| तानाजी मालुसरे पो
 
 Printed From: TreKshitiZ
 Category:  Information Section
 Forum Name:  कविता संग्रह
 Forum Description:  पोवाडे, कविता आणि स्फूर्ती गीते
 URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=258
 Printed Date: 31 Oct 2025 at 6:49am
 Software Version: Web Wiz Forums 11.03 - https://www.webwizforums.com
 
 
 Topic: तानाजी मालुसरे पो
 Posted By: AARTI
 Subject: तानाजी मालुसरे पो
 Date Posted: 23 Aug 2014 at 12:09pm
 
 
        
          | नरवीर तानाजी मालुसरे पोवाडा 
 
 चौक १
 राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥
 सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥
 सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥
 गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥
 खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥
 शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥
 जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥
 सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥
 उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥
 
 चौक २
 बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥
 पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥
 नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥
 ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्या बोलाविला ॥
 "जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला" ॥२॥
 
 चौक ३
 शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥
 अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥
 हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥
 ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥
 कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥
 घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
 गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥
 पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला ।
 सलाम जिजाबाईला केला ॥३॥
 
 चौक ४
 "धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला " ।
 "शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा" ॥
 "डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥
 डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे" ॥
 "मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं"॥
 येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥
 हातीं फांसा ह्यानें घ्यावा । "डाव पहिला येऊं दे तुला ॥
 मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा" ॥४॥
 
 चौक ५
 हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥
 फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥
 तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥
 बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥
 तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥
 "जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा" ॥
 येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥
 "प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला" ॥
 बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥
 बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥
 तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥
 जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥
 
 चौक ६
 "ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥
 माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥
 नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥
 तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्चा मागून घ्यावा " ॥
 ’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥
 आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥
 बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥
 घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला" ॥
 नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥
 "हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥
 जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥
 नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥
 सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें" ॥
 "नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥
 राज्य जाळून टाकीन उभे" । "नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला" ॥६॥
 
 चौक ७
 बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥
 राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥
 ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥
 ’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥
 प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥
 प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥
 ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥
 तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥
 शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥
 किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥
 खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्या बोलविला ॥
 "जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥
 तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्या दिवसाला ॥७॥
 चौक ८
 पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥
 ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥
 पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥
 घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
 हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥
 तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥
 सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥
 
 चौक ९
 जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥
 पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥
 काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥
 लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥
 लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥
 ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥
 येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥
 "माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी" ॥
 दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्या बोलाविला ॥
 मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्या बोलाविला ॥९॥
 चौक १०
 मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥
 "लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा ।
 जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले ।
 नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला ।
 बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।
 किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता ।
 काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला ।
 ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल" ।
 "असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री ।
 नाहीं भिणार मरणाला" ॥१०॥
 
 चौक ११
 मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥
 "ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला" ॥
 "माझें लगिन करील कोण ?" ॥ रायाबा पुसे बाबाला ॥
 "साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥
 भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला ।
 जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा ।
 घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर " ।
 लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे ।
 बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्याला ॥
 मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे ।
 ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी ।
 त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके ।
 त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत ।
 त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक ।
 त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर ।
 त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला ।
 ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥
 
 चौक १२
 ’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥
 बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥
 बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला ।
 ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥
 आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥
 हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥
 माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥
 त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥
 बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥
 ’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥
 चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला" ॥१२॥
 
 चौक १३
 बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥
 "जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥
 अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥
 सुभेदार बोले त्या सेनेला । "बारा हजार रुपया काय केला ॥
 
 घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला" ॥
 
 बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें ।
 पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥
 रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥
 "माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला" ॥
 "भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला ।
 आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें" ॥१३॥
 
 
 चौक १४
 हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥
 तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥
 माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
 अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥
 तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥
 गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥
 मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥
 "तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार" ॥
 "राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !" ॥१४॥
 
 चौक १५
 "अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला" ॥
 गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला ।
 आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला ।
 गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला ।
 घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥
 गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥
 गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥
 बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥
 बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥
 
 चौक १६
 हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥
 "माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥
 तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला" ॥
 शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥
 तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥
 "माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला" ॥
 नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥
 सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥
 
 चौक १७
 बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥
 पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥
 दुसर्या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥
 तिसर्या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥
 चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥
 पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥
 सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥
 "मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥
 माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?" ॥
 "ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥
 जिजामातेनें बोलाविलें" । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥
 जिजाबाई बोलाया लागली । "मी जातीनें बाईल ॥
 आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल" ॥१७॥
 
 चौक १८
 सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥
 "भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥
 इच्छेप्रमाणें होऊं दे ।" सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥
 गेली सुभेदाराला ओंवाळायला । "तुझे जाऊं अलाबला ॥
 तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला" ॥
 सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥
 ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥
 इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥
 ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥
 जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥
 "माझा सुभेदार शाहाणा ।" हात मस्तकी ठेविला ॥
 "माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला" ॥
 "काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥
 घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥
 माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला" ॥१८॥
 
 चौक १९
 सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥
 शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥
 "गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला" ॥
 "काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला" ॥
 जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥
 नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला" ॥
 "माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें" ॥
 "भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥
 आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥
 नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्या नदीला ॥
 आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला" ॥१९॥
 
 चौक २०
 बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥
 गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥
 विचार काढिला । "भला भला रे सुभेदारा ॥
 तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥
 चला जाऊं रे जेवणाला" । बारा हजार फौजेतून ॥
 एकटा सुभेदार गेला । गुंजवर्या नदीला ।
 आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली ।
 आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन ।
 आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला ।
 बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन ।
 बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव ।
 सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥
 
 चौक २१
 ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥
 "आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला" ॥
 ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥
 "भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥
 ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला" ॥
 मामा बोले सुभेदाराला । "अठरा शाखा अठरा भाज्या ॥
 एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला" ॥
 अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥
 कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥
 कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ ।
 ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥
 धांवा अवघा मांडिला । "प्रतापगडची भवानी धांव संकटाला" ॥
 पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥
 सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥
 ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥
 ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥
 खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥
 
 चौक २२
 बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥
 तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्याला ॥
 "आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥
 जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥
 जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥
 मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला ।
 दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला ।
 डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्याला दंड द्यावा इनाम खायाला" ॥
 सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥
 डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥
 "आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा" ॥
 बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥
 त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥
 नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥
 
 चौक २३
 शेलार मामानें पाहिला । "माझ्या ऐक सुभेदारा ।
 बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा ।
 देशील तर द्यावा बारा हजाराला" । येवढया जाबावरुन ।
 बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला ।
 देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी ।
 बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार ।
 बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा ।
 बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा ।
 बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक ।
 बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार ।
 कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक ।
 दादा फौज निघाली ॥२३॥
 
 चौक २४
 ’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा" ॥
 तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥
 सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥
 आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥
 ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥
 गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥
 पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला ।
 गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥
 गलीम तेथून निघाला । गेला डेर्याच्या मुक्कामी ॥
 पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥
 गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥
 
 चौक २५
 गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥
 माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥
 "ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥
 माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला" ॥
 ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥
 हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥
 त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥
 
 चौक २६
 "सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
 जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥
 गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें" ॥
 तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥
 जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥
 लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥
 आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥
 काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥
 वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥
 सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥
 गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥
 त्यानें सुभेदार पाहिला । "मारा मारा ह्या चोराला" ॥
 सुभेदार बोलाया लागला । "भ्यालों ह्या चोराला ॥
 हे ठार मारतील मला" । "चोर असलों ठार मारा ॥
 राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥
 जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला" ॥२६॥
 
 चौक २७
 पहिल्यानें सरदार पाहिला । "धन्य याची नारायणा ॥
 कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला " ॥
 "मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥
 मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला ।
 जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥
 तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥
 घाईनें निघालों । पान खायला विसरलों " ।
 पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा ।
 ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं " ॥ बटवा खाकेचा सोडिला ।
 यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला ।
 यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले ।
 कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥
 
 चौक २८
 बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥
 "बारा असामींचा कोण सरदार सांगावा" । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार" ॥
 "ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी" ॥
 "तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती" ॥
 ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥
 ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥
 चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥
 बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥
 कोळी फितूर ते केले । "ऐक ऐक पाटीलबोवा ॥
 मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला" ॥
 "काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला" ॥
 इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥
 "मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥
 राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार ।
 पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला ।
 आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला" ॥२८॥
 
 चौक २९
 नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥
 "ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला" ॥
 ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥
 "घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला " ॥
 "ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥
 द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये" ॥
 येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥
 "ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥
 दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥
 आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥
 अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥
 घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥
 सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥
 चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो" ॥२९॥
 
 चौक ३०
 "आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥
 एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥
 उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥
 एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥
 नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥
 बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥
 उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥
 तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥
 
 चौक ३१
 "बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला" ॥
 बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥
 त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥
 "शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला" ।
 "भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥
 हजाराची तैनात देईन बारा असामीला" ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा ।
 त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥
 
 
 चौक ३२
 सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥
 ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला ।
 "तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥
 माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥
 तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला" ।
 ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला" ॥
 "बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला" ॥
 "ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥
 नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥
 ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा" ॥३२॥
 
 चौक ३३
 चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥
 बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥
 ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥
 सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥
 भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥
 सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥
 अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥
 आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥
 "सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली" ॥
 राग आला त्या मर्दाला । "मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥
 एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन" ॥
 त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥
 
 चौक ३४
 "जावें जावें शेलारमामा सोल बघायाला" । ज्यानें टिचकीनें मारिली ॥
 सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥
 ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥
 "कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा" ॥
 ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥
 सुभेदार बोलतो । "भरा बायकांच्या बांगडया" ॥
 एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥
 मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥
 चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥
 गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥
 महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥
 
 चौक ३५
 अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥
 घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥
 हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥
 "किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला" ॥
 खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥
 त्यामध्यें बडा वाघ शिर्या । गाईकी बचडी खाते ॥
 रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा" ॥३५॥
 
 चौक ३६
 सुभेदार बोलतो सेनेला । "पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥
 दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची" ॥
 पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥
 आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥
 पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥
 सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) ।
 बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले ।
 सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार ।
 फौज धरणीवर पडली ॥३६॥
 
 चौक ३७
 सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥
 माझ्या "शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला" ॥
 सोल पाहुन मामा । धोतरात....ला ॥
 "काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा" सुभेदार बोलाया लागला ।
 "नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा ।
 माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा " ॥३७॥
 
 चौक ३८
 शेलार मामा बोलतो । "ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥
 आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥
 आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती ।
 उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको" ॥
 "भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥
 पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला" ॥
 शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥
 प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥
 सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥
 तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥
 
 चौक ३९
 पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥
 हात मारिला पाठीवर । "भिऊं नका सुभेदारा ॥
 यश तुझ्या तलवारीला" । बळ देवीचें सापडलें ॥
 जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥
 खुन डोळ्यावर चढला । "ऐक माझ्या शेलारमामा ॥
 जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥
 जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा" ॥३९॥
 
 चौक ४०
 गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥
 होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥
 होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥
 मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥
 कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥
 ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥
 व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥
 कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥
 कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥
 
 चौक ४१
 पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्या दरवाजाला ॥
 काळोखी रात्र, पार--
 दुसर्या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥
 मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥
 तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥
 पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥
 गेला तिसर्या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥
 दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥
 एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥
 
 चौक ४२
 "ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥
 एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला" ॥
 त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥
 अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥
 भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥
 उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥
 ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥
 चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥
 "मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला ।
 सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥
 काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया" ॥
 "x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥
 जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥
 आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥
 अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥
 
 
 चौक ४३
 सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥
 "नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला" ॥
 शेलार तो मामा शिणल्यावर "दादा पोट रे फुगलें" । "भला भला माझ्या मामा ॥
 बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥
 पान खाऊं दे मला" । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥
 "किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला" ॥
 "उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार" ॥
 "नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला" । "नऊशें पठाण आम्ही काटया" ॥
 महाता बोले सुभेदार । "कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥
 जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी ।
 बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्या आणाव्या ।
 रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी ।
 कोठें होत्या तुझ्या बाला ?" ॥ सुभेदार बोले महताला ।
 "ऐक भुसार्याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा ।
 यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें ।
 तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा ।
 तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्या एवढया बडया तलवारा ।
 कोठें होत्या रे मुसंडया तुला ?" ॥४३॥
 
 चौक ४४
 सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा" ॥
 पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥
 "तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा" ॥
 हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥
 "संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥
 हा हात्ती बाच्छाईचा" । "मी रे आहे महाराजांचा" ॥
 पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला,
 हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला ।
 बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला ।
 "सहाही पाताळ गाडिला !" राग आला सुभेदाराला ।
 सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥
 अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥
 हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्याला मारायाला ॥
 सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥
 सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥
 अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥
 पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा "भोचु दे रे बोx" ॥४४॥
 
 चौक ४५
 तिथुन बोंब्या निघून गेला ॥ "मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥
 "सिंहगड किल्ला डुब होया" । "हम चोन नहीं सोडताई ॥
 जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥
 पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला" ॥
 सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥
 चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥
 सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥
 सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥
 सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥
 ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥
 आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥
 
 चौक ४६
 "सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला" ॥
 "उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार" ॥
 "ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला" ॥
 सुभेदार त्याला बोलता झाला । "घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥
 पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला" ।
 पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला ।
 सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ "अरे सिद्दी तू हिलाल ।
 दुसरा हात येऊं दे तुझा" ॥ सुभेदार बोलला ॥
 "संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥
 नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥
 बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥
 बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥
 
 चौक ४७
 बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥
 "मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ।
 नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥
 सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया" ॥
 "हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥
 आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला" ।
 तुम्हीं जावें लढाईला" ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं ।
 तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ "सलाम सलाम मेरे भाई ।
 किस्का तू उमराव सांगावें आम्हांला" ॥ "उमराव शिवाजी महाराजाचा ।
 आहे मी तानाजी मालूसरा" ॥ "सुभेदार भाई ।
 पहिला हात येऊं दे तुझा" । "तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक ।
 पहिला हात येऊं दे तुमचा " ॥ बारा जण लडक्यांनीं ।
 चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला ।
 त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला ।
 नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं ।
 चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥
 
 चौक ४८
 तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥
 "मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥
 नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥
 सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !"
 लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला ।
 उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥
 लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥
 खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥
 "जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥
 झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला" ॥४८॥
 
 चौक ४९
 उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥
 फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥
 ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥
 गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥
 उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥
 पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला ।
 गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या ।
 अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा ।
 त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥
 जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या ।
 हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला ।
 अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला ।
 गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला ।
 सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा ।
 दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला ।
 ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण ।
 ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥
 
 चौक ५०
 "सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला" ॥
 "उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार" ॥
 उंबराव मोगलानें पाहिला । "ऐसा भला आहेस रे दादा ॥
 तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥
 सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥
 हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला" ॥
 सुभेदार बोले मोगलाला । "सोड सिंहगडाची गादी ॥
 चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥
 राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला " ।
 एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥
 "पहिला हात येऊं दे तुझा" । "उदेभान हात येऊं दे तुझा" ॥
 तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥
 अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥
 मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥
 नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥
 हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥
 "ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥
 दुसरा हात येऊं दे तुझा" । सुभेदार बोलतो "मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥
 लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला" ॥
 उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला ।
 पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला ।
 सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥
 
 चौक ५१
 पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या----मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥
 आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥
 मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥
 उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥
 "हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥
 कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला" ॥
 लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥
 सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥
 यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥
 मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥
 "फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे" । मोगल मागे पहात होता ॥
 दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला ।
 बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥
 नऊशे पठाण । मार माराया लागले ॥
 त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥
 
 
 चौक ५२
 नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥
 आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥
 प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥
 पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥
 संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥
 देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥
 ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥
 "शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे" ॥
 शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥
 सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥
 नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला" ॥
 मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥
 एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥
 पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥
 पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥
 त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥
 शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥
 शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥
 
 चौक ५३
 ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥
 चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे ।
 पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ ।
 वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला ।
 मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ "माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं ।
 ह्याचें लग्न करील कोण" ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले ।
 आले सुभेदाराजवळ ॥ "आमचा सुभेदार धनी ।
 आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण" ॥
 सुभेदार बोलायाला लागला । "भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥
 जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला" ॥
 अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला ।
 मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले ।
 वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥
 
 चौक ५४
 आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥
 आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥
 सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥
 शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥
 शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा ।
 जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥
 गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥
 बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥
 मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥
 "सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥
 बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची" ॥
 मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥
 बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला ।
 वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥
 पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥
 रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥
 पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥
 "साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥
 बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥
 आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला" ॥
 शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥
 "भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार ।
 आहे तुला " ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें ।
 शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥
 
 
 चौक ५५
 मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥
 ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥
 पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥
 संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥
 बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥
 दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥
 डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥
 मालुसर्याचा दंड । दिला इनाम खायाला ॥
 रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला ।
 आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका ।
 ज्यानें हुजर्या बोलविला ॥ "पंतोजी तो काका ।
 जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं ।
 आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला ।
 राजगड किल्ल्याला" ॥ तुळशीदास शाहिर ।
 त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन ।
 मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा ।
 पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा ।
 हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा ।
 शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत ।
 ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य ।
 सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला ।
 ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥
 
 शाहीर तुलसीदास
 
 |  
 
 |