मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वसई (Vasai) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील सागर किनार्‍य़ाचे प्रादेशिक विभागणी नुसार दोन भाग पडतात, उत्तर कोकण व दक्षिण कोकण. उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई, याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला. वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टी हा सर्व परिसर, समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्वाचा होता. पोर्तुगिजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमांजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३७ ते १७३९ मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरतांना आजही येते.

19 Photos available for this fort
Vasai
Vasai
Vasai
इतिहास :
इ.सन १४१४ मध्ये भडारी भेंगाळे नावाच्या सरदाराने हा किल्ला बांधला. इ.स. १५३० मध्ये गुजराताच्या सुलतानाने हा किल्ला त्याच्याकडून जिंकून घेतला. पुढे १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी याचे महत्त्व जाणून पुर्नबांधणीसाठी घेतला. वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगिजांनी बांधायला सुरुवात केली, तेव्हा या कामाला दहा वर्ष लागली. किल्ला दशकोनी आहे व प्रत्येक कोपर्‍य़ावर एक बुरुज आहे. त्याची लांबी रुंदी एक किमी आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात आहे. हा किल्ला जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. एका बाजूस अथांग सागर व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत. सोपर व गोखरावा येथे पूल आहेत, असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे.

मुंबई जवळील साष्टी म्हणजे ’सहासष्टी’ नावाचा प्रदेश होता. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. इ.स. १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ गेला. त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी आप्पांच्या हातात सोपवली.इ.स. १७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी मोहिम आखली. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ’हर हर महादेवाच्या’ गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले, त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली. २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. लढाईत पोर्तुगिजांची ८०० माणसे मारली गेली. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला. किल्ल्यातील बायका मुलांना सुखरुप जाऊ दिले.

पुढे १७८० मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यास सुरुवात केली. त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा किल्लेदार होता. सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. समुद्रमार्ग आणि भुमार्ग या दोन्ही बाजूंनी किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. कर्नल हार्टले कल्याणवरुन हल्ला करणार होता, तर गोडार्ड समुद्रमार्गाने हल्ला करणार होता. वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रुला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली होती. नाना फडणिसांनी आनंदराव रास्ते यास वसईच्या ८ किमी गोखरावा या गावी धाडले. २३ ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज व तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली. खजिना पण रिता झाला होता. लोक गावे सोडून गेले होते. गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. २८ तारखेला तोफांची गोळीबारी सुरु झाली. मराठ्यांनी सुध्दा बुरुजावरुन गोळीबारी सुरु केली. इंग्रजांनी गोखरावा व सोपार पूल उडवले. ७ डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला. त्यामुळे सगळे जण घाबरुन गेले. ९- १० डिसेंबरला तोफखान्याचा मारा चालू ठेवला. १० डिसेंबरला २०० मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला १२ डिसेंबरला किल्ला इग्रजांच्या ताब्यात गेला.

पहाण्याची ठिकाणे :
वसई गावातून येणारा रस्ता किल्ल्यातून खाडीच्या किनार्‍यापर्यंत जातो. किल्ल्याची तटबंदी तोडून हा रस्त्ता बनवलेला आहे. या रस्त्याने किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याचे प्रवेशद्वार " भूई दरवाजा " आहे. त्यातून आत शिरल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे . प्रवेशव्दारा जवळून तटावर चढण्यासाठी पायर्‍य़ा आहेत . त्या चढून गेल्यावर फ़ांजी वरुन सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते. किल्ल्याच्या तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे किल्ल्याला बाणाच्या आकाराचे दहा बुरुज आहेत. त्यांची पोर्तुगिजांनी दिलेली नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यावर बुरुजांना एतद्देशीय नाव दिली होती.

हुई दरवाजा पाहून किल्ल्यात आल्यावर उजव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात केली असता फ्रान्सिस चर्च आणि आश्रम पाहायला मिळतो. त्याच्या पुढे "फ़त्ते बुरुज" आहे, बुरुजात असलेला गुप्त दरवाजा बंद केलेला आहे. पुढे गेल्यावर ऑगस्टीनियन चर्च आणि जोगिणींचा आश्रम आहे. त्यापुढे "दर्या बुरुज" व त्यातील बंद केलेला गुप्त दरवाजा पाहायला मिळतो. पुढे जेजुईट चर्च आणि कॉलेजच्या मागील तटबंदीत एक बुजवलेला दरवाजा पाहायला मिळतो. पुढे " वेताळ बुरुज" आहे त्यापुढे चालत गेल्यावर किल्ल्याचे खाडी कडील प्रवेशव्दार पाहायला मिळते. त्या पुढे गणेश बुरुज (पाण बुरुज) आहे. या बुरुजावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या प्रवेशव्दारापासून एक वाट किल्ल्याच्या आत असलेल्या बालेकिल्ल्याकडे जाते. बाले किल्ल्याला चार बुरुज आणि तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीवर शिलालेख आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर देवड्या आहेत . बालेकिल्ल्यात जनरलचा वाडा, एक तलाव , आणि काहे उध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडील भिंतीत चोर दरवाजा (उप दरवाजा ) आहे. या दरवाजाच्या बाजूला नोसा सिन्होरा दा विदा चर्च आहे.

बालेकिल्ला पाहून प्रवेशव्दारातून बाहेर पडून पुढे चालायला सुरुवात केल्यावर एक विहिर पाहायला मिळते. त्यापुढे गेल्यावर सेंत जोसेफ़ चर्च , भिक्षुणींचे वसतीगृह आहे. त्यामागे तटबंदी लगत वखार आहे. या ठिकाणी तटबंदीत एक आयताकृती बुरुज आहे , तसेच फ़ांजीवर जाण्यासाठी जीना आहे. तटबंदीत बुजवलेले दरवाजे पाहायला मिळतात. येथून पुढे गेल्यावर किल्ल्याचे खाडी कडील मुख्य प्रवेशव्दार संकुल म्हणजेच "दर्या दरवाजा" पाहायला मिळतो. यात दोन दरवाजे आहेत. बाहेरील प्रवेशव्दाराच्या बाजूला असलेल्या बुरुजांची नावे राम आणि लक्ष्मण आहेत. या दरवाजातून बाहेर पडल्यावर धक्क्यावर (बंदरावर) जाता येते . धक्क्यावरुन दर्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर हनुमान मंदिर आहे . तेथून रस्त्याच्या दिशेने चालत गेल्यावर विरगळ आणि गणेश मुर्ती पाहायला मिळते. रस्त्याच्या पलिकडे पूर्व टोकाला " कल्याण बुरुज" आहे. रस्त्यावरुन किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे चालत जातांना डाव्या बाजूला पेशवेकालिन तुळशी वृंदावन (समाधी) पाहायला मिळते. त्याच्या मागच्या बाजूला बाजारपेठ होती. पुढे चालत गेल्यावर आपण तलावापाशी येतो. तलावाजवळ सेनेट हाऊस, वज्रेश्वरी मंदिर आणि नागेश्वर मंदिर आहे. हा तलाव पाहून डॉमनिक आश्रम आणि चर्च जवळ रस्त्यावर आल्यावर चिमाजी अप्पांचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. या पुतळ्याच्या माहे दिसणार्‍या उत्तरेकडील तटबंदीत कल्याण बुरुजा नंतर अनुक्रमे , "बहिरी बुरुज", "भवानी मार्तंड बुरुज ", "यशवंत बुरुज" आणि "कैलास बुरुज" आहेत. "भवानी मार्तंड बुरुज " आणि "यशवंत बुरुज" यांच्या मध्ये उतरेकडील प्रवेशव्दार आहे. या उतारेकडील तटबंदीत असलेलले गुप्त दरवाजे बुजवलेले आहेत.

चिमाजी आप्पांच्या पुतळ्यापासून रस्त्याने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या दिशेने जातांना डाव्या बाजूला दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे, त्याच्या बाजूला न्यायालयाची इमारत दिसते . त्या इमारती मागे मिझारे कोटीया हॉस्पिटल आहे. न्यायलयाच्या पुढे कारागृहची उध्वस्त इमारत आहे. त्याच्या बाजूला स्त्रियांचे स्नानगृह आहे, तर माहील बाजूस पुरुषांसाठी स्नानगृह आहे. हे सर्व पाहून रस्त्यावर आल्यावर सेंट जॉन ऑफ़ गॉड चर्च आहे. येथून यशवंत बुरुजाकडे चालत गेल्यावर कॅप्टन्चे निवास स्थान आणि त्यामागे बुरुजात असलेला भूयारी मार्ग पाहाता येतो.

येथून रस्त्यावरुन चालत तटबंदीपाशी आल्यावर एक कोठार पाहायला मिळते. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. वसईचा किल्ला पाहायला किमान दोन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील वसई गाठावे. स्टेशनपासुन किल्ला ६ किमीवर आहे . वसई स्टेशन ते किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बसेस,रिक्षा उपलब्ध आहेत.
राहाण्याची सोय :

किल्ल्यात राहण्याची सोय नाही, वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत
जेवणाची सोय :
वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वसई गावात पासून किल्ल्यात जाण्यास १५ मिनीटे लागतात.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Khed   Vasai   10.45   -   


Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...