मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अंबागड (Ambagad) किल्ल्याची ऊंची :  1500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अंबागड
जिल्हा : भंडारा श्रेणी : मध्यम
नागपूर पासून १०० किलोमीटर अंतरावर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अंबागड नावाचा सुंदर पण अल्पपरिचित किल्ला आहे . किल्ल्याचे बांधकाम त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने मजबूतीकरण केल्यामुळे किल्ला उत्तम अवस्थेत आजही उभा आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झालेले आहे .
28 Photos available for this fort
Ambagad
Ambagad
Ambagad
इतिहास :
गौंड राजा बख्त बुलंद याचा सरदार राजखान पठाण याने हा किल्ला इसवीसन १७०० च्या सुमारास उभारला . पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर त्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला .
पहाण्याची ठिकाणे :
पायऱ्याच्या मार्गाने साधारणपणे आपण अर्ध्या तासात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो . किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार दोन भव्य बुरुजांच्या मध्ये लपवलेले आहे . बुरुजामध्ये जंग्या आणि वरच्या बाजूला चर्या आहेत . प्रवेशद्वारावर पिंपळपान आणि कमलपुष्प कोरलेली आहेत . प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आहेत देवड्यामधून बुरुजावर जाण्यासाठी जीना आहे . बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या आतील भागावर नजर ठेवता येते . बुरुज पाहून खाली उतरून पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते . त्यात शेंदूर लावलेला एक दगड आहे . हे मंदिर हल्लीच्या काळात बांधलेले असावे . या मंदिराजवळ एक चुन्याच्या घाण्याचे तुटलेले चाक पडलेले आहे . येथून उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीकडे जावे . फांजी वरुन पुढे जातांना २ अर्धवर्तुळाकार बुरूज आहेत . पुढील वाट बंद झाल्याने पुन्हा देवड्यांपाशी येउन किल्ल्यात जाणाऱ्या पायवाटेने पुढे जातांना डाव्या बाजूला एक विहीर आहे . उजव्या बाजूला साचपाण्याचा बांधीव तलाव आहे . त्यावर एक पडकी वास्तू आहे . पुढे डाव्या बाजूच्या फांजीवर चढून पुढे जातांना ठरावीक तीन बुरुज लागतात. पुढे थोड्या पायऱ्या चढल्यावर चौथा बुरुज लागतो या बुरुजाच्या उजव्या बाजूला मोठा आयताकृती बांधीव तलाव आहे . या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . या तलावाच्या बाजूला वास्तूचे प्रवेशद्वार आहे. काटकोनात वळणार्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण उध्वस्त वास्तूत प्रवेश करतो . ही वास्तू दुमजली असावी. दुसऱ्या मजल्यावर चढून गेल्यावर डाव्या कोपऱ्यात कमानदार छत असलेली उध्वस्त इमारत आहे . या इमारतीला एकही खिडकी नाही . इमारतीच्या रचनेवरून येथे दारु कोठार असावे . दारु कोठार पाहून उजव्या बाजूला आल्यावर एक चौकोनी बांधीव विहीर आहे . विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. विहिरीच्या पायऱ्याच्या वरच्या बाजूला एक मेघडंबरी आहे . बाजूलाच किल्ल्याची प्रवेशद्वारापासून आलेली तटबंदी आहे . किल्ल्याचा हा भाग पाहून आल्या मार्गाने खाली उतरावे . मुख्य वाटेवर येउन बालेकिल्ल्यावर जातांना डाव्या बाजूला दोन अर्धवर्तुळाकार बुरुज लागतात . बालेकिल्ल्यातील चारही बुरुज चौकोनी आहे . किल्ल्याच्या टोकाला असलेल्या चौकोनी बुरुजात एक खोली आहे . या खोलीतून बुरुजाच्या / किल्ल्याच्या बाहेर पडता येते . हा बुरुज पाहून पुन्हा किल्ल्यात येउन मधला मोकळा भाग ओलांडून पलीकडे पडक्या भिंतीतून वर चढून जावे . याठिकाणी दुमजली महाल होता आता त्यापैकी वरचा मजला नष्ट झालेला आहे . भिंतीतले कमानदार कोनाड्यावरुन आपण आज त्याचा अंदाज लावू शकतो . खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत . पण त्यात मलबा पडल्यामुळे आणि पाणी साठल्यामुळे खाली जाता येत नाही . या महालातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नक्षीकाम केलेले कोनाडे असलेली एक भिंत आहे . ही भिंत संपते तेथे एक चौकोनी बुरुज आहे . या बुरुजात चोर दरवाजा आहे . बुरुजात असलेल्या पायऱ्यानी खाली उतरल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला येतो . येथून किल्ल्याखाली जाणारी वाट आहे . या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते .
पोहोचण्याच्या वाटा :
१) नागपूर - जांब गाव - रामपूर - अंबागड हे अंतर ९२ किलोमीटर आहे. जांब गावातून रामपूर गाठावे रामपूर गावातून उजवीकडे एक रस्ता जातो या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता आंबा गडाकडे जातो . या रस्त्याने अंबागडच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत अंतर ३ किमी आहे. या रस्त्याने मोटार सायकल किंवा चालत अंबागडाच्या पायथ्याशी जाता येते, या कच्च्या रस्त्याने न जाता डांबरी सडकेने पुढे गेल्यावर २ किलोमीटरवर अंबागड गाव आहे . या गावातल्या चौकातून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने अर्धा किलोमीटर अंतर गेल्यावर एक कालवा लागतो . या कालव्याच्या उजव्या काठाने एक कच्चा रस्ता अंबागड कडे जातो. या रस्त्याने गाडीने (जीप/ मोटारसायकल) थेट अंबागडच्या (३ किलोमीटर ) पायथ्याशी जाता येते . हा पूर्ण रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात या रस्त्याने गाडी जा्णे शक्य नाही . अंबागड गावातून चालत जावे लागते . किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे . तेथूनच किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत .
२) नागपूर -उसर्रा - बपेरा - रामपूर - अंबागड असाही रस्ता आहे. या रस्त्याने नागपूर ते अंबागड अंतर ९४ किलोमीटर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहाण्याची सोय होवू शकेल.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्याच्या हनुमान मंदिरापासून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Bhandara
 अंबागड (Ambagad)