मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
रायगड (Raigad) | किल्ल्याची ऊंची :  2900 | ||||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: रायगड | ||||||
जिल्हा : रायगड | श्रेणी : मध्यम | ||||||
महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. महाराष्ट्रात राहाणार्या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप वे मुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्यात आलेला आहे. |
|||||||
|
|||||||
इतिहास : | |||||||
रायगडाचे प्राचीन नाव ’रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य, तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम होता. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ’रासिवटा’ व ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही नाव होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात असे. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला करुन मोर्यांचा धुव्वा उडवला. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला; तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते, ’राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.’ याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे १) रायगड , २) रायरी, ३) इस्लामगड, ४) नंदादीप, ५) जंबुद्विप, ६) तणस, ७) राशिवटा, ८) बदेनूर, ९) रायगिरी, १०) राजगिरी, ११)भिवगड, १२) रेड्डी, १३) शिवलंका, १४) राहीर, १५) पूर्वेकडील जिब्राल्टर शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती. गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. दिनांक २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत :ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ’शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली.शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दु :खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ’ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु ७, इ.स १६८१, १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ’इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला. |
|||||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||||
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत. १) चित दरवाजा, २) नाणे दरवाजा , ३) रज्जू मार्ग (रोप वे). यापैकी चित दरवाजा हा मार्गे मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. १) खुबलढा बुरूज :- चित दरवाजा मार्गे चढतांना, गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ’चित्दरवाजा’ म्हणत. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. २) वाळसुरे खिंड :- खुबलढा बुरूजाच्या पुढे वाळुसरे खिंड आहे. ३) नाना (नाणे) दरवाजा :- या दरवाजास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. ४) मदारमोर्चा :- चित्दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे दोन प्रचंड तोफ़ा आहेत. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात. ५) महादरवाजा :- महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाजाच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. तिथे जाण्यासाठी सध्या वाट नाही. ६) चोरदिंडी :- महादरवाजा पासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी (चोर दरवाजा) बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्या आहेत. या तटबंदीवर काही तोफ़ा आहेत. ७) हनुमान टाक(चांभार टाक) :- किल्ल्यावर आल्यावर डाव्या बाजूला हनुमानाचे शिल्प कोरलेले टाक पाहायला मिळते. य टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे, टाक्याच्या वरच्या बाजूला वास्तूंचे अवशेष आहेत. ८) हत्ती तलाव :- हनुमान टाक्याच्या जवळ मोठा तलाव आहे त्या तलावाला हत्ती तलाव म्हणतात. तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसविलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. आज हा दगड नसल्यामुळे तलावात पाणी साठत नाही. ९) गंगासागर तलाव:- हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० - ६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई. १०) स्तंभ :- गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. पूर्वीच्या काळी हे मनोरे पाच मजली होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. ११) पालखी दरवाजा :- रायगडावरील मनोर्यांच्या (स्तंभांच्या) पश्चिमेस तटबंदीत ३१ पायर्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. १२) राजभवन :- राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आ.हे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे, तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३) रत्नशाळा :- राजप्रासादा जवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. १४) राजसभा :- महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ’तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली. राजसभेला चारही बाजुंनी तटबंदी आणि सिंहासनाच्या समोर भव्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशव्दाराच्यावर असलेल्या कमानयुक्त जागेला नगारखाना म्हणतात. प्रवेशव्दाराच्या देवड्यांमधून याठिकाणी चढून जाण्यासाठी अरुंद आणि काटकोनात वळणार्या पायर्या आहेत. सध्या हा मार्ग पुरातत्व खात्याने बंद केलेला आहे. १५) मेणा दरवाजा :- पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ - उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात, ते आहेत राण्यांचे महाल. राण्याच्या महालात असलेले शौचकुप पाहाण्यासारखे आहेत. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. सध्या रोप वे ने आल्यास आपला मेणा दरवाजातून किल्ल्यावर प्रवेश होतो. १६)अष्टप्रधानांचे वाडे :- मेणा दरवाजातून खाली उतरुन डाव्या बाजूला चालत गेल्यास वाड्यांचे चौथरे आणि अवशेष दिसतात त्यांना अष्टप्रधानांचे वाडे म्हणून ओळखले जाते. १७) कुशावर्त तलाव:- अष्ट्प्रधानांच्या वाड्यापासून उजवीकडे वळून खाली उतरल्यावर किंवा होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ रामेश्वर महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर नंदी दिसतो. मंदिरा समोर दोन समाध्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक तुळशी वृंदावन आहे. हीच वाट पुढे बारा टाक्यांकडे जाते. १८) वाघदरवाजा :- कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ’किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन - तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती. १९) शिर्काई देऊळ :- होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ शिर्काई ही गडावरील मुख्य देवता होय. २०) अंबरखाना :- शिर्काई देवीच्या देवळा समोर असलेल्या इमारतीला अंबरखाना (गजशाळा) म्हणतात. २१) बाजारपेठ :- राजसभेच्या महादारतून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ’होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ होती असे म्हटले जाते. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे. त्यातील एका वास्तूच्या बाहेर सर्पशिल्प कोरलेले आहे. २२) ब्राम्हण तलाव :- बाजारपेठेच्या पुढे जगदिश्वर मंदिराकडे जातांना उजव्या बाजूला (पूर्वेकडील उतारावर) ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. ब्राम्हण तलावाच्या समोरच्या बाजूला कोठाराचे अवशेष आहेत. २३) कोळींब तलाव : - बाजारपेठेच्या पुढे जगदिश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला काही वास्तूंचे अवशेष दिसतात. त्यापुढे कोळींब तलाव आहे. २४) टकमक टोक :- बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी. २५) जगदीश्वर मंदिर :- जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे, ’सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे: श्री गणपतये नम : । प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत :। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।। वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।। याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे, ’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’ २६) महाराजांची समाधी :- मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी आहे असे सभासद बखर म्हणते, ’क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले, तेथे काळ्या दगडाच्या चिर्याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. २७) बारा टाकी आणि भवानी टोक :- महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. भवानी टोकाकडे जातांना उजवीकडे तलाव आहे, तलावाच्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. तेथून पुढे गेल्यावर दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात. बारा टाकी पाहून भवानी टोकाकडे जातांना उत्तर दिशेला काळा हौद आणि काही उध्वस्त वास्तू दिसतात. पुढे भवानी टोकाजवळ एक तलाव आहे. भवानी टोकाजवळ एक गुहा आणि त्यामध्ये भवानी मातेचे मंदिर आहे. २८) हिरकणी टोक :- गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते, ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे. | |||||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||||
१) मुंबई - गोवा मार्गावरील महाड बस स्थानकामधून :- मुंबई - गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित् दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्या सुरू होतात. तेथे उतरून पायर्यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो. २ नाना दरवाजाकडून :- नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने गेल्यास नाना दरवाजाने आपण गड चढू शकतो. ३ रोप वे:- आता गडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहोचू शकतो. | |||||||
राहाण्याची सोय : | |||||||
रायगड किल्ल्यावर राह्ण्याची सोय नाही. पाचाड गावात राहाण्याची सोय आहे. | |||||||
जेवणाची सोय : | |||||||
पायथ्याच्या पाचाड गावी श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन (०२१४५) २७४८४८, ९४२२६८९८९७,९६०४१६१७१८ . गडावरील काही गाईड त्यांच्या घरात जेवणाची सोय करतात. | |||||||
पाण्याची सोय : | |||||||
गंगासागर तलावाचे पाणी आणि हनुमान टाक्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. २०१५ साली दोनीही पाणीसाठे खराब झालेले आढळले. | |||||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||||
पायर्यांच्या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. | |||||||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||||
वर्षभर |
जिल्हा Raigad | अवचितगड (Avchitgad) | भीमाशंकर (Bhimashankar) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) | बिरवाडी (Birwadi) |
चांभारगड (Chambhargad) | चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | कुलाबा किल्ला (Colaba) |
दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) | ढाक बहिरी (Dhak-Bahiri) | द्रोणागिरी (Dronagiri) | घारापुरी (Gharapuri) |
घोसाळगड (Ghosalgad) | हिराकोट (Hirakot) | ईरशाळ (Irshalgad) | जंजिरा (Janjira) |
कर्नाळा (Karnala) | खांदेरी (Khanderi) | खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोकणदिवा (Kokandiva) |
कोंढवी (Kondhavi) | कोर्लई (Korlai) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लिंगाणा (Lingana) |
मदगड (Madgad) | मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) | माणिकगड (Manikgad) |
मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मृगगड (Mrugagad) | पाचाड कोट (Pachad Fort) | पदरगड (Padargad) |
पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पेब (विकटगड) (Peb) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) |
प्रबळगड (Prabalgad) | रायगड (Raigad) | रामदरणे (Ramdarne) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) |
रेवदंडा (Revdanda) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सामराजगड (Samrajgad) | सांकशीचा किल्ला (Sankshi) |
सरसगड (Sarasgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) | शिवथरघळ (Shivtharghal) | सोंडाई (Sondai) |
सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुधागड (Sudhagad) | सुरगड (Surgad) | तळगड (Talgad) |
तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंदेरी (Underi) |