कल्याणगड (नांदगिरी)
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Kalyangad From Base Village
प्रस्तावना
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ’नांदगिरीचा किल्ला’ असे आहे. सातार्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला आपण पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्यावर असलेली व लांबलचक पसरलेली गुहा होय. फेब्रुवारी - मार्च पर्यंत या गुहेत पाणी असते. गुहेतील मिट्ट काळोखात, गुढगाभर गार पाण्यातून गुहेच्या टोकापर्यंत (दत्त पादुकांपर्यंत) जाण्याचा थरार या किल्ल्यावर अनुभवता येतो.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स ११७८ ते इ.स१२०९ या कालावधीत बांधला गेला असावा.
इ.स १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला, त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर गडाचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. पेशव्यांमध्ये व प्रतिनिधींमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यावर हा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्यावर चढताना वाटेत पाण्याचे दोन खांबी टाक लागत. कल्याणगडाला दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा उत्तराभिमुख आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूने तटबंदीच्या अनुरोधाने एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरल्यावर समोरच एक भुयार लागते. हे कल्याणगडावरील सर्वात प्रेक्षणीय स्थान आहे. या भुयाराची लांबी जवळजवळ ३० मीटर ,रूंदी ४ मीटर व ३ मीटर आहे. भुयारात १२ महिने पाणी असते. वाटेच्या आजुबाजूला लोखंडी कथडे आहेत. भुयाराच्या शेवटी नवव्या शतकात घडवलेली पाश्वर्नाथांची मूर्ती, पद्मावती देवीची मूर्ती आणि श्री दत्तात्रेयाची मूर्ती अशा ३ मूर्त्या आहेत. भुयारात बॅटरी घेऊन जाणे आवश्यकच आहे. पावसाळ्यात भुयारात उतरणे धोक्याचे आहे. हे भुयार पाहून परत पहिल्या दरवाजापाशी यावे. येथून वर जाणारी पायर्यांची वाट आपल्याला दुसर्या पूर्वाभिमुख दरवाजापाशी घेऊन जाते. या वाटेने गडावर प्रवेश करून समोरच हनुमान मंदिरातील हनुमानाचे दर्शन घेता येते. डावीकडे गेल्यावर एक बामणघर लागते. बामणघराच्या समोरच कल्याणस्वामींची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन पुढे निघावे वाटेतच श्री गणेशाचे मंदिर व एक मोठे तळे लागते. थोडेसे अंतर चालून गेल्यावर गडावरील वाड्यांचे अवशेष दिसतात. पुढे डाव्या बाजूला एका पीराचे थडगे आहे. तर उजव्या बाजूस एक तलवारीचे अप्रतिम शिल्प कोरलेला दगड पडलेला आहे. या वाटेने पुढे गेल्यावर गडाच्या पूर्व टोकापाशी आपण पोहचतो. या टोकावरून समोरच जरंडा, अजिंक्यतारा, यवतेश्वर, चंदनवंदन, मोर्या, वैराटगड ही ठिकाणे दिसतात. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.
कसे पोहोचावे
किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एसटी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मीचे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. या वाटेने कल्याणगडावरील गुहेपर्यंत जाण्यास ४५ मिनिटे लागतात.
किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता झालेला आहे. या रस्त्याने किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ पायथ्यापासून गुहेपर्यंत जाण्यास ४५ मिनिटे लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावरील हनुमान मंदिरात किंवा बामणघरासमोरील आवारात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते.
किल्ल्यावर धर्मशाळा आहे त्यात परवानगी घेऊन राहाता येते.
अन्न व्यवस्था
जेवणाची व्यवस्था आपण स्वत
:च करावी. गडाखाली नांदगिरी (धुमाळवाडी) गावात कल्याणगड धाबा आहे.
पाणी उपलब्धता
भुयारातील पाणी पिण्यासाठी बारामही उपलब्ध असते.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
किल्ल्याचे दरवाजे संध्याकाळी ५ वाजल्या नंतर बंद होतात.
पावसाळा सोडून इतर ऋतुत गुहेत जाता येते. येथे साधारण गुढगाभर पाणी असते. गुहेत जाण्यासाठी विजेरी (बॅटरी) घेऊन जाणे आवश्यकच आहे. भूयाराच्या बाहेरील बाजूस मधमाश्यांची पोळी आहेत. त्यामुळॆ गुहेत जातांना व आत गेल्यावरही आरडाओरड करु नये.
१) सातारा - पंढरपूर रस्त्यावर कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , महिमानगड हे तीन किल्ले आहेत. मुंबई / पुण्याहून रात्री निघून प्रथम कल्याणगड (नांदगिरी) पाहून घ्यावा. त्यानंतर वर्धनगड , महिमानगड हे किल्ले पाहून फलटण मार्गे परत यावे. यातील वर्धनगड , महिमानगड हे किल्ले आटोपशीर असल्यामुळे तीनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे.
२) वर्धनगड , महिमानगड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जवळील गावे
नांदगिरी (धुमाळवाडी).
या परिसरातील इतर किल्ले सातारा
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.