मानगड
प्रस्तावना
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा असे काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणार्या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे कठीण झाले होते.
महत्त्वाची ठिकाणे
मानगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी पठारावर विंझाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या पाठिमागून गडावर जाण्यासाठी कातळात खोदून काढलेल्या पायर्या आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार व त्याबाजूचे बुरुज अजून सुस्थितीत आहेत. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनात दुसरे उध्वस्त प्रवेशद्वार लागते. याची कमान पुर्णपणे ढासळलेली आहे. कमानीच्या एका तुकड्यावर ‘नागशिल्प’ कोरलेले आहे. या द्वारातून आत शिरल्यावर डावीकडे राहण्यायोग्य गुहा आहे. गुहेजवळच खांब टाके आहे. वाटेच्या दुसर्या बाजूला असलेले पाण्याचे टाके बुरुजातच खोदलेले आहे.
दुसर्या प्रवेशद्वारापासून एक वाट उजवीकडे ‘मानगड माची’ कडे जाते. माचीवर जमिनीवरील खडकात खोदलेली ६ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या आजूबाजूला चांगलेच गवत माजलेले आहे. हे पाहून पून्हा प्रवेशद्वारापर्यंत मागे येऊन तटबंदीच्या कडेने बालेकिल्ल्यावर जाता येते. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच वाड्याचे चौथरे आहेत. त्याच्या बाजूलाच उध्वस्त मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.मागच्या बाजूला खाली दरीत पाण्याचे एक टाक आहे,ते पाहून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेल्यावर, तेथे पाण्याची दोन टाकी पाहायला मिळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे.मानगडच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे मोहक दृश्य दिसते वातावरण चांगले असल्यास रायगडचेही दर्शन होते.
कसे पोहोचावे
१) मुंबई - गोवा मार्गावरील माणगाव पासून मानगड १७ किमी अंतरावर आहे. माणगावहून बस किंवा रिक्षाने १० किमी वरील निजामपूर गाठावे. तेथून ४ किमी वर बोरवाडी मार्गे ३ किमी वरील मशिदवाडी या मानगडच्या पायथ्याच्या गावात जाता येते. गावात येणारा डांबरी रस्ता जिथे संपतो, तेथून सिमेंटचा रस्ता चालू होतो. या रस्त्याच्या टोकाला एक पायवाट डावीकडे जाते. या पायवाटेने किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण खिंडीपर्यंत येतो. खिंडीत असलेल्या मंदिरामागून पायर्यांची वाट गडावर जाते.
२) मानगड; पन्हाळघरला जाण्याचा स्वस्त पर्याय म्हणजे कोकण रेल्वे होय. दिवा(०६:००) - मडगाव पॅसेंजर, १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव - दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.
केवळ मानगडच पहायचा असल्यास परतीची मडगाव दिवा पॅसेंजर १७:१५ वाजता माणगाव स्थानकात येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ मशिदवाडीतून ४५ मिनिटे लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर राहण्याची सोय आहे.
अन्न व्यवस्था
माणगावमध्ये जेवणाची सोय आहे.
पाणी उपलब्धता
गडावर पाण्याची सोय आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ वर्षभर
अतिरिक्त माहिती
१) स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहोचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.
२) कुर्डूगड आणि पन्हाळघर या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
जवळील गावे
मशिदवाडी.
या परिसरातील इतर किल्ले रायगड
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.