भिलाई
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Bhilai Fort from Dagadi Sakpde
प्रस्तावना
सेलबारी - डोलबारी या डोंगररांगांवर असलेल्या साल्हेर, सालोटा, मुल्हेर इत्यादी महत्वाच्या किल्ल्यांकडे जाणार्या मार्गावर आणि आसपासच्या चणकापूर डोंगररांगेवर पिंपळा, प्रेमगिरी, भिलाई सारखे छोटे टेहळणीचे किल्ले आहेत. भिलाई किल्ला दगडी साकोडे गावाजवळ आहे. दीपावलीला गडावरील गुहेत दगडी साकोडे गावातील लोक मोठ्याप्रमाणावर दर्शनाला येतात. इतरवेळी किल्ल्यावर किंवा आसपास माणूस सापडणे मुश्कील आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर मोठ्या प्रमाणावर घसारा (स्क्री) आहे. तसेच माथ्यावर जातांना दोन कातळटप्पे चढून जावे लागतात. त्या दृष्टीने तयारीनेच किल्ल्यावर जावे.
महत्त्वाची ठिकाणे
भिलाई किल्ल्यापासून पायथ्याचे दगडी साकोडे गाव २ किलोमीटर अंतरावर आहे. दगडी साकोडे गावतून समोरच कातळटोपी घातलेला भिलाई किल्ला दिसतो. भिलाईहून पाटोळे साखरपाड्याला जाणार्या रस्त्याने साधारणपणे दोन किलोमीटर गेल्यावर साखरपाडा खिंड लागते. या खिंडीच्या डाव्या बाजूला अढीर डोंगर तर उजव्या बाजूला भिलाई किल्ला आहे. खिंड ओलांडून पुढे गेल्यावर रस्त्यालगत उतरणार्या डोंगरसोंडेने वर चढायला सुरुवात करावी. खिंडीच्यावर चढून आल्यावर उजव्या बाजूला शेंदूर फ़ासलेले काही दगड आहेत. ते पाहून भिलाई किल्ल्याचा डोंगराच्या आधी असलेल्या डोंगराच्या दिशेने चढाईला सुरुवात करावी. हा डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डावीकडे ठेवत भिलाईच्या कातळ टोपीच्या दिशेने चढाई करावी. हा सगळा भाग घसार्याचा (स्क्री) आहे. पायवाटा , ढोरवाटा एकमेकात मिसळलेल्या आहेत. त्यामुळे आपण भिलाईच्या कातळटोपीकडे लक्ष ठेवत त्या दिशेने चढत जायचे . खिंडीपासून साधारणपणे पाऊण तासात आपण कातळ टोपीच्या पश्चिम टोका खाली पोहोचतो. येथून दरी डावीकडे आणि कातळ टोपी उजवीकडे ठेवत पायवाटेने २ मिनिटे चालल्यावर एके ठिकाणी कातळ भिंतीवर चढण्यासाठी काही दगड रचून ठेवलेले दिसतात. दगडावरुन कातळावर चढून साधारणपणे १० फ़ूटाचा ओबडधोबड टप्पा पार केल्यावर पायवाट लागते. कातळटप्पा चढण्यासाठी रोपची गरज नसली तरी काही ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कातळ टप्पा चढून गेल्यावर समोर गडाचे टोक आणि त्याखालील गुहा दिसतात. या गुहांच्या दिशेने जातांना कातळात खोदलेली ५ कोरडी टाकी दिसतात. पुढे गुहेपर्यंत जाण्यासाठी पुन्हा कातळकड्याला भिडावे लागते. या ठिकाणी दोन गुहा आहेत. त्यात हनुमान, सप्तशृंगी देवीची मुर्ती आणि काही शेंदुर लावलेले दगड आहेत. गुहेपासून गडमाथ्यावर जाणारी पायवाट अरुंद आहे. या वाटेवर निवडूंगाची जाळी मोठ्या प्रमाणावर आहे. गडमाथा छोटासा आहे. त्यावर भगवा ध्वज लावलेला आहे. गडमाथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, पिंपळा, चौल्हेर हे किल्ले दिसतात.
कसे पोहोचावे
मुंबई - पुण्याहून नाशिकमार्गे सटाणा गाठावे. सटाण्याहून २८ किलोमीटर वरील दगडी साकोडे या भिलाई किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी दिवसातून ३ एसटीच्या गाड्या आहेत. भिलाईहून पाटोळे साखरपाड्याला जाणार्या रस्त्याने साधारणपणे दोन किलोमीटर गेल्यावर साखरपाडा खिंड लागते. या खिंडीच्या डाव्या बाजूला अढीर डोंगर तर उजव्या बाजूला भिलाई किल्ला आहे. खाजगी गाडीने नाशिक सटाणा मार्गे (११४ किलोमीटर) किंवा नाशिक - सप्तशृंगी - अभोना - कनाशी मार्गे (९४ किलोमीटर) भिलाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ खिंडीपासून गडमाथ्यावर पोहोचण्यास दिड तास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
सर्वोत्तम काळ
🌤️ जुलै ते मार्च
जवळील गावे
दगडी साकोडे
या परिसरातील इतर किल्ले चणकापूर डोंगररांग
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.