कांचन
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
Fort
Fort
प्रस्तावना
नाशिक जिल्ह्यात पूर्व - पश्चिम पसरलेल्या अजिंठा - सातमाळ रांगेत अचला, अहिवंत, मार्कंड्या, रवळाजवळा, कन्हेरगड, धोडप, कांचन हे किल्ले आहेत. शिवकालात शिवाजीमहाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर झालेली ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली. बारी म्हणजे खिंड, या खिंडीमार्गे होणार्या व्यापारावर / वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.
![]() |
| Kanchana |
ऐतिहासिक पार्श्वभूमी
२ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर १६७० या तीन दिवसात सुरतेची दुसर्यांदा धुळधाण उडवून प्रचंड लुट घेऊन महाराजांनी बागलाणाकडे कुच केली. ही बातमी कळताच दाऊदखान हा मोगली सरदार फौजेनीशी बर्हाणपूराहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. १६ ऑक्टोबर १६७० रोजी दाऊदखान चांदवडजवळ पोहोचला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगररांग ओलांडणे आवश्यक होते व तेथेच दाऊदखान आडवा येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराजांनी रात्रीच आपल्या १५००० फौजेची २ भागात विभागणी केली व पायदळाचे पाच हजार हशम, लुटीची घोडी व सामान मार्गी लावून स्वत: १०००० फौज घेऊन लुटीच्या पिछाडीस राहीले.
१७ ऑक्टोबरला सकाळीच युध्दाला कांचन - मंचन (कांचनबारीत) च्या परिसरात तोंड फुटले सहा - तास चाललेल्या या तुंबळ युध्दात खुद्द महाराजांसह, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करुन ३००० मोगली सैनिक कापून काढले; मोगली सेनेचा दारुण पराभव झाला.
या युध्दाचे वैशिष्टे म्हणजे गनिमी काव्याचा वापर न करता मोठ्या फौजेनिशी (१५०००) मैदानात महाराजांच्या नेतृत्वाखाली समोरासमोर लढले गेलेले व जिंकलेले युध्द होते. या युध्दाचा परिणाम एवढा मोठा झाला की, दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्दी हिलाल महाराजांना येऊन मिळाला व महाराजांनी या भागातील जवळजवळ सर्व किल्ले पुढील काळात ताब्यात घेतले.
कसे पोहोचावे
मुंबईहून नाशिकला जावे, नाशिकच्या सेंट्रल बस डेपोतून सटाण्याला जाणारी बस पकडून खेळदरी गावात उतरावे.
महत्त्वाची ठिकाणे
कांचन किल्ला तीन भागात विभागलेला आहे. यातील दोन मुख्य भाग कांचन - मंचन म्हणून ओळखले जातात. खेळदरी गावातून ३ तासात आपण कांचन गडाच्या पूर्वेकडील (दूरुन पिंडीसारख्या दिसणार्या) कातळ टप्प्यापाशी येऊन पोहोचतो. मुख्य वाट सोडून उजवीकडे गेल्यावर गुहा पाहायला मिळते. ती पाहून परत मुख्य वाटेवर येऊन कातळात खोदलेल्या पायर्यांवरुन आपण या कातळटप्प्याच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर रांगेत खोदलेली पाण्याची ५ टाकं आहेत. ती पाहून खाली उतरुन मधल्या कातळभिंतीला वळसा घालून पश्चिमेचा कातळटप्पा गाठावा. येथे उध्वस्त प्रवेशद्वार व थोडी तटबंदी शाबूत आहे. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पाण्याच टाक व गुहा पाहायला मिळतात. त्यांच्यापुढे दोन थडगी, उध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या पश्चिम टोकाला अजून दोन कातळटप्पे आहेत त्यावर प्रत्येकी एक टाकं आहे.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर रहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
गडावर जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जवळील गावे
Kheldari
या परिसरातील इतर किल्ले अजंठा सातमाळ
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
