मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
पावनगड (Pawangad) | किल्ल्याची ऊंची :  3200 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: पन्हाळा | ||||
जिल्हा : कोल्हापूर | श्रेणी : मध्यम | ||||
पावनगड हा पन्हाळा किल्ल्याचा जोडकिल्ला आहे. पन्हाळा आणि पावनगड एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. मार्कंडेय ऋषींची तपोभूमी असलेल्या या डोंगरावर पावनगडाची निर्मिती करण्यात आली. पन्हाळा किल्ल्याच्या बाजूला असूनही हा किल्ला उपेक्षित आहे. |
|||||
|
|||||
इतिहास : | |||||
कोल्हापूरचे शिलाहार घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले. त्यातील शेवटचा राजा भोज दुसरा हा होता. त्याने इसवीसन ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले. तो महापराक्रमी आणि धार्मिक होता. त्याने आपल्या हयातीत एकूण १५ किल्ले बांधले. या भोजराजाने बांधलेल्या १५ किल्ल्यांमध्ये पावनगडचे नाव येत असल्याने पावनगडची निर्मिती भोजराजाने केल्याचे मानले जाते. शिवपुर्व काळात पावनगडावर एखादे चौकीवजा ठाणे असावे. सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला असता पन्हाळ्याच्या पुर्व बाजुस असलेल्या मार्कंडेय टेकडीवरून पन्हाळ्यावर तोफांचा मारा करण्यात आला. छ्त्रपती शिवरायांनी इसवीसन १६७३ मध्ये पन्हाळा दुसऱ्यादा जिंकुन घेतल्यावर पन्हाळ्याच्या संरक्षणातील हा दोष काढुन टाकण्यासाठी मार्कंडेय टेकडीला तटा-बुरूजांनी बंदिस्त करून पावनगडची निर्मिती केली. पावनगडाच्या बांधकामाची जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल महाराजांनी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जंद यांना प्रत्येकी पाच हजार होनांचे बक्षीस दिले. राणी ताराबाईंच्या कारकिर्दीत औरंगजेबाने मार्च १७०१ मध्ये पन्हाळा आणि पावनगडला वेढा घातला. पण त्याला अनेक प्रयत्न करुनही त्याला तो जिंकता आला नाही. शेवटी किल्लेदाराला ५५,०००/- देऊन औंरगजेबांने किल्ला ताब्यात घेतला. पन्हाळ गडाचे नाव बानिशाह दुर्ग आणि पावनगडाचे नाव रसुलगड असे बदलले. |
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
पन्हाळा किल्ल्याकडून पावनगडाकडे एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने पावनगडाच्या पठारावर जाण्यासाठी जो चढ आहे त्या चढाच्या दोन्ही बाजूला किल्ल्याच्या हनुमंत प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. रस्त्यावरुन ५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला नरसिंह मंदिर आहे. या मंदिरा समोर दोन दिपमाळा होत्या त्यापैकी एकच सध्या उभी आहे. दुसर्या दिपमाळेचे अवशेष पाहायला मिळतात. देऊळ नव्याने बांधण्यात आलेले असून मूळ देवळाचे अवशेष अजूबाजूला विखुरलेले आहेत. देवळात शंकराची पिंड असून देवळाच्या बाहेर गणपतीची ३ फूट उंच मुर्ती ठेवलेली आहे. मुर्तीची मोठ्याप्रमाणात झीज झालेली आहे. नरसिंह मंदिर पाहून पुन्हा रस्त्यावर येऊन डावीकडे गेल्यावर लक्ष्मी मंदिर आहे. मंदिरात एक मुर्ती आहे. मंदिराच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. तर व्दारपट्टीच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर व्दारपालाची प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या भिंतीला लागून एका समाधीचे अवशेष ठेवलेले पाहायला मिळतात. हे मंदिर पन्हाळा किल्ल्यावरुनही दिसते. या मंदिरापासून पठारावरुन कड्याकडे चालत गेल्यावर समोर पन्हाळा किल्ला दिसतो. चार दरवाजा ते सज्जाकोठी पर्यंतचा भाग येथुन दृष्टीक्षेपात येतो. लक्ष्मी मंदिर पाहून परत रस्त्यावर येऊन २ मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूस हनुमंताचे मंदिर आहे. मंदिरा बाहेर हनुमंताची जूनी मुर्ती आहे. मंदिरा जवळ एक गोलाकार ३ फ़ूट खोल पाण्याचे टाकं आह त्याला ह्नुमान टाकं या नावाने ओळखले जाते. हनुमान मंदिर पाहून पुन्हा रस्त्यावर येऊन १० मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला शंकर मंदिर दिसते. या मंदिराकडे जातांना उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्याच मंदिराकडील दगडी बांधणीचे प्रवेशव्दार अजुनही शाबूत आहे. शंकर मंदिर काळ्या दगडात बांधलेल्या या मंदिरा समोर दगडी बांधणीचा नंदिमंडप आहे. मंदिरासमोर दोन तोफ़ा गाड्यावर ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या मागे एक पाण्याचे टाक आहे . त्याच्या जवळच गोलाकार दगडी छत असलेली एक विहिर आहे. त्या विहिरीला तुपाची विहिर म्हणून ओळखले जाते. तुपाची विहिर पाहून डाव्या बाजूला सरळ चालत गेल्यावर एक उंचवटा लागतो. तो उंचवटा चढून गेल्यावर एक गोल आकाराची छोटी विहिर पाहायला मिळते. ही विहिर पाहून पुन्हा उंचवटा उतरुन खाली आल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली आयताकृती प्रचंड मोठी बारव पाहायला मिळते. या बारवे मध्ये उतरण्यासाठी पायर्या आहेत. पायर्यां जवळ एक दगडी ढोणी आहे. या बारवेच्या मागच्या बाजूला अजून एक आयताकृती विहिर पाहायला मिळते. या विहिरी पाहून तसेच सरळ चालत तटबंदी पर्यंत गेल्यावर एक वाट खाली उतरताना दिसते . ही वाट बांबरवाडी, बुधवारपेठ या गावात जाते. पावनगडावरील रहिवाशी याच पायवाटेचा उपयोग आजही करतात. ही पायवाट पाहून झाल्यावर तटबंदीवरुन उजव्या बाजूला म्हणजेच पूर्वेकडे चालायला सुरुवात करावी. वाटेत काही बुरुज पाहायला मिळतात. या वाटेने १० मिनिटात आपण यशवंत बुरुजापाशी येतो. या बुरुजाच्या खाली एक दालन आहे. त्याला कमान असलेला दरवाजा आहे. या भागात पाहारा देणार्या पाहारेकर्यांसाठी हे बांधलेले असावे. बुरुजावर चढून जाण्यासाठी पायर्य़ा आहेत. पायर्या चढून वर गेल्यावर किल्ल्याच्या कड्याकडील बाजूस अजून एक तटबंदी आणि तीन बुरुज बांधलेले पाहायला मिळतात. हा बुरुज बाहेरच्या तटबंदी पेक्षा उंच बांधल्यामुळे किल्ल्याच्या बाहेर आणि आत लक्ष ठेवणे सहज शक्य होते. या बुरुजावर भगवा ध्वज लावलेला आहे. यशवंत बुरुज पाहून तटबंदी वरुन पुढे म्हणजेच दक्षिण दिशेला चालत गेल्यावर सूर्य चंद्र बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजाच्या आतल्या बाजूच्या भिंतीवरील एका दगडावर सूर्य आणि चंद्राची प्रतिमा कोरलेली आहे. या बुरुजावर चढण्यासाठी पायर्या आहेत. पायर्या चढून वर गेल्यावर किल्ल्याच्या कड्याकडील बाजूस अजून एक तटबंदी आणि बुरुज बांधलेले पाहायला मिळतात. बुरुजाच्या पायर्यांजवळ तटबंदीत एक खोली आहे. त्याचे छप्पर कोसळलेले आहे. सूर्य-चंद्र बुरुज पाहून तटबंदीवरुन पुढे चालत जातांना काही बुरुज लागतात. साधारणपणे १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या टोकावरील भव्य बुरुजा जवळ पोहोचतो. या बुरुजाचा आकार चौकोनी आहे. बुरुजाच्या दोन्ही बाजूला खाली उतरणार्या पायर्या आहेत. खाली एखादे दालन असण्याची शक्यता आहे. बुरुजावर चढण्यासाठी पायर्या आहेत. बुरुजावरुन ज्योतीबाचा डोंगर आणि दुरवरचा प्रदेश पाहायला मिळतो. हा बुरुज पाहून किल्ल्याच्या दुसर्या बाजूच्या तटबंदीवरुन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर काही बुरुज पाहायला मिळतात. पुढे तटबंदीला लागून हजरत पीर हुसेन जहांगिर उर्फ़ लगोडबंद बाबाचा दर्गा आहे. याठिकाणी एकेकाळी मार्कंडेय ऋषींची गुहा होती. आज या दर्ग्यात एक कबर आहे. दर्ग्या समोर एक भला मोठा बुरुज होता आणि त्या बुरुजाच्या आतमधून प्रवेशव्दाराकडे जाणार्या पायर्या एकेकाळी होत्या. आता बुरुज अर्धा ढासळलेला आहे आणि पायर्या सिमेंट कॉंक्रीटने बांधून काढलेल्या आहेत. हा बुरुज पाहून पुढे गेल्यावर अजून एक बुरुज लागतो. त्या बुरुजाच्या बाजूने खाली जाण्यासाठी पायर्या आहेत. या पायर्यांनी ५ मिनिटे खाली उतरुन गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. हे टाके पाहून पुन्हा दर्ग्यापाशी येऊन पावनगडावरील वस्तीत आलेल्या रस्त्यापर्यंत चालत यावे. पन्हाळगडापासून आलेला रस्ता या वस्तीपाशी संपलेला आहे. या रस्त्याने परत हनुमंत प्रवेशद्वारापर्यंत चालत जाण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
१) पन्हाळा किल्ल्यावरील तीन दरवाजा पासून काली बुरुजाकडे जाणार्या रस्त्याने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बंगल्या जवळ एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्यावर पराशर ऋषींची गुहा आहे. हाच रस्ता पुढे पावनगडाकडे जातो. हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने पुढे कच्चा (मातीचा) आहे. त्यावरुन दुचाकी आणि चारचाकी वहानाने जाता येते. पन्हाळा बस स्टॅंड ते पावनगड अंतर ४ किलोमीटर आहे. २) पावनगडा खालच्या बुधवार पेठेतील बांबरवाडीतून एक वाट पावनगडावर येते . स्थानिक लोक हिच वाट वापरत असल्याने वाट मळलेली आहे. या वाटेने गडावर येण्यासाठी ३० मिनिटे लागतात. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. | |||||
जेवणाची सोय : | |||||
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर पिण्याचे पाणी आहे. | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
बुधवार पेठ गावातून पावनगडावर जाण्यासाठी ३० ते ४० मिनिटे लागतात. | |||||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||
वर्षभर |
डोंगररांग: Panhala | पावनगड (Pawangad) |