मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर)
(Mirgad(Songir)) |
किल्ल्याची ऊंची : 
1862 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: रायगड |
जिल्हा : रायगड |
श्रेणी : मध्यम |
पेण शहराजवळ मिरागड हा कोणतेही अवशेष नसलेला किल्ला आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर होता. तो डोंगर, मिर्या डोंगर ह्या नावाने प्रसिध्द आहे. या डोंगराचे स्थान पाहाता मिरगडचा उपयोग टेहळणीसाठी (वॉच टॉवर) केला गेला असावा. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो. मिरगड हा सोनगिर या नावानेही ओळखला जातो.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
गडावर आता कुठलेही अवशेष नसले तरी हा ट्रेक अतिशय सुंदर व ट्रेकर्सचा कस पहाणारा आहे. मिरगड चढतांना डावीकडे माणिकगड व मागे कर्नाळा किल्ल्याचे दर्शन होते. गडाच्या माचीवर अंदाजे ४०० वर्ष जुने व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाच्या बाजूने वर येण्यासाठी सुबक पायर्या आहेत. बाजुला लहानसे कुंड आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजुस खांब आहेत. मंदिरात शिवलिंग आहे. देवळाला वळसा घालून मागील बाजूस उतरल्यावर पावसाळ्यात १०० फूटावरुन पडणारा धबधबा दिसतो. इथून तळकोकणाचे सुरेख दृश्य दिसते.
गडाच्या माचीवरून समोर दोन शिखरे दिसतात, त्यातील डाव्याबाजूच्या शिखरावर घरांची जोती पाहायला मिळतात.पुन्हा खिंडीत येउन उजव्या बाजूच्या शिखरावर गेल्यावर मंदिराच जोतं दिसत. त्याच्या पुढे एक सुकलेल पाण्याच टाक व वास्तुचे अवशेष पाहायला मिळतात.त्याच्या पुढे उत्तरेला एक सुकलेल पाण्याच टाक पाहायला मिळते. मिरा डोंगराच्या वाटेवर लागणार्या छोट्याछोट्या धबधब्यांसाठी व व्याघ्रेश्वर मंदिरामागील मोठ्या धबधब्यासाठी हा ट्रेक पावसाळ्यात करणे सर्वात उत्तम.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
कोकण रेल्वेने पेण नंतरच्या कासू स्थानकावर उतरायचे. कासू पासून ‘पाबळ’ फाट्यावर जाणार्या अनेक रिक्षा आहेत. ‘पाबळ’ फाट्यावरुन ‘कोंढवी’ गाव ९ किमी अंतरावर आहे. ‘कोंढवी’ गावातून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. तसेच ‘कोंढवी’ च्या पुढे ३ किमी अंतरावर ‘झापडी’ गावातून सुध्दा किल्ल्यावर जाणारी वाट आहे. ही वाट साधी सोपी सरळ कमी दमझाक करणारी आहे. या दोन्ही गावातून किल्ल्यावर जाणार्या वाटा एका पठारावर येऊन मिळतात. ‘झापडी’ गावात उतरल्यावर रस्त्याच्या डावीकडच्या डोंगरसोंडेवर चढायचे. पाऊण तासातच आपण एका पठारावर पोहोचायचे. पठारावरुन उजवीकडची वाट धरायची. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे पठारावर जिथून उजवीकडे वाट वळते, तिथे एक डेरेदार वृक्ष आपल्याला सावली देण्यासाठी उभा आहे. येथून समोर पाहिल्यावर आपल्याला चार उंचवटे दिसतात. यापैकी नक्की किल्ला कुठला ? हा प्रश्न आपल्याला मनात आल्याशिवाय राहत नाही. डावीकडून दुसरा उंचवटा म्हणजे आपले इच्छित स्थळ किल्ले ‘मिरगड / सोनगिरी’. पठारावरुन वाट सरळ एका धनगरवाडीत जाते. पहिल्या उंचवट्याच्या डावीकडून एक वाट पलिकडच्या कोंढवी गावात उतरते, तर एक वाट डोंगराच्या दिशेने पुढे सरकते ही वाट या किल्ल्याला डावीकडे ठेवत तिरपी तिरपी दोन शिखरांमधील खिंडीत पोहोचते. येथून गडमाथ्यावर जाण्यास १० मिनिटे लागतात.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
|
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
कोंढवी मार्गे २ तास लागतात. झापडी मार्गे सव्वा तास लागतो. |
सूचना : |
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पाण्याचा भरपूर साठा स्वत: जवळ बाळगावा
|