मोरगिरी
(Morgiri) |
किल्ल्याची ऊंची : 
3010 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: लोणावळा |
जिल्हा : पुणे |
श्रेणी : कठीण |
पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात कोरीगड , घनगड , तुंग , तिकोना हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले आहेत . या किल्ल्यां बरोबर मोरगिरी नावाचा अपरिचित किल्ला या परिसरात आहे . या किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहाता हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा .
मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने त्याठिकाणी लोखंडी शिडी बसवलेली आहे. तसेच दोन ठिकाणी अवघड कातळ टप्प्यांवर सुरेक्षेसाठी रोप वापरावा .
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
जांभुळणे हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी गावापासून किल्ल्याचा पायथा १ तास अंतरावर आहे . गावातून मागे एक डोंगर आहे . या डोंगरासमोर उभे राहील्यावर डोंगराच्या उजव्या अजून एक डोंगर दिसतो या दोन डोंगरांच्या मधील खिंडीतून डोंगरावर जाणारी मळलेली वाट आहे . डोंगर धारेवरुन दाट झाडीतून १५ मिनिटे चढल्यावर कारवीचे रान लागते. हे रान पार केले की आपण पठारावर पोहोचतो . गावापासून अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो .पठार लांबलचक पसरलेले आहे . पठारावर डाव्या बाजूला एक डोंगर आहे . त्याच्या पुढे कातळटोपी घातलेला डोंगर आहे . तो मोरगिरी किल्ला आहे . पठारावरुन किल्ल्याच्या माथ्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसतो. डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत पठारावरुन अर्धा तासा चालल्यावर आपण मोरगिरीच्या कातळटोपी खाली येतो. इथून वाट खड्या चढाईची आहे . पहील्या टप्प्यात दाट झाडी मुळे सावली आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात कारवीच्या रानातून वाट जाते. हा टप्पा अर्ध्या तासात पार पाडल्यावर आपण किल्ल्याच्या कातळ भिंती पाशी पोहोचतो . या ठिकाणी कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत . पायऱ्यानी वर चढून गेल्यावर समोरच पाण्याचे टाक आहे . त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही . या टाक्याच्या पुढे एक ५ फुटाचा कातळ टप्पा आहे तो सांभाळून पार केला की दुसरे टाके दिसते . यात जाखादेवीचे ठाणे आहे . या टाक्यातील पाणीही पिण्या योग्य नाही . या टाक्या जवळच एक शिडी लावलेली आहे . शिडी जेथे संपते त्याच्यावर २ फुटावर एक मोठा लोखंडी खिळा मारलेला आहे . त्या खिळ्यावर भार देउन शिडीच्या शेवटच्या पायरीवरुन बाजूच्या कातळावर काळजीपूर्वक उतरावे लागते . शिडी पार केली की पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या चढून गेल्यावर बऱ्यापैकी सपाटी असलेला भाग आहे . इथून किल्ल्यावर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्याने आपण ५ मिनिटात गडावर पोहोचतो. गडाचा माथा छोटा आहे . गड माथ्यावर एक पाण्याचे टाक आहे . पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत .
गडावरून पवना धरणाचे बॅकवॉटर,तुंग,तिकोना आणि कोरीगड हे किल्ले दिसतात .
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भुशी डॅम, आएनएस शिवाजी वरुन जाणाऱ्या रस्त्याने १६ किलोमीटर वरचा ॲम्बी व्हॅलीला जाणारा फ़ाटा गाठावा . या फ़ाट्यावरुन एक रस्ता ॲम्बी व्हॅलीकडे आणि दुसरा रस्ता तुंग किल्ल्याकडे जातो. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणार्या एस. टी बसने फ़ाट्यावर उतरुन तुंग किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर जावे. तुंग किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्तावर एस्सार ॲग्रोटेक आणि क्लब महिंद्रकडे असे फ़लक लावलेले आहेत. या रस्त्यावर फाट्यापासून दिड किलोमीटरवर जांभुळणे गाव आहे. खाजगी गाडीने थेट गावात जाता येते. जांभुळणे गावातील वस्तीतून गावा मागील डोंगरावर आणि तेथून पुढे किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे . सुरवातीला आणि पायवाटेवरही " मोरगिरी किल्ल्याकडे" असे फलक लावलेले आहेत.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही .
|
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही
|
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
पायथ्यापासून ३ तास लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
नोव्हेंबर ते एप्रिल |