सिताबर्डी किल्ला
(Sitabuldi fort(Sitabardi Fort)) |
किल्ल्याची ऊंची : 
400 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : नागपूर |
श्रेणी : सोपी |
नागपूर शहरात रेल्वे स्टेशनपासून जवळच सिताबर्डीचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात इसवीसन १८१७ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्या मध्ये लढाई झाली होती. सिताबर्डीचा किल्ला आर्मीच्या (११८ इंफ़ेंट्री बटालियनच्या) ताब्यात असल्यामुळे तो फ़क्त २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट याच दिवशी सामान्य पर्यटकांसाठी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० खुला असतो. पण या तीनही दिवशी किल्ला पाहाण्यासाठी तुफ़ान गर्दी असते. अक्षरश: धक्काबुक्की करत किल्ल्यावर फ़िरावे लागते. किल्ला ब्रिटीश आर्मी आणि नंतर भारतीय आर्मीच्या ११८ इंफ़ेंट्री बटालियनच्या अख्यातरीत असल्याने किल्ल्याचे अनेक भाग पाहाता येत नाहीत. किल्ला इतके वर्षे सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे मुळ किल्ल्यात आणि त्यावरील वरील वास्तूंमध्ये सोयीप्रमाणे बदल केलेले आहेत.
|
|
इतिहास : |
शितलाप्रसाद आणि बद्रीप्रसाद हे दोन यदुवंशिय गवळी राजे राज्य करत होते. त्यांच्या नावावरुन या किल्ल्याला शितलाबद्री असे नाव पडले होते. ब्रिटीशांनी त्या नावाचा अपभ्रंश शिताबुल्डी असा केला तस स्थानिक नाव सिताबर्डी असे पडले. इसवीसन १८१७ मध्ये नागपूरकर मुधोजी (आप्पासाहेब) भोसले आणि इस्ट इंडीया कंपनी (इंग्रज) यांच्या मध्ये सिताबर्डी येथे झालेल्या लढाईत नागपूरकर भोसल्यांचा पराभव झाला. इंग्रजांच्या इसवीसन १८५७ च्या उठावा नंतर टिपू सुलतानचा नातू नवाब कादर अली आणि त्त्याच्या ८ साथिदारांना इंग्रजांनी या किल्ल्यात फ़ाशी दिली होती. १० एप्रिल १९२३ ते १५ मे १९२३ या काळात महात्मा गांधींना या किल्ल्यात तुरुंगात ठेवण्यात आले होते. किंग जॉर्ज (पाचवा) आणि राणी मेरी नागपूरात आले होते तेंव्हा त्यांनी किल्ल्यातून नागपूरकरांना दर्शन दिले होते.
|
पहाण्याची ठिकाणे : |
किल्ला ११८ इंफ़ेंट्री बटालियनच्या अख्यातरीत असल्याने किल्ल्याचे अनेक भाग पाहाता येत नाहीत. किल्ला मोठी टेकडी आणि लहान टेकडी या दोन टेकड्यांवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेव्दारातून आत शिरल्यावर टेकडीवर जाणारा अरुंद रस्ता दगड फ़ोडून बनवलेला आहे. या रस्त्याने आपण किल्ल्यावर पोहोचतो. या ठिकाणी ब्रिटीश काळात बांधलेल्या काही इमारती आहेत. पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक स्तंभ उभारलेला आहे. किंग जॉर्ज (पाचवा) आणि राणी मेरी नागपूरात आले होते त्याची आठवण म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला होता. स्तंभ पाहून पायवाटेने पुढे गेल्यावर आपण दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. बोगद्या सारखी रचना असलेल्या या प्रवेशव्दाराच्या आत पायर्या आहेत. त्या पायर्या चढून गेल्यावर आपण नवगज अली बाबाचा दर्गा (मसजिद) येथे पोहोचतो. टिपू सुलतानचा नातू नवाब कादर अली आणि त्त्याच्या ८ साथिदारांना इंग्रजांनी या किल्ल्यात फ़ाशी दिली होती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दर्गा उभारण्यात आला होता. या दर्ग्या समोरील इमारतीत महात्मा गांधींना तुरुंगात ठेवण्यात आले होते. या इमारतीच्या पुढे डाव्या बाजूला किल्ल्याचे अजून एक प्रवेशव्दार आहे . पण तेथे जाण्यास बंदी आहे. किल्ल्यात पुढे गेल्यावर तटबंदी जवळ किल्ल्याच्या आतल्या बाजूला एक बांधीव खंदक आहे. खंदक पाहून पुढे गेल्यावर एक विहिर आहे. किल्ल्यावर ब्रिटीशकालिन तोफ़ा आहेत. किल्ल्यातून बाहेर पडायच्या वाटेवर एक प्रवेशव्दार आहे, त्याच्या बाहेर ब्रिटीशकालिन मोठी तोफ़ ठेवलेली आहे ती किल्ल्यावर २०१४ मध्ये सापडलेली आहे. किल्ला सैन्याने आखलेल्या मार्गा प्रमाणेच पाहावा लागत असल्याने किल्ल्याचे सर्व भाग पाहाता येत नाहीत. |
पोहोचण्याच्या वाटा : |
नागपूर शहरात रेल्वे स्टेशनपासून जवळच सिताबर्डीचा किल्ला आहे. |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही . |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी आहे .
|
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
फ़क्त २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट याच दिवशी सामान्य पर्यटकांसाठी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० खुला असतो. |