मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
राजगड (Rajgad) | किल्ल्याची ऊंची :  1394 | ||||||||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||||||||
जिल्हा : पुणे | श्रेणी : मध्यम | ||||||||||
किल्ले राजगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर अन् भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. |
|||||||||||
|
|||||||||||
इतिहास : | |||||||||||
राजगडा संबधीचे उल्लेख १)‘राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला‘. - जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे) २) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो ‘राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दर्याखोर्यातून आणि घनघोर अरण्यातून वार्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.‘ ३) महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो,‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु ? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार !जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग, त्याचा घेर बारा कोसांचा, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते इतिहासातून अस्पष्टपणे येणार्या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर ज्ञात आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते "मुरंबदेव". हा किल्ला बहामनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरूंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज उपलब्ध नाही. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली‘. सभासद बखर म्हणतो की, ‘मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे‘. सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या, त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचे गाव होते, तेथे रान फार होते. त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती. ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे ‘सत्तावीस किल्ले तांब्रास दिले निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला‘. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आले. यानंतर मुगलानी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती. त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली. आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ’कानद खोर्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ’ असा आदेश दिला होता. ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वत: औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता. औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले, पण रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून द्यावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच, त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड‘ असे ठेवले. २९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते.(राजवाडे खंड १२) यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले होते. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबतपवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत. |
|||||||||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||||||||
गुंजवणे गावातून किल्ल्यावर येतांना उजव्या बाजूची वाट चोर दरवाजाकडे जाते, तर डाव्या बाजूची वाट गुहेकडे जाते. गुहा पाहून परत चोर दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो. पद्मावती माची: राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हण वर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत. पद्मावती तलाव : गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावाच्या डाव्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. पद्मावती मंदिर : सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मुर्ती दिसतात. मुख्य पुजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे, तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मुर्ती आहे.या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे. रामेश्वराचे मंदिर: पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. रामेशवर मंदिरापासून पायर्यांनी वर चढून गेल्यावर जुन्या वास्तुत असलेले पुरातत्व खात्याचे कार्यालय उजव्या बाजूला आहे. याच भागात राजवाडा आणि सदर यांचे अवशेष पाहायला मिळतात. राजवाडा: रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्याच्या मागे एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या पुढे सदर आहे. सदरेच्या समोर काही वास्तू आहेत . सदर: ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. सदरेच्या पुढे तीन वाटा फ़ुटतात एक वाट पाली दरवाजाकडे जाते , दुसरी सुवेळा माचीकडे आणि तिसरी वाट बालेकिल्ल्याकडे जाते. यापैकी उजव्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरुन गेल्यावर आपण पाली दरवाजा पाशी पोहोचतो. पाली दरवाजा: पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ’फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडावर जातांना उजव्या बाजूला एक शिलालेख पाहायला मिळतो. पाली दरवाजा पाहून आलेल्या वाटेने पुन्हा मागे येऊन मधल्या वाटेने बालेकिल्ल्याकडे जावे. बालेकिल्ला: राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी देवी मंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. चंद्र टाक्याच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आणि पाण्याची टाकी आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात. ब्रम्हर्षी ऋषीं मंदिरापासून पुढे गेल्यावर वरच्या टप्प्यावर प्रशस्त वास्तूंचे (वाड्यांचे ) चौथरे पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आणि उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. हे सर्व पाहून ब्रम्हर्षी ऋषीं मंदिरापासून उत्तर बुरुजाकडे जातांना खालच्या बाजूला गुहा आहे. पुढे उत्तर बुरुजावर पोहोचल्यावर तेथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला "उत्तर बुरुज" असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. उत्तर बुरुज पाहून पुन्हा आलेल्या मार्गाने टाक्यांना वळसा घालून पुढे गेल्यावर उध्वस्त वास्तूंचे चौथरे पाहायला मिळतात. बालेकिल्ला पाहून आल्या वाटेन खाली उतरुन तीन वाटा फ़ुटतात तेथे येऊन डाव्या बाजूची वाट पकडावी. या वाटेने पुढे सुवेळा माची कडे जातांना डाव्या बाजूला गुंजवणे दरवाजा आहे. दरवाजाकडे जातांना एक पाण्याचे टाक पाहायला मिळते. दरवाजाकडे जातांना डाव्या बाजूच्या तटबंदीत शरभ शिल्प पाहायला मिळते. गुंजवणे दरवाजा :- गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. गुंजवणे दरवाजा पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन सुवेळा माचीकडे जातांना उजवीकडे एक टेकाड आहे त्याला डुबा या नावाने ओळखले जाते. पुढे चालत जातांना उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू आणि हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. पुढे गेल्यावर दोन वाटा फ़ुटतात. डाव्या बाजूची वाट सुवेळा माचीकडे आणि उजव्या बाजूची काळेश्वरी बुरुजाकडे जाते. काळेश्वरी बुरुज आणि परिसर: काळेश्वरी बुरुजाकडे जातांना डाव्या बाजूला खालच्या पातळीवर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे मल्लिकार्जून मंदिर आणि भागिरथी मंदिराचे अवशेष आहेत. मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर वरच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. पुढे काळेश्वरी बुरुज आहे. बुरुजावर एक समाधी आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो. काळेश्वरी बुरुज पाहून पुन्हा दोन वाटा फ़ुटतात तेथेपर्यंत मागे येऊन सुवेळा माचीकडे जावे. सुवेळा माची: मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव "सुवेळा" असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एका वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. ही वास्तू सदर नावाने ओळखली जाते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसर्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसर्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकालाच नेढ किंवा ’हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे उजव्या बाजूला तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला "मढे दरवाजा" असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या (नेढ्याच्या पुढे) डाव्या बाजूला गुप्त दरवाजा आहे. तेथून पुढे चालत गेल्यावर चुन्याचा घाणा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत. त्यापैकी ७ बुरुज चिलखती बुरुज आहेत. तटबंदीत जागोजागी शौचकुप पाहायला मिळतात. सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. तर माचीच्या टोकाला असलेल्या बुरुजाकडे जातांना वाटेत पाण्याची टाकी आहेत. टोकाकडील बुरुजावर जाण्यासाठी प्रवेशव्दार आहे. तेथून खाली उतरल्यावर बुरुजाच्या तटबंदीत मारुतीचे शिल्प आहे. सुवेळा माची पाहून आल्या वाटेन पद्ममावती माचीच्या दिशेने मागे येऊन तीन वाटा फ़ुटतात तेथून उजवीकडील वाटेने संजिवनी माचीकडे जावे. संजीवनी माची: सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटा लगत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा जाता येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायर्यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे (शौचकुप) आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. संजीवनी माची वरुन खाली उतरुन जातांना एक दरवाजा लागतो . त्या दरवाजावर व्याघ्रमुखाचे शिल्प आहे. पुढे गेल्यावर आळू दरवाजा लागतो. आळु दरवाजा: संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून आहे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे,असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. आळु दरवाजातून पुढे टोकाकडील शेवटच्या बुरुजाकडे जातांना उजव्या अणि डाव्या बाजूला तटबंदीत अनेक ठिकाणी गुप्त दरवाजे आणि शरभ शिल्प पाहायला मिळतात. याशिवाय हनुमानाचे शिल्पही तटबंदीत पाहायला मिळते. संजीवनी माचीच्या टोकावरील बुरुज पाहून पुन्हा पद्मावती माचीकडे आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. | |||||||||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||||||||
१) गुप्त दरवाजाने राजगड :- पुणे - राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात. २) पाली दरवाज्याने राजगड:- पुणे - वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे "पाबे" या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायर्याची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात. ३) गुंजवणे दरवाज्याने राजगङ :- पुणे - वेल्हे या हमरस्त्यावरील "मार्गासनी" या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये. ४) अळु दरवाज्याने राजगड:- भुतोंडे मार्गे आळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो. ५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची:- गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माचीवर येते. | |||||||||||
राहाण्याची सोय : | |||||||||||
१) गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते. २) पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत. | |||||||||||
जेवणाची सोय : | |||||||||||
जेवणाची सोय आपण स्वत: करावी. | |||||||||||
पाण्याची सोय : | |||||||||||
पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. | |||||||||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||||||||
पायथ्या पासून ३ तास लागतात. |
Depot | Village | From Depot | From Village | km |
Swargate | Velhe | 6:15, 7:30, 8:00, 8:30, 9:30, 10:00, 11:15, 11:45, | - | 10 |
डोंगररांग: None | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अग्वाडा (Aguada) |
अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) | अंमळनेर (Amalner) |
आंबोळगड (Ambolgad) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | अर्जूनगड (Arjungad) |
अर्नाळा (Arnala) | आवाडे कोट (Awade Kot) | बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) |
बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बाळापूर किल्ला (Balapur Fort) | बांदा किल्ला (Banda Fort) | बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) |
बाणकोट (Bankot) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) | बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | भवानगड (Bhavangad) |
भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort) | भुदरगड (Bhudargad) | भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad)) | भूषणगड (Bhushangad) |
चाकणचा किल्ला (Chakan Fort) | चापोरा किल्ला (Chapora Fort) | कुलाबा किल्ला (Colaba) | डफळापूर गढी (Daflapur Fort) |
डहाणू किल्ला (Dahanu Fort) | दांडा किल्ला (Danda Fort) | दौलतमंगळ (Daulatmangal) | देवगडचा किल्ला (Devgad Fort) |
धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) | धारावी किल्ला (Dharavi Fort) | धर्मापूरी (Dharmapuri) | धारूर (Dharur) |
धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) | द्रोणागिरी (Dronagiri) | डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) | दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) |
डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad) | फिरंगकोट (Firang kot) |
घारापुरी (Gharapuri) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | गोवा किल्ला (Goa Fort) | हिराकोट (Hirakot) |
होन्नुर किल्ला (Honnur Fort) | इंद्रगड (Indragad) | इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) | जयगड (Jaigad) |
जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | जंजिरा (Janjira) | काकती किल्ला (Kakati Fort) | काळाकिल्ला (Kala Killa) |
कलाडगड (Kaladgad) | कांबे कोट (Kambe Kot) | कनकदुर्ग (Kanakdurg) | कंधार (Kandhar) |
करमाळा (Karmala Fort) | केळवे किल्ला (Kelve Fort) | केळवे पाणकोट (Kelve Pankot) | खांदेरी (Khanderi) |
खारबाव कोट (Kharbao kot) | खर्डा (Kharda) | खारेपाटण (Kharepatan fort) | खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) |
कोर्लई (Korlai) | कोटकामते (Kotkamate) | मच्छिंद्रगड (Machindragad) | माचणूर (Machnur) |
मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | माहीमचा किल्ला (Mahim Fort) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) |
मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) | मंगळवेढा (Mangalwedha) | माणिकगड (Manikgad) |
मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) |
नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) |
नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) | नारायणगड (Narayangad) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) | पाचाड कोट (Pachad Fort) |
पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) |
पालगड (Palgad) | परांडा (Paranda) | पारडी किल्ला (Pardi Fort) | पारनेरा किल्ला (Parnera Fort) |
पारोळा (Parola) | पिलीवचा किल्ला (Piliv Fort) | पिंपळास कोट (Pimplas Kot) | प्रचितगड (Prachitgad) |
पुरंदर (Purandar) | पूर्णगड (Purnagad) | रायकोट (Raikot) | ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse)) |
राजगड (Rajgad) | राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort)) | राजकोट (Rajkot) | रामदुर्ग (Ramdurg) |
रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | रेवदंडा (Revdanda) | रिवा किल्ला (Riwa Fort) | सदानंदगड (Sadanandgad) |
सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सामराजगड (Samrajgad) | सरसगड (Sarasgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) |
सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan)) | साटवलीचा किल्ला (Satavali Fort) | शिवडीचा किल्ला (Sewri Fort) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) |
सिंधुदुर्ग (Sindhudurg) | सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) | सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort)) |
सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) | सुभानमंगळ (Subhan Mangal) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) | सुरगड (Surgad) |
सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | टकमक गड (Takmak) | तारापुर किल्ला (Tarapur Fort) | तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort) |
थाळनेर (Thalner) | तोरणा (Torna) | उंदेरी (Underi) | वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai)) |
वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) | वसई (Vasai) | वेहेळे कोट (Vehele Kot) | विजयदुर्ग (Vijaydurg) |
विजयगड (Vijaygad) | वरळीचा किल्ला (Worli Fort) | यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort)) | यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate)) |
यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |