घोडबंदरचा किल्ला
(Ghodbunder Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
165 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : ठाणे |
श्रेणी : मध्यम |
प्राचीनकाळी कल्याण हे महत्वचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती.
सह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते, तिचे टोक घोड्यासारखे दिसते. त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले सह्याद्रीच्या ह्या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला आहे.
उल्हास खाडी इंग्रजी "U" आकाराचे वळण घेते. त्याजवळ असलेल्या टेकडीवर घोडबंदर किल्ला बांधण्यात आला होता. या बंदरातून घोड्याचा व्यापार होत असावा.
|
|
इतिहास : |
इ.स १६७२ मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही, इ,स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला, त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.
|
पहाण्याची ठिकाणे : |
गडाच्या पायर्या चढून आपण प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो, समोरच अनेक कमानी असलेली इमारत दिसते. तेथून डाव्या बाजूला गेल्यास एक इमारत आहे . इमारतीतून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज आणि किल्ल्याची बाह्य तटबंदी दिसते. येथून पुढे पायर्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक मोठा गोल बुरुज आहे. बुरुजावर जाण्यासाठी एक छोट प्रवेशव्दार आणि पायर्या आहेत पायर्यांनी वर जातांना उजव्या बाजूला एक खोली दिसते. या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. बुरुजावर एक भगवा झेंडा लावलेला आहे. बुरुजावरुन पुढे गेल्यावर खाली उतरणार्या पायर्या आहेत. या पायर्यांच्या उजव्या बाजूला एक पाण्याची बांधीव टाकी आहे. या टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. हे टाक पाहून खाली उतरल्यावर आपण पुन्हा किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी येतो. आपली गडफ़ेरी पूर्ण होते.
इसवीसन २०२४ मध्ये किल्ल्याची डागडूजी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
ठाण्यावरुन मीरा भाईंदर आणि बोरीवली इथे जाण्यासाठी बसेस आहेत, त्या बसेसने घोडबंदर फाट्यावर उतरुन रिक्षाने अथवा मिरा भाईंदर महापालिकेच्या बसने घोडबंदर गावात जाता येते. बसच्या शेवटच्या स्टॉपवर उतरुन डांबरी रस्त्याने टेकडी वरील किल्ल्यापर्यंत जाता येते. खाजगी वहानाने थेट किल्ल्यावर जाता येते. |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
|
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
घोडबंदर गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १५ मिनिट लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |