रतनगड(रत्नदुर्ग)

गिरीदुर्ग रायगड मिर्‍या डोंगर
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
1301
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
सर्व ऋतुत
🌤️
सर्वोत्तम काळ
पायथ्यापासून १ तास लागतो.

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Ratangad(Ratnadurg)fort from Saymal Village

Ratangad(Ratnadurg)fort from Saymal Village

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मिरगड उर्फ़ मिर्‍या डोंगर नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या मागच्या बाजूला एका छोट्या डोंगरावर रत्नदुर्ग नावाचा छोटा टेहळणीचा किल्ला आहे. मिरगड आणि रतनगड उर्ग रत्नदुर्ग किल्ल्याच्या मध्ये एक खिंड आहे. पेण - खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या खिंडीतून जात होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा. किल्ल्या वरील पाण्याची टाकी पाहाता हा किल्ला सातवहान कालिन असावा. हा छोटेखानी अपरिचित किल्ला मुंबई पुण्याहून एका दिवसात पाहात येतो.

कसे पोहोचावे

मुंबईहून दोन मार्गाने किल्ल्या पायथ्याच्या सायमाळ गावात पोहोचता येते.
१) मुंबई - पनवेल - पेण - कामार्ली - वाक्रुळ फ़ाटा -सायमाळ (अंतर ८० किमी) . पेण एसटी स्थानकातून पेण - तिलोरे जाणार्‍या एसटी बसेस आहेत. (एसटीचे वेळापत्रक साईटवर दिलेले आहे.) पेण सायमाळ अंतर १७ किमी आहे. या बसने सायमाळ फ़ाट्यावर उतरुन १ किमी चालत आपण १० मिनिटात गावात पोहोचतो.

२) मुंबई - खोपोली - वाक्रुळ फ़ाटा - सायमाळ (अंतर ७७ किमी). खोपोली पेण रस्त्यावर बर्‍याच एसटी बसेस धावतात. त्याने वाक्रुळ फ़ाट्याला उतरुन पेण - तिलोरे बस पकडून सायमाळ फ़ाट्यावर उतरावे. (एसटीचे वेळापत्रक साईटवर दिलेले आहे.) वाक्रुळ ते सायमाळ अंतर ७ किमी आहे.

खाजगी वहानाने थेट सायमाळ गावात पोहोचता येते.

महत्त्वाची ठिकाणे

सायमाळ हे रतनगड (रत्नदुर्ग) किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ३५ घरांची वस्ती, एक प्राथमिक शाळा असलेले हे गाव किल्ल्याच्या समोर वसलेले आहे. गावाला खेटून रांजण नावाचा डोंगर आहे. गावात एक नविन बांधलेले गणपती मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेऊन गावातील प्राथमिक शाळेपाशी पोहोचावे. या ठिकाणी ओतीव तोफ़ेचा मागचा तुकडा पडलेला आहे. तोफ़ पाहून कच्च्या रस्त्याने रतनगडाच्या दिशेला चालत निघावे. सायमाळ गाव आणि रतनगड यांच्या मध्ये दरी आहे. कच्चा रस्ता दरी पर्यंत जातो. पुढे पायवाटेने आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. गावापासून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यास १० मिनिटे लागतात. पायथ्या पासून १० मिनिटे चढून गेल्यावर गावदेवीचे १९८० मध्ये बांधलेले मंदिर आहे. मंदिरा बाहेर झिजलेली मुर्ती ठेवलेली आहे. मंदिरात ३ मुर्ती आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूने मागे जाऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्यावर गावकर्‍यांचा वावर नसल्याने पायवाटा ठळक नाही. किल्ल्यावर झाडी भरपूर असल्याने पायवाटा पाचोळ्या खाली झाकलेल्या आहेत. काही ठिकाणी मुरुमामुळे तीव्र घसारा आहे. हे सर्व पार करत तीव्र चढ चढून अर्ध्या तासात आपण सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेले गोल खळगे (पॉटहोल्स) दिसतात. या ठिकाणी बसून टेहळणी करणार्‍या टेहळ्यांचे उन पाऊसा पासून संरक्षण करण्यासाठी या पॉटहोल्स मध्ये लाकडी खांब रोवून त्यावर गवताचे छप्पर घातले जात असे. या ठिकाणाहून सायमाळ गावच्या बाजूचा रांजण डोंगर, दुरवरची तिलोरे, डोलवली इत्यादी गावे दिसतात.

पठारावरुन थोडेसे वर चढून गेल्यावर एक कातळात आतवर कोरलेले टाक दिसते. टाक्यात वरुन येणारी माती वर्षानुवर्ष जमा झालेली आहे. टाक पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाकडे न जाता डाव्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने वळासा घालून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले दुसरे टाक दिसते, हे टाक कोरडे आहे. टाक पाहून पुढे गेल्यावर आपण मिरगड आणि किल्ल्याचा डोंगर यामधील खिंडीच्या बाजूला येतो. येथे कातळात कोरलेले पॉटहोल्स आहेत. पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या खाचा आहेत. त्यातून जपून खाली उतरल्यावर पाण्याच मोठे टाक आहे. हे टाक पाण्याने भरलेले आहे पण पाण्याचा उपसा नसल्याने पाणी पिण्यायोग्य नाही. हे टाक भरल्यावर पाणी बाहेर जाण्यासाठी पन्हाळी दगडात कोरलेली आहे. या पन्हाळीच्या खालच्या बाजूला चौथे टाक आहे, ते पाहाण्यासाठी तिसर्‍या टाक्याच्या पुढे असलेला १० फ़ूटी कातळ टप्पा (रॉक पॅच) उतरुन जावे लागते. त्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे आणि सोबत रोप असणे आवश्यक आहे. चौथे टाक कोरडे आहे. ते पाहून आलेल्या मार्गाने जपून वर चढून पहिल्या टाक्यापर्यंत यावे. येथून गड माथ्यावर जाण्यासाठी वाट आहे. ५ मिनिटात ढासळलेल्या तटबंदीतून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. मिरगडच्या बाजूला एका ढासळलेल्या बुरुजाचे अवशेष आहेत. तटबंदीतून पाणी बाहेर जाण्यासाठी बनवलेली एक दगडी पन्हाळी तटबंदीवर पडलेली आहे. गडमाथ्यावर क्षेत्रपालाची मुर्ती आहे. या ठिकाणी पूर्वी छोटेसे देऊळ असावे त्याची साक्ष देणारा फ़ूल कोरलेला एक नक्षिदार दगड येथे पडलेला आहे. डाव्या बाजूला एक पिंड पडलेली आहे. गडावरुन मिरगड, माणिकगड, हेटवणे धरण दिसतात. आल्या वाटेने परत पायथ्याशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

गड छोटा असला तरी गडावर वावर नसल्याने आणि वाटा नष्ट झालेल्या असल्याने गावातून वाटाड्या घेऊन जावे.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

सायमाळ गावातील गणपती मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर आणि गावात जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्यायोग्य पाणी नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

जवळील गावे

Saymal

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा