वरळीचा किल्ला
(Worli Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
0 |
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : मुंबई |
श्रेणी : सोपी |
मुंबईच्या बेटांवर एकूण ११ किल्ले होते. त्यापैकी वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर इंग्रजांनी ‘‘वरळीचा किल्ला‘‘ बांधला. ह्या किल्ल्याचा उपयोग समुद्रीमार्गाने होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला. वरळीचे समुद्रात शिरलेले भूशिर, माहीमचा किल्ला व बांद्रयाचा किल्ला ही तीन ठिकाणे मिळून इंग्रजी ‘यू‘ या अक्षरा सारखा आकार तयार होतो. ह्या ठिकाणी नैसर्गिक अंतर्वक्र भूशिरामुळे येथे समुद्र नेहमीच शांत असतो. त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वहातूक होत असे. ह्या जलवहातूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी १६७५ साली वरळीचा किल्ला बांधला.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
वरळीच्या टेकडीवर असलेल्या ह्या किल्ल्याची नुकतीच डागडुजी पुरातत्व खात्याने केली आहे. त्यामुळे किल्ला सुस्थितीत आहे. छोट्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्या दरवाज्याच्या माथ्यावर घंटा बांधायचा छोटा टॉवर आहे. किल्ल्यात पाण्याची विहीर असून त्याच्या बाजुला अलिकडे बांधलेले छोटे मंदिर व व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जीना बांधलेला आहे. ह्या जिन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन बांद्रा, माहीम पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या बाहेर समुद्रकिनारी तोफांसाठी बांधलेले ३ चौथरे दिसतात. १७ व्या शतकाच्या अखेरीस समुद्री चाच्यांचा वाढलेल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी तोफांची योजना केली होती. किल्ल्यावरून वरळी-बांद्रे सागरी पुल पाहाता येतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
दादरहून वरळी कोळीवाड्यात जाणार्या (१६९;५६) बेस्ट बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन मच्छिमार वसाहतीतून १० मिनीटे चालत गेल्यावर आपण ह्या किल्ल्याजवळ पोहोचतो. किल्ला छोटा व आटोपशिर असल्यामुळे अर्ध्यातासात पाहून होतो.
|