मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गाविलगड (Gavilgad) किल्ल्याची ऊंची :  3600
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातपुडा (मेळघाट)
जिल्हा : अमरावती श्रेणी : सोपी
चिखलदरा हे विर्दभातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाभारतील किचक वधाची कथा याच ठिकाणी घडली अशी आख्यायिका आहे. पांडव अज्ञातवासात असतांना भिमाने किचकाचा वध याच ठिकाणी केला व दरीत फेकून दिले. त्यामुळेच या ठिकाणाला किचकदरा असे नाव पडले, त्याचाच अपभ्रंश होऊन या गावाचे "चिखलदरा" हे नाव पडले. या चिखलदरा गावापासून ३ किमी अंतरावर गाविलगड किल्ला आहे. चिखलदर्‍याच्या स्थळांच्या यादीत गाविलगड आहे. पण किल्ल्याचा घेर प्रचंड असल्यामुळे पर्यटक किल्ल्याचा बाहेरील भाग बघून परत जातात. किल्ला दोन भागात विभागलेला असून संपूर्ण किल्ला पहाण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो.


Gavilgad
40 Photos available for this fort
Gavilgad
Gavilgad
Gavilgad
इतिहास :
महाभारत काळात या परिसरात विराट राजाचे राज्य होते. पांडव अज्ञातवासात असतांना भिमाने किचकाचा वध याच ठिकाणी केला होता. मूळचा गाविलगड किल्ला मातीचा होता. १२ व्या शतकात गवळी राजाने ( यादव) हा किल्ला बांधला होता. त्यावरूनच त्याला "गाविलगड" हे नाव पडले. आज अस्तित्वात असलेला दगडाचा किल्ला बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने इ.स.१४२५ मध्ये बांधल्याचा उल्लेख " तारिख-ए-फरीश्ता" या ग्रंथात आढळतो. पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने या किल्ल्याची दुरुस्ती केली व विस्तार केला. इमादशाही घराण्याच्या मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राम्हणाचा मुलगा होता. बहामनी राज्याच्या बेरार (वर्‍हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली.
गाविलगड किल्ल्याची दुरुस्ती करतांना त्याने शार्दुल दरवाजाची निर्मिती केली, त्या दरवाजावर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह गंड भेरूंड कोरले, त्याच बरोबर खजूराचे झाड व शार्दुल ही मुसलमान शासकांची चिन्हेही कोरली. इमादशाही घराण्याने ९० वर्षे वर्‍हाड प्रांतावर राज्य केले. त्यानंतर १५७२ मध्ये गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले. बैरामखान याने इ.स. १५७७ मध्ये निजामशाहीच्या कारकिर्दीत किल्ल्याची पुन्हा दुरुस्ती केली व एका बुरूजावर शिलालेख कोरला.आज तो बुरुज "बैराम बुरुज" म्हणून ओळखला जातो.
इ.स.१५९८ मध्ये अकबराने गाविलगड किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात गाविलगड किल्ला पुन्हा मुघल साम्राज्यात गेला.
इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करुन गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम व पेशवे यांच्यातील भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला. इ.स. १७६९ मध्ये माधवराव पेशवे वर्‍हाडावर चालून येत आहेत असे कळल्यावर भोसल्यांनी त्यांचा कुटुंब कबिला व जडजवाहीर गाविलगड किल्ल्यावर हलविले. भोसल्यांनी किल्ल्याच्या बाहेर परकोट बांधला तोच बाहेरील किल्ला म्हणून ओळखला जातो.
१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले. इ.स. १८५७ मध्ये किल्ला क्रांतिकारकांच्या हाती जाऊ नये म्हणून इंग्रजांनी गाविलगडाची डागडूजी केली.

पहाण्याची ठिकाणे :
चिखलदरा गावातून पक्का रस्ता मछली तलावाच्या बाजूने गाविलगडाच्या मछली दरवाजा पर्यंत जातो. हा भाग म्हणजे मुख्य किल्ल्याचा परकोट आहे. दक्षिणाभिमुख मछली दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोनही बाजूंनी उंच तटबंदी असलेली वाट आपल्याला दुसर्‍या दरवाजापाशी घेऊन जाते. हा दरवाजा पहिल्या दरवाजाला काटकोनात बांधलेला आहे. या पश्चिमाभिमुख दरवाजाला " बिरभान/ बुरुजबंद" दरवाजा म्हणतात. या दरवाजाच्या आतील बाजूस शरभ व हत्तीचे शिल्प ठेवलेले आहे. दरवाजातून आत शिरल्यावर प्रथम उजव्या बाजूला जावे. या बाजूला पहिल्यांदा मछली तलावाच्या वरच्या बाजूस असलेला "मछली बुरुज", नंतर "चांदनी बुरुज" व सर्वात शेवटी "मोझरी दरवाजा" लागतो. संपूर्ण परकोटाला संरक्षणाच्या दृष्टीने दुहेरी तटबंदी बांधण्यात आलेली आहे.

मोझरी दरवाजा पाहून झाल्यावर परत बिरभान प्रवेशव्दारापाशी येऊन डाव्या बाजूस जावे. येथे "तेलीया बुरुज" आहे. ता बुरुजा पासून तटबंदीच्या कडेकडेने चालत जातांना खाली दरीत "दर्या तलाव" हा बांधीव तलाव दिसतो. पुढे परकोट व मुख्य किल्ला यामधील दरीच्या तोंडावर एक पहार्‍याची बांधीव चौकी आहे. या चौकीची रचना अशी केलेली आहे की, एकाचवेळी गाविलगड किल्ल्याचे दोनही दरवाजे व दरी यावर लक्ष ठेवता येईल. मधली दरी ओलांडून बांधीव पायर्‍यांच्या मार्गाने आपण गाविलगड किल्ल्याच्या मुख्य व भव्य प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. हा दरवाजा "शार्दुल (वाघ) दरवाजा किंवा "गंडभेरुंड दरवाजा" या नावाने ओळखला जातो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कोरलेली शिल्प. दरवाजाच्या दोनही बाजूला शरभ शिल्प आहेत. या शिल्पांमध्ये शरभाने (वाघाने) चार पायात चार हत्ती, तसेच तोंडात एक व शेपटीत एक असे एकूण ६ हत्ती पकडलेले दाखवले आहेत. या शरभांच्या वरच्या बाजूला गंड्भेरुंडाचे शिल्प कोरलेले आहे. गंडभेरुंड हा काल्पनिक पक्षी आहे. त्याला दोन डोकी असून त्याने प्रत्येक चोचीत एक शरभ पकडलेला दाखवण्यात आला आहे . या दोन शिल्पांच्या मध्ये फळांनी लगडलेल खजूराच झाड कोरलेले आहे. खर तर हे गंडभेरुंड हिंदु शासकांच राजचिन्ह होते, तर शरभ व खजूराच झाड हे मुस्लिम शासकांच राजचिन्ह होते. याबाबत असा उल्लेख सापडतो की, इदमामशाहीचा पहिला स्वतंत्र बादशहा फत्तेउला इमाद याने बहामनी काळात विजयनगरच्या राज्यात चाकरी केली होती, त्याची आठवण म्हणून त्याने मुस्लिम राजचिन्हां बरोबर विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह "गंडभेरुंड" दरवाजावर कोरले असावे.

शार्दुल दरवाजा पाहून पायर्‍यांच्या मार्गाने आपण दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो. "दिल्ली दरवाजा" हा शार्दुल दरवाजाला काटकोनात बांधलेला आहे. दिल्ली दरवाजाचे अर्धवर्तुळाकार छत व अंर्तभाग कोसळलेला आहे. दरवाच्या बाजूला असलेल्या बुरुजांमध्ये टेहळणी मनोरे आहेत. दिल्ली दरवाजाच्या जवळच "खम तलाव" आहे. दिल्ली दरवाजातून आत शिरल्यावर खम तलावाकडे न जाता उजव्या बाजूने तटबंदीच्या कडेकडेने वर चढत गेल्यावर एक "तुटलेली तोफ" दिसते. त्याच्या पुढे असलेल्या उध्वस्त वास्तुला "नगारखाना" म्हणतात. नगारखान्याच्या मागच्या टोकावर "१७.५ फूटी नगारखाना तोफ" आहे. ही तोफ पाहून तटबंदीच्या कडेकडेने पुढे चालत गेल्यास एक कुत्र्याच्या आकाराचा प्रचंड दगड दिसतो. तिथून खाली उतरत गेल्यावर आपण "मोझरी बुरुजावर" पोहोचतो. मोझरी दरवाजा व बुरूज ही नाव किल्ल्याच्या खाली असलेल्या मोझरी गावामुळे पडलेली आहेत.

मोझरी बुरुज पाहून तटबंदीच्या कडेकडेने मार्गक्रमण करतांना तटबंदीत एक चोर दरवाजा दिसतो. या चोर दरवाजाच्या पुढेच "बहराम बुरुज" किंवा " बारा खिडकी बुरुज " हा किल्ल्यावरील अप्रतिम बुरुज आहे. या बुरुजात १२ झरोके (खिडक्या) आहेत. मधल्या खिडकीच्या वर फारसीतील शिलालेख कोरलेला दगड बसविलेला आहे. या बुरुजाचे फारसी नाव " बुर्ज-ए-बेहराम " आहे. या बुरुजाचे बांधकाम व किल्ल्याची दुरुस्ती अहमदनगरचा नावाबाचा अधिकारी बहराम याने हिजरी सन ९८५ (इ.स.१५७७) मध्ये केल्याचा उल्लेख आढळतो.

बेहराम बुरुज पाहून मागे फिरावे व चोर दरवाजासमोरील टेकाडं चढून वर गेल्यावर २ मोठ्या तोफा दिसतात. त्यापैकी पहिली तोफ, "बिजली तोफ" व दुसरी तोफ "कालभैरव तोफ" या नावाने ओळखली जाते. या तोफांच्या मागिल बाजूस पडक्या वास्तुचे अवशेष आहेत. या तोफा पाहून टेकाड उतरुन तटबंदीच्या कडेकडेने पुढे चालत गेल्यावर रस्त्यात हनुमानाची एक मुर्ती दिसते. पुढे चालात गेल्यावर "पीरफत्ते दरवाजा" पहायला मिळतो. या दरवाजावर पर्शियन लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. दरवाजासमोर पीराच थडग आहे. या दरवाजाला लागुनच एक मनोरा आहे त्याला "राणी झरोखा" म्हणतात.या मनोर्‍याची आता पडझड झालेली आहे, पण मनोर्‍यावर जाण्यार्‍या पायर्‍या अजून शाबूत आहेत. मनोर्‍याच्या पहिल्या मजल्यावर ३फूट उंचीच्या कमानी युक्त खिडक्या आहेत. येथून आजूबाजूचा विस्तिर्ण प्रदेश दिसतो.

पीरफत्ते दरवाजा समोरील टेकाडावर चढून गेल्यावर गाविलगडावरील सर्वात मोठी "पीरफत्ते तोफ " (लांबी २५ फूट) पहायला मिळते. ही तोफ पाहून "जामा मस्जिद/ मोठी मस्जिद/ राणी महाल" या किल्ल्यावरील सर्वात उंच, सुंदर आणि सुस्थितीतील वास्तु कडे जावे. हि वस्तू उंचवट्यावर उभारलेली आहे त्यामुळे चिखलदरा गावातूनही दिसते. राणी महालाला ७ कमानी असलेली ३ दालने आहेत. या दालनांच्या छ्तावर २१ घुमट होते. आज त्यापैकी १४ घुमट अस्तित्वात आहेत. कमानी आणि घुमटांचा डोलारा चौकोनी खांबांवर तोललेला आहे, या कमानींवर नक्षी कोरलेली आहे. महालाच्या चार बाजूला ४ मनोरे होते. आता त्यापैकी २ मनोरे शिल्लक आहेत. या मनोर्‍यांना चारही बाजूंना जाळीदार खिडक्या होत्या.मनोर्‍यावर छान नक्षी कोरलेली आहे. महालाला फरसबंदी केलेले पटांगण आहे, या महालाच्या चारही बाजूनी तटबंदी व त्यात चार दिशांना चार दरवाजे आहेत. महालाच्या उत्तरेकडील दरवाजातून बाहेर पडल्यावर एक मजली इमारत आहे, हे फत्तेउल्ला इमादउलमुल्क या इमादशाहीच्या संस्थापकाचे थडगे आहे.

राणी महालातून बाहेर पडून दक्षिणेकडे चालत गेल्यास धान्य कोठाराची दोन दालने असलेली इमारत दिसते. या इमारतीच्या पुढे ’बरसाती तलाव " व ’धामाजी तलाव’ पाहून पश्चिम टोकावरील "सोनकिल्ला बुरुज" गाठावा. पुढे तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर "१९.५ फूटी लोहारी तोफ" पहायला मिळते. या तोफेच्या खालच्या बाजूला "किचक दरवाजा" आहे. किचक दरवाजा पाहून पुन्हा तोफेपाशी येउन सती तलावापाशी यावे. या तलावाच्या बाजूला धोबी तलाव व लेंडी तलाव आहे, तर समोर देव तलाव आहे. सती तलावाच्या मागिल बाजूस समाध्या व वीरगळी आहेत. देव तलावाच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. देव तलाव व धोबी तलाव यांच्या मध्ये दोन तुळशी वृंदावन आहेत.देव तलावा कडून दिल्ली दरवाजाकडे जातांना वाटेत धान्य कोठाराची इमारत व छोटी मशिद आहे. हे सर्व पाहून दिल्ली दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.


पोहोचण्याच्या वाटा :
चिखलदरा हे विर्दभातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदर्‍यातून किल्ल्याच्या परकोटाचे प्रवेशव्दार ३ कि. मी. वर आहे, तेथे चालत अर्ध्या तासात पोहोचता येते. तसेच थेट किल्ल्यापर्यंत वहानानेही जाता येते.
चिखलदर्‍याला पोहोचण्यासाठी प्रथम मध्य रेल्वेच्या मुंबई - नागपूर मार्गावरील बडनेरा गाठावे, तेथून अमरावती गाठावे. रेल्वेनेही थेट अमरावतीला जाता येते. अमरावती बस स्थानकातून परतवाड्याला जाणार्‍या बसेस दर १० मिनीटाला आहेत. त्याने ५० किमी वरील परतवाडा गाठावे. परतवाडा - चिखलदरा हे अंतर ३५ किमी आहे. परतवाड्याहून चिखलदर्‍याला जाण्यासाठी दर ३० मिनिटाला एसटीच्या मिनी बसेस आहेत. तसेच जीप ही उपल्ब्ध आहेत
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण चिखलदर्‍यात निवासाची सोय आहे .
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, परंतू चिखलदर्‍यात जेवणाची सोय आहे. किल्ला संपूर्ण पाहाण्यास अख्खा दिवस लागतो, त्यामुळे बरोबर खाण्याचे साहित्य बाळगावे.
पाण्याची सोय :
गडावरील तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे, पण पाण्याचा साठा सोबत असल्यास उत्तम.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
चिखलदर्‍यातून किल्ल्याच्या परकोटाचे प्रवेशव्दार ३ कि. मी. वर आहे, तेथे पोहोचण्यास अर्धा तास लागतो. किल्ला संपूर्ण पाहाण्यास अख्खा दिवस लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते फेब्रूवारी हा किल्ल्यावर जाण्याचा उत्तम काळ आहे.
सूचना :
१) गाविलगड किल्ला प्रचंड मोठा असल्यामुळे दोन दिवसात विभागून पहावा. पहिल्या दिवशी भाड्याच्या/ स्वत;च्या वहानाने चिखलदर्‍यातील सर्व प्रेक्षणीय ठिकाण पाहून घ्यावीत, त्यातच गाविलगडाचा बाहेरील भाग (परकोट) पाहून घ्यावा, तो पहाण्यास साधारणत: दिड ते दोन तास लागतात. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मुख्य किल्ला पहावा. हा पाहाण्यासाठी साधारणत: ४ ते ५ तास लागतात.

२) गाविलगड किल्ला पाहातांना सोबत दिलेला नकाशा वापरल्यास सर्व किल्ला व्यवस्थित व कमी वेळात पाहाता येतो.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: G
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)  गंभीरगड (Gambhirgad)
 गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोवा किल्ला (Goa Fort)
 गोपाळगड (Gopalgad)  गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)
 गुणवंतगड (Gunawantgad)