मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वसंतगड (Vasantgad) किल्ल्याची ऊंची :  2950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
कराड - चिपळूण रस्त्यावर अनेक किल्ले आहेत. त्यापैकी वसंतगड हा किल्ला त्याच्या पायथ्याशी, तळबीड गावात असलेल्या सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या समाधीमुळे प्रसिध्द आहे.
दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.
27 Photos available for this fort
Vasantgad
Vasantgad
Vasantgad
इतिहास :
या किल्ल्याची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते. २५ नोव्हेंबर १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ठेवले ‘किली द फतेह’ म्हणजे यशाची किल्ली असे ठेवले. नंतर १७०६ मध्ये मराठ्यांनी परत हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये वसंतगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :
तळबीड गावातून गडावर जाणार्‍या पायवाटेने गड माथ्यावर प्रवेश करतांना भग्न अवस्थेतील उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या तटबंदित गणेशाची सुबक मुर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या कातळात कोरलेल्या पायर्‍य़ा चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होते. गडमाथा प्रचंड मोठा आहे त्यामुळे गडावरील सर्व अवशेष व्यवस्थित पाहाण्यासाठी तटबंदीवरुन गडाला संपूर्ण फ़ेरी मारावी त्यानंतर किल्ल्याच्या मधल्या भागातील अवशेष पाहावेत.

प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर डावीकडची वाट धरावी, समोरच मोठे हनुमानाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे एक विहीर आहे. हे पाहून तटबंदीच्या दिशेने जावे. गडाची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी शाबूत आहेत. तटबंदीवरुन पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज दिसतो. या बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍्या आहेत. बुरुजावरुन किल्ल्यच्या बाहेर आ्णि आत दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवता येते. बुरुजा जवळ एक कातळात कोरलेले टाक आहे. थोडे पुढे चालत गेल्यावर तटबंदीतील शौचकुप पाहायला मिळते. तटबंदीवरुन पुढे गेल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावरील बुरुजापाशी पोहोचतो. बुरुजावरुन दुरवरचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. या बुरुजा खाली असलेल्या डोंगर सोंडेवर उतरुन १० मिनिटे चालल्यावर आपण एका भुयारी टाक्यापाशी पोहोचतो.

टाके पाहून पुन्हा बुरुजावर येऊन समोर दिसणार्‍या तलावच्या दिशेने चालत जावे. याठिकाणी बाजूबाजूला दोन तलाव आहेत. यातील एका तलावात कमळ फ़ुललेली असतात. तलाव पाहून पुन्हा तटबंदीपाशी येऊन पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. हे प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशव्दाराच्या बाहेरील बाजूस डाव्या व्दारशाखेवर हनुमान कोरलेला आहे. प्रवेशव्दार आणि खाली उतरणार्‍या पायर्‍या पाहून पुन्हा किल्ल्यात येऊन पुढे गेल्यावर मोठा बुरुज लागतो. प्रवेशव्दारावर आणि त्याकडे येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली आहे. पुढे गेल्यावर बाजूबाजूला असलेले दोन तलाव दिसतात. यापैकी मोठ्या तलावाच्या बाजूला ५ समाध्या आहेत. त्यापैकी दोन समाध्या मोठ्या आहेत. या तलावावर पंप हाऊस बांधलेले आहे.


हे दोन तलाव पाहून पुढे गेल्यावर अजून एक तलाव दिसतो. पुढे उत्तर टोकावरील मोठा बुरुज आहे. हा बुरुज पाहून किल्ल्याच्या मधल्या भागात असलेल्या उंचवट्याकडे चालत येतांना प्रथम एका भव्य वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्याच्या पुढे झाडीत अनेक वास्तूंचे अवशेष आहेत. पुढे उजव्या बाजूला चंद्रसेन मंदिराकडून तलावाकडे जाणार्‍या रस्त्यावर एक चुन्याचा घाणा झाडीत लपलेला आहे. हे सर्व अवशेष पाहून चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात प्रवेश करावा. या मंदीराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर शुर्पणखेचा पूत्र चंद्रसेन याचे आहे. या मुर्तीचे दोन्ही हात तुटलेले आहेत. या बद्दल अख्यायिका अशी आहे की, शुर्पणखेचा पुत्र चंद्रसेन याने या डोंगरावर शंकराची घोर तपश्चर्या केली, शंकराने त्याला खडगं दिले. राम लक्ष्मण वनसात असताना या भागात आले, खडगाचे तेज पाहून लक्षमणाने ते उचलेले आणि त्याची धार पाहाण्याकरीता झाडीत चालवले. त्या ठिकाणी चंद्रसेन तपश्चर्येला बसला होता, त्याचे हात त्यामुळे कापले गेले.

मंदिराच्या समोर दिपमाळ आहे. त्याखाली भग्न मुर्ती आणि वीरगळी ठेवलेल्या आहेत. मंदिर पाहून पाय‍र्‍यांनी प्रवेशव्दाराच्या दिशेला उतरतांना दोन भग्न मंदिरे आहेत. त्यातील एका मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या नवीन आणि जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. तर दुसर्‍या मंदिरात पिंड आहे. या ठिकाणी एक रामाचे मंदिरही आहे. ही मंदिरे पाहून गडच्या प्रवशेव्दाराकडे आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. गडमाथा बराच विस्तीर्ण असल्याने फिरण्यास एक ते दीड तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड - सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे. एसटी स्थानकावरुन तळबीडला जाण्यास दर अर्ध्या तासाला एसटी आहे. गावातच हंबीररावांचे स्मारक आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्याची चढण सुरु होते. वाट मळलेली आहे. पुढे वाट गडाला उजव्या हाताला ठेवत एका झाडाजवळ येते. तेथून सहजपणे गडमाथा गाठता येतो. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात.
याशिवाय कराड - चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे.
राहाण्याची सोय :
चंद्रसेनच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, कराडमध्ये आहे.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) तळबीड मार्गे १ तास लागतो. २) वसंतगड गावामार्गे १ तास लागतो.
सूचना :
समर्थ रामदासांच्या ८ घळींपैकी चंद्रगिरी घळ वसंतगडापासून दिड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. वसंतगडावरील पश्चिमेच्या प्रवेशव्दारातून बाहेर पडून खिंडीत उतरावे.तिथून चरेगाव बेचदेर गावातून चंद्रगिरी घळ गाठावी. परत येतांना वसंतगडा पर्यंत न येता चरेगावात उतरावे. तिथून कराडला येण्यासाठी वडाप व बसची चांगली सोय आहे.
डोंगररांग: Mahabaleshwar, Koyana
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  जंगली जयगड (Jangli Jaigad)  वसंतगड (Vasantgad)