आमनेर
प्रस्तावना
महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर गारगा नदी तापी नदीला मिळते. या संगमावर असलेल्या टेकडीवर आमनेर किल्ला आहे. या किल्ल्या जवळ असलेल्या आमनेर गावमुळे किल्ल्याला आमनेर हे नाव मिळाले होते. इंग्रजांच्या काळात हे गाव येथून ऊठले. या किल्ल्याला जिल्पी आमनेर आणि हाशीरचा किल्ला या नावाने ओळखतात. मुघल दक्षिणेकडे आल्यावर त्यांनी बुर्हाणपूर ही काही काळ दक्षिणेची राजधानी बनवली होती. बुर्हाणपूरहून अचलपूर जाणार्या मार्गावर हा किल्ला बांधलेला आहे.
पावसाळ्यात आमनेर किल्ल्यावर जाणे टाळावे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
हा किल्ला कोणी आणि केव्हा बांधला याची नोंद उपलब्ध नाही. पण किल्ल्याची भाजलेल्या वीटांनी केलेली बांधणी अणि वीटांचा आकार यावरुन हा किल्ला सतराव्या शतकात बांधला असावा. इसवीसन १७२७ मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचा या किल्ल्याजवळ तळ होता. इसवीसन १८१८ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे या किल्ल्या जवळ येऊन गेल्याचा उल्लेख आहे. इसवीसन १८१८ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यात आमनेर किल्ल्यात लढाई झाली होती.
इसवीसन १८५७ मध्ये इंग्रजां विरुध्द झालेल्या उठावा नंतर तात्या टोपे यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता अशी वदंता होती. त्यामुळे त्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्याच्या तटबंद्या तोडून टाकल्या.
कसे पोहोचावे
आमनेर किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) महाराष्ट्रातून :- अमरावती हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. अमरावती ते धारणी हे अंतर १६० किलोमीटर आहे. धारणी ते बुर्हाणपूर या रस्त्यावर धारणी पासून १७ किलोमीटर अंतरावर भोकरबर्डी नावाचे गाव आहे. या गावात रस्त्या लगत एक मोठी आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेसमोरुन एक रस्ता नदी संगमापर्यंत जातो. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी गारगा नदी ओलांडून किल्ल्याची टेकडी व त्याच्या बाजूची टेकडी यामधून ओढ्याच्या बाजूने जाणार्या ठळक पायवाटेने किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूस (संगमाच्या विरुध्द दिशेला ) जावे लागते.
उन्हाळ्यात तापी नदीचे पाणी कमी झाल्यावर तापी नदीच्या दिशेला असलेल्या तटबंदीतील चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करता येतो.
२) मध्यप्रदेशातून :- बुर्हाणपूर हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. बुर्हाणपूर ते धारणी रस्त्यावर बुर्हाणपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर भोकरबर्डी नावाचे गाव आहे.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्याला दोन बाजूंनी तापी आणि गारगा नदीचे संरक्षण असून तिसर्या बाजूने एक ओढा वाहातो. अशा प्रकारे किल्ल्याला तीन बाजूंनी नैसर्गिक संरक्षण असून चौथ्या बाजूला खंदक खणून किल्ल्याला संरक्षण दिलेले आहे. किल्ल्याचा आकार साधारणपणे चौकोनी असून त्याला ७ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी गारगा नदी ओलांडून किल्ल्याची टेकडी व त्याच्या बाजूची टेकडी यामधून ओढ्याच्या बाजूने जाणार्या ठळक पायवाटेने किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूस (संगमाच्या विरुध्द दिशेला ) जावे लागते. इथे असलेला खंदक ओलांडल्यावर आपला किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याचे प्रवेशव्दार उध्वस्त झालेले आहे. किल्ल्याची तटबंदी, फांजी अस्तित्वात आहे. किल्ल्यातील बुरुजाखाली आणि तटबंदीत काही खोल्या काढलेल्या आहेत. भिंतीत असलेल्या कोनाड्यांवरुन त्याची साक्ष पटते. किल्ल्याच्या मधोमध हनुमान मंदिर आहे. किल्ल्याच्या तापी नदीकडील तटबंदीत चोर दरवाजा आहे. नद्यांच्या संगमावर असलेला पाकळी बुरुज अतिशय सुंदर आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर चर्या आहेत. त्यामध्ये जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ला छोटासा असल्याने अर्ध्या तासात पाहुन होतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
बुर्हाणपूर आणि धारणी गावात राहाण्याची सोय आहे
अन्न व्यवस्था
बुर्हाणपूर आणि धारणी गावात जेवणाची सोय आहे
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही
अतिरिक्त माहिती
पावसाळ्यात आमनेर किल्ल्यावर जाणे टाळावे.
जवळील गावे
Bhokarbardi
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा