मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मार्कंड्या (Markandeya) किल्ल्याची ऊंची :  4383
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.
8 Photos available for this fort
Markandeya
इतिहास :
शहाजाहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने वर उल्लेख केलेले सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो.
वणी - दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले.
पहाण्याची ठिकाणे :
मार्कंड्या व रवळ्या - जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, ती मुलनबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडावर चढताना पहिला टप्पा पार पडल्यावर आपण पठारावर येतो, ही गडाची माची आहे. माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या; बांधलेल्या पायर्‍या दिसतात. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना "ध्यान गुंफा" म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला "कमंडलू तीर्थ" म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरुन सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
नाशिक - सापूतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किमी वर वणी गाव आहे. वणी गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणी पासून ९ किमी वर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किमी वरील मुळाणे खिंडीत येतो. येथ पर्यंत एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या - जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.
याशिवाय सप्तशृंगीचा डोंगर व मार्कंड्या यांच्या मधील खिंडीतूनही खडया चढणीच्या वाटेने गडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावरील कमंडलू तीर्थ या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मुळणबारी (मुळाणे) खिंडीतून १ तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...