फिरंगकोट
(Firang kot) |
किल्ल्याची ऊंची : 
70 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : ठाणे |
श्रेणी : मध्यम |
लोणावळाच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणारी उल्हास नदी वसई जवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीवरील कल्याण हे प्राचीन बंदर आहे. कल्याण बंदरातून माल विविध घाट मार्गांनी घाटावरील बाजारपेठां मध्ये जात असे. उल्हास खाडीतून कल्याण पर्यंत जाणार्या व्यापारी जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी, त्यावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले, चौक्या उल्हास खाडीच्या आसपास बांधलेल्या दिसतात. त्यापैकी खाडी मुखावर असलेला वसई किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, नागला बंदर किल्ला, गायमुख किल्ला, पिंपळास किल्ला (चौकी), वेहेळे किल्ला (चौकी) कल्याणचा दुर्गाडी किल्ला असे अनेक किल्ले, चौक्या वेगवेगळ्या काळात, राजवटीत बांधले गेले. पोर्तुगिजांनी बांधलेले हे किल्ले (चौक्या) वसईच्या युध्दात मराठ्याच्यां ताब्यात घेतल्या. त्यानंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता भारतभर पसरली. पोर्तुगिजांची सत्ताही महाराष्ट्रातून निघुण गेली आणि गोव्यापुरती सिमित राहीली . त्यामुळे पोर्तुगिजांनी कल्याण ते वसई या परिसरातील खाड्यांवर , नद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले हे किल्ले (चौक्या) काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या. आजही त्यातील फ़क्त काही भिंती कशाबशा तग धरुन आहेत. यातील अनेक किल्ले खाजगी मालमत्ता झाल्याने काही काळातच नष्ट होऊन जातील.
या कोटाचे फ़ारसे अवशेष शिल्लक न राहील्याने किल्ला किंवा त्यावरील अवशेष पाहायला गेल्यास या कोटाला भेट देणार्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. |
|
पहाण्याची ठिकाणे : |
फ़िरंगपाडा गावाच्या जवळ एक छोट्या टेकडीवर फ़िरंगकोट आहे. खारबाव कोट पाहून फ़िरंगपाड्याकडे जाणार्या रस्त्यावर फ़िरंगपाडा गावाची कमान आहे. त्या कमानीतून गावात न जाता उजव्या बाजूला जाणार्या रस्त्याने २ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक टेकडी आणि खाली वीट भट्ट्या दिसतात , या वीजभट्यांसाठी माती उकरल्यामुळे टेकडीवर चढायला नीट वाट उरलेली नाही. दोन वीट भट्यांच्या मध्ये असलेल्या छोट्या वाटेने १० मिनिटात टेकडीवर पोहोचता येते . वाटेवर जागोजागी माती खोदून नेल्याने मोठे खड्डे पडलेले आहेत. टेकडीच्या माथ्यावर एका वास्तूचे अवशेष आणि चौथरा तग धरुन उभा आहे. किल्ल्याच्या अवशेषांचे कॉऑरडीनेट्स Firangkot 19°18'45.77"N, 73° 0'5.78"E.
खारबाव कोट पासून २.५ किमी अंतरावर फ़िरंगकोट आहे. फ़िरंगकोट ६.५ किमी अंतरावर नांदरुखी कोट आहे
|
पोहोचण्याच्या वाटा : |
कल्याण - भिवंडी मार्गे खारबाव - फ़िरंगकोट अंतर २१.५ किलोमीटर आहे. खारबाव कोट पाहून फ़िरंगपाड्याकडे जाणार्या रस्त्यावर फ़िरंगपाडा गावाची कमान आहे. त्या कमानीतून गावात न जाता उजव्या बाजूला जाणार्या रस्त्याने २ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक टेकडी आणि खाली वीट भट्ट्या दिसतात , या टेकडीवर फ़िरंगकोटाचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या अवशेषांचे कॉऑरडीनेट्स Firangkot 19°18'45.77"N, 73° 0'5.78"E.
|
राहाण्याची सोय : |
राहाण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
जेवणाची सोय नाही.
|
पाण्याची सोय : |
पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
पायथ्यापासून १० मिनिटे लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |