मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रामशेज (Ramshej) किल्ल्याची ऊंची :  3270
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पेठ, नाशिक
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जवळील रामशेज किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ ५।। (साडे पाच) वर्षे सतत झुंज दिली. या मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करुन ठेवण्यासारख्या पराक्रमाचे वर्णन मात्र आपल्याला मोगलांच्या कागदपत्रातून मिळते. तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत साडे पाच वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात आहे. असा हा किल्ला नाशिक पासून जवळ असल्याने एका दिवसात, किल्ला आणि जवळ असणारी चामर लेणी (चांभार लेणी) आरामात पाहून होतात.
6 Photos available for this fort
Ramshej
Ramshej
Ramshej
इतिहास :
रामशेज म्हणजे रामाची शय्या. श्रीराम वनवासात असतांना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला "रामशेज" हे नाव मिळाले.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते. अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही.
मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली.
शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या मार्‍याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्‍या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली. या योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहीत्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा.त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसर्‍या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.
किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या प्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली.
या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला.
त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला रामशेजवर पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक मोगलांना दाखवली.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे. किल्ला डावीकडे ठेवत जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पायर्‍या लागतात. गडावर शिरतांना गुहा दिसते. या गुहे पर्यंत जाण्यासाठी छोटासा सोपा कातळ टप्पा चढून जावे लावते. या गुहेत पाण्याचे कोरडे टाकं आहे. गुहेत पिंड ठेवलेली आहे. या गुहेचा उपयोग पाण्याच्या साठ्या बरोबरच टेहळणी करता होत होता. गुहा पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पायर्‍यांच्या वाटेने वर चढल्यावर रामाचे मंदिर असलेली गुहा आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. यामधील पाणी पिण्यायोग्य आहे. श्रीरामाचे दर्शन घेऊन गुहे समोरच्या तुटलेल्या पायर्‍या आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दारातून थेट गडावर घेऊन जातात. गडावर प्रवेश करतो तेथे गडमाथा चिंचोळा आहे. येथून उजव्या बाजूला लांबवर परसरलेला डोंगर माथा आहे. तर डाव्या बाजूला पठार आहे.

गडावर प्रवेश केल्यावर गडमाथ्यावर समोरच एक छोटा कमान असलेला दरवाजा आणि त्यातून उतरणारी बांधीव पायर्‍यांची वाट दिसते. या पायर्‍या उतरुन खाली गेल्यावर एक मोठे कोरडे खांब टाके आहे. टाक्याच्या समोरच्या बाजूला दगडी बिंत बांधून टाके संरक्षित केलेले आहे. त्याच बरोबर टेहळाणीसाठी आणि मार करतांना आडोसा (लपण्यासाठी) या भिंतीचा उपयोग होत होता. टाके पाहून गड माथ्यावर येऊन पठाराकडे जावे. वाटेत उध्वस्थ वाड्याचे अवशेष आणि दोन कातळ कोरीव टाकी लागतात. येथून वर जाणारी वाट गडाच्या टोकापाशी घेऊन जाते. येथून खालचे गाव, नाशिक - पेठ रस्ता आणि त्या रस्त्यावर नविनच उभारलेले भव्य प्रवेशव्दार दिसते. या पठारावर नवीन उभारलेला झेंड्याचा खांब आहे. या झेंड्याला वळसा घालून पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन वर चढत जाणार्‍या वाटेने थोडे वर चढुन गेल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाच पाण्यांच्या टाक्याचा समुह दिसतो. याच ठिकाणी उजव्या बाजूला डोंगर उतारावरील वाहात येणारे पाणी दगडी भिंत बांधून अडवून छोटासा तलाव बनवलेला पाहायला मिळतो.

येथे थोडे आणखी वर चढून गेल्यावर आपण देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिरात नवरात्रात मोठा उत्सव असतो. मंदिराच्या समोर एका झाडाखाली गणपतीची पुरातन मुर्ती आहे. मुर्तीच्या समोरच्या भागात वास्तूचे अवशेष आहेत. गजाननाचे दर्शन घेऊन पायवाटेवर येउन गडमाथ्याकडे चढत जातांना डाव्या बाजूला घरांचे अवशेष आहेत. येथून वर चढून जाण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या अस्पष्ट पायवाटेने चालत गेल्यावर आपण तीन टाक्यांच्या समुहापाशी पोहोचतो. ही टाकी पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर परत येऊन गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोर ३ पाण्याची टाकी खोदलेली दिसतात. चौथे छोटे टाके या टाक्यांच्या काटकोनात कोरलेले आहे. या टाक्यांपर्यंत पाणी आणण्यासाठी आणि टाकी भरल्यावर खालच्या बाजूला असलेल्या टाक्यात पाणी जाण्यासाठी कातळात चर खोदलेले आहेत. टाक्यांच्या पुढे एका उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. हा गडाचा सर्वोच्च माथा आहे. येथून भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला, चामर लेणी (चांभार लेणी) हा परिसर दिसतो.

गडमाथ्यावरुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या टोकापाशी पोहोचतो. येथे उजव्या बाजूला खाली उतरुन गेल्यावर कड्यावर ५ मोठ्या टाक्यांचा समुह आहे. यातील शेवटच्या टाक्या पासुन पुढे चालत गेल्यावर खालच्या बाजूस कड्याच्या टोकाला एक चौरस टाके आहे . हे टाके पाहून पायवाटेने थोडे वर चढून गेल्यावर ३ मोठ्या टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. या टाक्यांच्या जवळून एक वाट खाली उतरत कड्यापाशी जाते. या ठिकाणी किल्ल्याचा गुप्त दरवाजा आहे . आत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. आत काट क्प्नात वळणार्‍या वाटेवर दोन कमान असलेले दरवाजे आहेत. मधल्या भागात छ्तावर सुंदर कमळ कोरलेले आहे. हा पूर्ण गुप्त दरवाजा मोक्याच्या जागी दगडात बांधून काढलेला आहे.

गुप्त दरवाजा पाहून पायवाटेने पुढे चालत गेल्यावर आपण देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस पोहोचतो. येथून मुख्य पायवाटेने किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ यावे . या प्रवेशव्दाराच्या बाजूला चुन्याच्या घाण्यासाठी बांधलेला दगडी गोल चर पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला कातळात कोरलेल्या पायर्‍या आणि प्रवेशव्दार आहे . पायर्‍यांनी खाली उतरल्यावर प्रवेशव्दारा समोर थोडी मोकळी जागा आहे. येथे पायर्‍या खोदलेल्या आहेत त्या किल्ला चढतांना आपल्याला जी राम मंदिराच्या बाजूला गुहा लागलेली तीच्या छता पर्यंत जातात. याठिकाणी गुहेच्या छतात छोटे भोक आहे. पण त्यातून माणूस किंवा प्राणी आरपार जाऊ शकत नाही. या मार्गाचे कोरीवकाम अर्धवट ठेवलेले आहे.

हा कातळात कोरुन काढलेला दरवाजा आणि पायर्‍यांचा मार्ग बघून पुन्हा उध्वस्त प्रवेशव्दाराशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड फ़ेरीस एक तास लागतो
पोहोचण्याच्या वाटा :
पेठ मार्गे :-
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’ कडे जाणारी एस टी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात जावे. गावातून समोरच किल्ला दिसतो. किल्ला डाव्या बाजूला ठेवून वळसा घालून जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाते. या वाटेने गड गाठण्यास १ तास लागतो.
खाजगी वहानाने किल्ल्याच्या पायथ्याशी बनवलेल्या वहानतळा पर्यंत थेट जाता येते. त्यासाठी आशेवाडी गावाच्या फ़ाट्यावरुन गावात न जाता थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक भव्य कमान आणि त्यातून जाणारा रस्ता दिसतो. हा रस्ता गावा बाहेरुन थेट गडा खालील वाहानतळावर जातो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी मंदिर आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आशेवाडी गावातून १ तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...