मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मोरधन (Mordhan) किल्ल्याची ऊंची :  3480
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मोरा डोंगर
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
पूरातन काळापासून नाशिक ही मोठी बाजारपेठ होती. डहाणू, तारापूर, सोपारा , कल्याण या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत येत असे. यातील काही पूरातन घाटमार्ग, उदाहरणार्थ कसार्‍याचा "थळ" घाट, "त्र्यंबक" घाट हे आजही वापरात आहेत. तर काही घाटवाटा काळाच्या ओघात आता विस्मरणात गेलेल्या आहेत. त्याचपैकी एक असलेल्या "शिर"घाटावर नजर ठेवण्यासाठी मोरधन व कावनई किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी किनार्‍याजवळ , घाटमार्गावर व घाटावर किल्ले बांधून संरक्षणाची साखळी तयार केली जात असे. डहाणू, तारापूर या बंदरांवर किल्ले होते, त्यानंतर घाटमार्गावर भूपतगडचा किल्ला व घाटमाथ्यावर मोरधन व कावनईची संरक्षणासाठी योजना करण्यात आली होती.

खैरगाव या छोट्याश्या वस्तीच्या उशाशी असलेल्या डोंगररांगेवर एकेकाळी मोरांचा वावर होता त्यामुळे हा डोंगर आजही मोरा डोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या सर्वोच्च टोकावर मोरधन किल्ला आहे. या किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.
14 Photos available for this fort
Mordhan
पहाण्याची ठिकाणे :
खैरगावातील तिठ्यावर उतरल्यावर गावात शिरणार्‍या रस्त्याने २ मिनिटात आपण शाळेजवळ पोहोचतो. येथे एका चौथर्‍यावर आभाळाखाली गणपतीची शेंदुर लावलेली मुर्ती ठेवलेली आहे. गजानना दर्शन घेऊन मोरा डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. गावा मागे पसरलेल्या मोरा डोंगराच्या मागे एक कातळटोपी घातलेला डोंगर दिसतो तोच "मोरधन किल्ला" होय. किल्ल्यावर जाण्यासाठी समोरच्या डोंगराच्या कातळ कड्याच्या खाली पोहचावे, येथून कातळ कड्याला वळसा घालून पायवाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पावसाळ्यात या घळीतून ओढा वहात असतो. पठारावर आल्यावर उजव्या बाजूला मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर दिसतो. पायथ्याच्या खैरगावातून पठारावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दिड तास लागतो. पठाराच्या दक्षिण टोकाला झर्‍याच्या काठी मंदिर व आश्रम आहे.

पठारावरून किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन डोंगरावर चढणारी वाट पकडावी. साधारणपणे ३० मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची रुंदी कमी आहे. गड माथ्यावर दक्षिणेला व उत्तरेला एक पाण्याच टाक व घराच जोत आहे. दक्षिणेकडील टाक्याच्या काठावर देवाची बैठक आहे. एका दंतकथे नुसार आज नाशिक जवळ असलेली पांडवलेणी देव या डोंगरावर एका रात्रीत खोदणार होते. पण टाक खोदून झाल्यावर अवेळी (रात्रीच) कोंबडा आरवला. त्यामुळे देवांना वाटले सकाळ झाली आणि ते मोरा डोंगर सोडून पुढे गेले. देवांनी टाक्याच्या काठावर जिथे विश्रांती घेतली , त्या जागी कातळाला विशिष्ट आकार आलेला आहे. त्याला स्थानिक लोक देवाची बैठक म्हणतात.

गडमाथ्यावर भन्नाट वारा असतो. गडमाथ्यावरून पूर्वेला कळसूबाईच डोंगर, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले दिसतात. उत्तरेला कावनई किल्ला व त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. तसेच नांदगाव धरणाचा कॅचमेंट एरीया गडावरून दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) रस्त्याने :- मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबई पासून १२८ किमी अंतरावर घोटी गाव आहे. घोटी गावातून घोटी - सिन्नर रस्ता जातो. या रस्त्यावर घोटी पासून ४ किमी अंतरावर देवळे गाव आहे. देवळे गावातून उजव्या बाजूचा रस्ता २ किमी वरील किल्ल्याच्या पायथ्याच्या खैरगावात जातो.

२) रेल्वेने :- अ) मुंबईहून सकाळी ५.२९ वाजता ( ठाणे - ५.५९ , कल्याण - ६.२० ) निघणारी मुंबई - भुसावळ पॅसेंजर (५११५३ डाऊन /५११५४ अप) गाडी पकडावी, ही गाडी १०.०० वाजता घोटी स्थानकात पोहोचते. येथून बस स्टॅंडला येऊन रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते. मुंबईला परत येण्यासाठी भुसावळ - मुंबई पॅसेंजर दुपारी २.०० वाजता आहे.
ब) मुंबईहून रेल्वेने कसारा गाठावं. कसार्‍याहून जीप किंवा बसने घोटी गाठावं. घोटी बस स्टॅंडवरून रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. खैरगावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर किंवा खैरगावात जेवणाची सोय नाही. घोटी येथे जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय :
गडावर पिण्यासाठी पाणी नाही . पाणी सोबत बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
खैरगावातून मोरधन किल्ल्यावर जाण्यासाठी २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
किल्ल्यावर पाणी व सावली नसल्यामुळे मार्च ते मे सोडून वर्षभर जाता येते.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...