मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

टंकाई (टणकाई) (Tankai) किल्ल्याची ऊंची :  2818
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्‍या सुरत - औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात.मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक/पर्यटक फ़ारसे येत नाहीत.


अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.
14 Photos available for this fort
Tankai
Tankai
Tankai
इतिहास :
अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात. इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.इ.स. १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
अंकाई गावातून किल्ल्याच्या पायथ्याच्या पर्यंत रस्ता आहे. हा रस्ता शाळे जवळुन जातो. तेथे रस्त्याच्या बाजुला उघड्यावर गणेश मुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. अशीच एक मोठी वीरगळ शाळेच्या विरुध्द बाजूस आहे. या चार फ़ूट उंच चौकोनी वीरगळीवर ख्हालच्या पट्टेवर चारही बाजूंना मुर्ती शिल्प कोरलेली आहेत. त्यात रान डुकराची शिकार करतानाच शिल्प आहे. वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. ही वीरगळ पाहून परत शाळेपाशी येउन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जावे. रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्‍या बांधलेल्या आहे. पायर्‍यांनी आपण १० मिनिटात लेण्यांपाशी पोहोचतो. लेणी दोन स्तरावर बांधलेली आहेत. पहिल्या स्तरावर दोन लेणी आहेत. त्यातील दुसर्‍या लेण्याच्या समोर पाण्याच टाकं आहे. या लेण्यामधे मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. ही २ लेणी पाहुन १०-१५ पायर्‍या चढुन गेल्यावर, ५ लेणी खोदलेली पाहायला मिळतात. हि लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. यातील पहिली दोन लेणी दोन मजली आहेत. त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली आहे. सभा मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या टोकाला छताला आधार देणारे यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. दुसर्‍या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजुला यक्षाची मुर्ती आणि उजव्या बाजुला इंद्राणीची मूर्ती आहे. इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. पहिल्या मजल्या वरच्या दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. जाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. तिसर्‍या लेण्यात ओसरीत दोन मुर्ती आहेत. डाव्या बाजुची मुर्ती किचकाची आणि उजव्या बाजुची मुर्ती अंबिकेची आहे. पाचव्या लेण्यात तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत.

लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला दोनही किल्ल्यांच्या मधिल खिंड तटबंदी बांधुन सुरक्षित केल्याच पाहायला मिळत. या तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. ओबडढोबड पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटात आपण अंकाई आणि टंकाईच्या पहिल्या दक्षिणाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या बाजुला दोन भव्य बुरुज आहेत. या बुरुजां पासुन सुरु झालेली तटबंदी अंकाई आणि टंकाई या दोनही किल्ल्यांपर्यंत जाते. दरवाजाचे लाकडी अवशेष अजुनही काही प्रमाणात टिकुन आहेत.दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर पाहारेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या दिसतात. पुढे थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला , डाव्या बाजुला अंकाई किल्ला आणि समोर वायव्य दरवाजा (मनमाड दरवाजा) दिसतात. या मनमाड दरवाजातून खाली उतरुन त्याची भव्यता अनुभवता येते. अशा प्रकारे दोन डोंगरामधिल खिंडीचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रवेशव्दारांची आणि तटबंदीची रचना केलेली येथे पाहायला मिळते.

टंकाईवर जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. जिथे कातळ खोदण शक्य नाही तिथे पायर्‍या बांधुन काढलेल्या आहेत. या कातळकोरीव पायर्‍यांनी किल्ला चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजुला एक छोट टाक दिसत त्याच्या पुढे एक मोठ टाक आहे. या टाक्यात पाणी आणण्यासाठी वर पासुन या टाक्यापर्यंत कातळात पन्हाळी खोदलेली दिसते. थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर डाव्या बाजुला पाण्याची तीन मोठी टाकी एकापुढे एक आहेत. त्यातील दोन खांब टाकी आहे. सर्व टाकी कोरडी असुन त्यात झाड झाडोरा माजलेला असल्यामुळे पटकन दिसत नाहीत. ही टाकी पाहुन परत पायर्‍यांच्या मार्गावर येउन डावीकडे गेल्यावर एक वाट कातळाच्या धारेवरुन जाते. या वाटेने डोंगराला वळसा घालुन ५ मिनिट चालल्यावर आपण कातळात कोरलेल्या गुहांपाशी येतो. या गुहांच्या वरच्या बाजुस एक पाण्याच टाक आहे. कातळ टप्पा चढुन जाउन हे टाक पाहाता येत. कातळ टप्पा चढणे शक्य नसल्यास परत पायर्‍यांपाशी येउन कातळात कोरलेल्या पायर्‍या संपुन जिथे बांधीव पायर्‍या चालु होतात तिथे पर्यंत जाउन डावीकडील कातळ धारेवरुन जाणार्‍या मार्गाने ५ मिनिटात टाक्यापाशी पोहोचता येते. गुहा आणि हे टाक आपल्याला टंकाई किल्ला चढतान दिसत नाही. त्यामुळे ते कुठे आहे याचा नक्की अंदाज येत नाही. याठिकाणी जाणारी वाट सुध्दा मळलेली नाही. अंकाई किल्ला चढताना चौथ्या दरवाजाच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेतून ही टाकी आणि गुहा दिसते.

टाकं पाहुन परत आल्यावर बांधीव पायर्‍या आहेत. त्या चढल्यावर आपण बुरुजावर येतो. पुढे परत कातळकोरीव पायर्‍या आहेत. त्या चढुन गेल्यावर आपण किल्ल्यच्या पश्चिमाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराची लाकडी चौकट अजुनही शाबुत आहे. इथुन समोरचा अंकाई किल्ला आणि आजुबाजूचा परीसर अप्रतिम दिसतो. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर देवड्या आहेत. देवड्यांच्या तटबंदीला लागुन एक खोली बांधली आहे त्यात एक पीर आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुच्या टेकडीवर किल्ल्याच प्रशस्त पठार आहे. एखाद फुटबॉल स्टेडीयम बसेल इतक प्रशस्त आणि सपाट आहे. टेकडीच्या उजव्या बाजूला उतार आणि त्याच्या पुढे दरी आहे. आपण प्रथम टेकडी चढुन पठारावर न जाता दरी उजव्या बाजुला आणि मधली टेकडी डावीकडे ठेवत चालत जाव. वाटेत एक बुरुज आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहुन टेकडीच्या दिशेने येताना उतारावर एकमेव खजुराच झाड दिसते. ते झाड एका पूर्ण बुजलेल्या टाक्यात आहे. त्या टाक्याच्या बाजूला आणखी ४ टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहुन तिथुनच टेकडीवर चढुन गेल की लांबलचक पठार आणि त्यावरील दोन वास्तु दिसतात. त्या वास्तूं पर्यंत चालुन गेल्यावर ते एक उध्वस्त शिवमंदिर असल्याच दिसत. या हेमाडपंथी मंदिराचे छत कोसळलेले आहे. पण उर्वरीत अवशेषांवरुन मंदिरावरील कोरीवकामाची आणि त्याच्या सौंदर्‍याची कल्पना येते. मंदिराच्या गाभार्‍यात पिंड आहे. सभामंडपातील नंदीही अजुन शाबुत आहे. मंदिरा समोर कातळात खोदुन काढलेला तलाव आहे. किल्ल्यावरील दुसरी वास्तू म्हणजे एक समाधी आहे. या दोन वास्तू पाहुन किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे सरळ चालत गेल्यावर किल्ल्याचा डोंगर निमुळता होत जातो. या ठिकाणी उतारावर दोन कोरडी टाकी आहे. समोरच एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. त्या वाड्याच्या मागे किल्ल्याच्या निमुळत्या टोकावरचा शेवटचा बुरुज आणि तटबंदी आहे. बुरुज पाहुन परत येताना किल्ल्याच्या दक्षिणेकडुन (दरी उजव्या बाजुला ठेउन) चालत आल्यास वास्तुंचे चौथरे पाहयला मिळतात. हे सर्व पाहुन प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते.

टंकाई किल्ल्यावरुन पश्चिमेला अंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ले दिसतात. संपूर्ण किल्ला पाहाण्यास १.३० ते २.०० तास लागतात.अंकाई गावातून टंकाई किल्ल्यावर जाण्यास पाउण तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेल आहे. मनमाड -औरंगाबाद रस्त्यावर मनमाड पासुन १० किमीवर अंकाई गाव आहे. गावातील शाळेजवळुन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्‍या एसटीने अंकाई गावाच्या फाट्यावर उतरुन १ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
अंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोइच आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
मनमाड औरंगाबाद हायवे वर जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
अंकाई गावातून टंकाई किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी
डोंगररांग: Satmaal
 अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अंकाई(अणकाई) (Ankai)  चांदवड (Chandwad)
 धोडप (Dhodap)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  जवळ्या (Jawlya)  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))
 रवळ्या (Rawlya)  टंकाई (टणकाई) (Tankai)