळे किल्ल्याची रूंदी कमी आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे व डावीकडे प्रवेशव्दारे दिसतात. ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर २ तोफा दिसतात. पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते, याच्या माथ्यावर ४ तोफा पाहायला मिळतात. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला पांढर्या देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. त्याच्या समोर पाण्याची टाकी आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून टाकी वरून बांधून काढलेली आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर माथ्यावर शिलालेख असलेल्या प्रवेशद्वारातून आपण चर्च समोर येतो. येथे एका वाड्याचे जोत आहे. डाव्या बाजूला (पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली ऊतरण्यासाठी पायर्या आहेत. या पायर्यांवर एक शिलालेख पडलेला आहे. प्रवेशद्वाराच्या रचनेवरून असे वाटते की, पूर्वीच्या काळी हेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असावे.चर्च वरुन पुढे गेल्यावर अजून एक प्रवेशद्वार आहे. पुढे अष्टकोनी बुरुज आहे. या बुरुजावरुन वाट दक्षिण टोका वरील बुरुजांकडे जाते. या बुरुजांवर तोफा आहेत.बुरुजांखाली खंदक खोदलेला आहे.
दक्षिण टोकावरुन परत लाईट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन आता डाव्या बाजूची २ प्रवेशद्वारे ऒलांडून गेल्यावर उतार चालू होतो. समोर अर्धगोलाकार पसरलेली तटबंदी व त्यामागे पसरलेला अथांग सागर यांचे दर्शन होते. या तटबंदीत पूर्वेला एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर समुद्रावर एक जेटी बांधलेली आहे. पश्चिमेला तटबंदीत एक दरवाजा आहे. उत्तर टोकाला एक बुरुज आहे. यावर ४ तोफा व क्रुस आहे. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रूज म्हणतात. येथे आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मुरुड जंजिर्याला जाणारी बस आपल्याला गावाच्या वेशीवर सोडते अथवा आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने जाऊन २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो . गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो. १) अलिबागहून मुरुड जंजिर्याला जाणार्या रस्त्यावर रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो , तर डावीकडचा रस्ता बिर्ला मंदिराकडे (गणपती मंदिर) जातो. उजवीकडच्या रस्त्याने कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर समुद्रकिनारा व किल्ला यांच्या मधून कच्चा रस्ता लाईट हाऊस पर्यंत जातो. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्या चढून आपण १० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. २) कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरुन डोंगर चढून गेल्यावर एक खंदक लागतो. खंदक पार केल्यावर आपण कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास ४० मिनीटे लागतात.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, रेवदंडा किंवा मुरूडला राहण्याची सोय होऊ शकते.
|
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत
: करावी.
|
पाण्याची सोय : |
गडावर पाण्याची टाकी आहे. पाणी काढण्यासाठी आपल्या बरोबर दोर आणि बादली घेऊन जावी.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
कोर्लई गावातून चालत किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्या चढून जाण्यास १५ मिनीटे लागतात. |