मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
तळगड (Talgad) | किल्ल्याची ऊंची :  1000 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: रोहा | ||||
जिल्हा : रायगड | श्रेणी : मध्यम | ||||
रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत. त्यापैंकी तळागड हा किल्ला कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर बांधलेली कुडा लेणी आणि तळागड , घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत अजूनही उभे आहेत. |
|||||
|
|||||
इतिहास : | |||||
इ.स.१६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला. |
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
किल्ला तसा लहान आहे. त्यामुळे याचा घेरापण लहान आहे. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी अजूनही शाबूत आहे. अनेक ठिकाणचे बुरुज आजही चांगल्या स्थितित आढळतात. किल्ल्यात शिरतांना पडझड झालेला दरवाजा लागतो तो म्हणजे हनुमान दरवाजा. या हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपर्यात मारुतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. येथेच खडकात कोरलेले खांब टाके आहे.टाक्या जवळच प्रवेशव्दारावरील शरभाचे शिल्प पडलेले आहे. दरवाजातून आत गेल्यावर गडमाथ्यावर प्रवेश करण्यापूर्वी बांधीव पायर्या व प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाथ्यावर उजव्या बाजूला दोन मजली भक्कम बुरूज पाहायला मिळतो. थोड्याच अंतरावर मंदिराचे जोत व ३ पाण्याची टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर कातळात खोदलेली सात पाण्याची टाकी त्याच्या पुढे लक्ष्मी कोठार नावाची वास्तू पाहायला मिळते. पुढे उत्तरेकडे चालत गेल्यावर टोकावर बुरुज आहे. गडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात.किल्ल्यावरून घोसाळगड, मांदाड खाडी,. कुडा लेण्यांचा डोंगर असा सर्व परिसर दिसतो. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
मुंबई - गोवा महामार्गावर मुंबई पासून १२८ किमी अंतरावर इंदापूर गाव आहे. इंदापूर गावापासून तळागाव १५ किमी अंतरावर आहे. इंदापूर गावातून रिक्षा किंवा बसने तळा गावात जाता येते. तळागावातूनच किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट आहे.गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे. या वाटेने गडावर जातांना पहिल्या टप्प्यावर एक छोटीशी सपाटी लागते. दुसरा टप्पा म्हणजे गडाच्या माचीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच होय. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. इंदापूरला जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. दिव्याहून सकाळी ६.०० वाजता सुटणारी दिवा - मडगाव पॅसेंजर ९.३० वाजता इंदापूरला पोहोचते.संध्याकाळी मडगाव - दिवा पॅसेंजर इंदापूरला १५.५५ वाजता आहे. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. | |||||
जेवणाची सोय : | |||||
तळागावात हॉटेल्स आणि भोजनालये आहेत. | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे. | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
तळा गावातून अर्धातास लागतो. | |||||
सूचना : | |||||
१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने , तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात. २) घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड या किल्ल्याण्ची माहिती साईटवर दिलेली आहे. |
डोंगररांग: Roha | अवचितगड (Avchitgad) | बिरवाडी (Birwadi) | घोसाळगड (Ghosalgad) | तळगड (Talgad) |