सदानंदगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Sadanandgad
प्रस्तावना
साळशी महाल हे मध्ययुगीन काळात या भागातील महसूल गोळा करण्याचे प्रमुख केंद्र होते. त्याच प्रमाणे अनेक राजवटींनी साळशी महालात आपला सैन्यतळ ठेवला होता. या साळशी महालाच्या संरक्षणासाठी सदानंदगड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
कसे पोहोचावे
कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जातांना जानवली नदी वरचा पूल ओलांडल्यावर एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याने तरंदळे मार्गे कुवळे गाव १७ किलोमीटर अंतरावर आहे. कुवळे गावातील परबवाडी पर्यंत रस्ता आहे. परबवाडीत उतरुन घरांच्या मधून चढत जाणार्या वाटेने २० मिनिटात आपण सदानंदगडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.
महत्त्वाची ठिकाणे
सदानंदगडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत . एक वाट साळशी गावातून आहे तर दुसरी वाट कुवळे गावतील परबवाडीतून किल्ल्यावर जाते. कुवळे गावतील परबवाडीतून जाणारी सोपी , ठळक आणि कमी वेळात गडावर जाणारी आहे. परबवाडीतून सदानंदगडावर जाण्यासाठी चिरेबंदी रस्ता बांधायचे काम अर्धवट झालेले आहे. परबवाडीतील घरांमधून चढत जाणार्या वाटेने २० मिनिटात आपण सदानंदगडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. हे प्रवेशव्दार कातळात कोरुन काढलेले आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर कातळात कोरलेल्या काही पायर्या आहेत त्या चढून गेल्यावर समोरच दोन बुजलेली पाण्याची टाकी आहेत. त्यात आता झाडी झाडोरा वाढलेला आहे.
प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन वाटा फ़ुटतात एक उजव्या बाजूला जाते तर दुसरी डाव्या बाजूने जाते. या दोन्ही वाटांवर किल्ल्याचे अवशेष आहेते. उजवी कडील वाटेने पुढे गेल्यावर एक छोटसा चढ लागतो. या ठिकाणी पायवाटेच्या उजव्या बाजूला दोन गुहा आहेत. त्यापैकी एका गुहेत गावकर्यांनी गणपतीची मुर्ती ठेवलेली आहे. य गुहेत ५ ते ६ माणस आरामात बसू शकतात एवढीच जागा आहे. त्याच्या बाजूची गुहा पडझड झाल्यामुळे बंद झालेली आहे. तिचे फ़क्त तोंड दिसते. या दोन गुहांच्या खालच्या बाजूला अजून दोन छोट्या गुहा आहेत.
या गुहा पाहून पायवाटेने पुढे गेल्यावर ५ मिनिटात आपल्या समोर एक दगडी भिंत आडवी येते. ही सदानंदगडाचे दोन भाग करण्यासाठी बांधलेली तटबंदी बांधलेली होती. सरखेल कान्होजी आंग्रे आणि खेम सावंत यांचा साळशी महाला वरुन वाद झाला होता. त्यावेळी छ. शाहू महाराजांनी साळशी महालाच्या महसूलाचे आणि सदानंदगडाचे २ भाग करुन दोघांना वाटून दिले. त्यावेळी किल्ल्याचे दोन भाग करणारी तटबंदी बांधली होती.
तटबंदी पाहून आल्या वाटेने परत प्रवेशव्दारापाशी येऊन डाव्या बाजूने जाणारी पायवाट पकडावी. या वाटेने उत्तर दिशेला चालायला लागल्यावर ५ मिनिटात आपण एक ओढा ओलांडून चढ चढून सपाटीवर येतो. याठिकाणी एक सुकलेले तळे आहे. त्यात गाळ भरलेला असल्यामुळे केवळ पावसाळ्यात त्यात पाणी राहाते. या तळ्यापासून काटकोनात वळून (पूर्व दिशेला) ५ मिनिटे चालल्यावर कातळात कोरलेले टाकं पाहायला मिळते. य टाक्यात पाणी राहात नाही. टाक्यात उतरण्यासाठी दगडात कोरलेल्या पायर्या आहेत.
टाकं पाहून पुन्हा उत्तरेकडे जाणार्या पायवाटेने चालत गेल्यावर झाडीत लपलेले उध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. येथे पर्यंतचे किल्ल्याचे अवशेष सहज सापडतात. यापुढे किल्ल्याच पठार उभे आडवे पसरलेले असून त्यावर अनेक वाटा आहेत . त्यामुळे चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे किल्ल्याचे साळशी गावाकडील प्रवेशव्दार शोधण्यासाठी स्थानिक वाटाड्या बरोबर घेणे आवश्यक आहे. किल्ल्याचे साळशी कडील प्रवेशव्दार कातळात कोरलेले आहे. हे प्रवेशव्दार पाहून आल्या वाटेने पुन्हा कुवळे गावाकडील प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी दिड ते दोन तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर राहाण्याची सोय नाही.कणकवली येथे आहे .
अन्न व्यवस्था
गडावर जेवणाची सोय नाही. कणकवली येथे आहे .
पाणी उपलब्धता
गडावर पिण्या योग्य पाणी नाही.
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा