वैराटगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Vairatgad - From Vyajwadi village
प्रस्तावना
वैराट गड हा वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून ८ किमी अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो. पायथ्याच्या गावापर्यंत जाणार्य़ा बसेस व इतर गाड्या यामुळे या परिसरातील भटकंती फारच सोपी आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
वैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेंव्हा वाई प्रांत जिंकला, तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
कसे पोहोचावे
गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत त्यासाठी व्याजवाडीला पोहोचावे. वाई - सातारा मार्गावर ४ किमी वर कडेगाव पूल येथे उतरावे. येथून व्याजवाडी या गावात यावे. गावातून गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. एक वाट चांगली मळलेली आहे, मात्र ही जरा फिरून जाते. तर दुसरी वाट डाव्या बाजूच्या नाकाडावरून जाते. साधारणत: या वाटेने १/२ तास गड गाठण्यास लागतो, तर पहिल्या वाटेने १ तास लागतो. पुढे दोन्ही वाटा एकत्र मिळतात आणि १० मिनिटे गडमाथा गाठण्यास लागतो. शेवटच्या टप्प्यावरची वाट प्रचंड निसरडी आहे. व्याजवाडीच्या विरुद्ध बाजूस ‘म्हसव’ नावाचे गाव आहे. या गावातून सुद्धा एक वाट आहे. मात्र ही वाट खूप निसरडी आहे.
महत्त्वाची ठिकाणे
गडमाथा फारच लहान आहे. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे. साधारणत: २० ते २५ पायर्य़ा चढून आपण गडावर पोहोचतो. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे, तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात. गडाची तटबंदी अजूनही बर्य़ाच प्रमाणात शाबूत आहे. गडावर एक सदर आहे, तिची रुंदी साधारण १० फूट आहे.
गडाच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला कड्यामध्ये एक खाच आहे, ह्यातून म्हसव गावाकडे उतरता येते. त्याच्या जवळच एक उंचवटा आहे. तेथे दगडावर अस्पष्ट असे लिखाण आहे. गडाच्या आजुबाजूला अनेक अवशेष इतस्तत: पसरलेले आढळतात. थोडे शोधकार्य केल्यास आणखी अवशेष सापडू शकतील. गड फिरण्यास १ तास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावरील मारुती मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते.
अन्न व्यवस्था
गडावर गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. त्यांच्याकडे २ ते ४ जणांची जेवणाची सोय होते. जास्त लोक असतील तर जेवणाची सोय आपणच करावी.
पाणी उपलब्धता
बारमाही पिण्याची सोय आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ५ ते ६ पिण्याच्या पाण्याच्या टाकी आहेत.
या परिसरातील इतर किल्ले महाबळेश्वर
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा